आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सलाम ऐ वतन पर मिट जाने वाले नौजवान!
तुम्हारी हर साँस का कर्ज़दार है हिन्दुस्तान!!
वर लिहिलेल्या ओळी देशाच्या त्या वीरांसाठी आहेत ज्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज आपण त्याच वीरांमुळे सुरक्षित आहोत.
१९४७ साली इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला, आणि भारत हा स्वतंत्र देश झाला. पण स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचे २ तुकडे झाले. फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानची नजर संपूर्ण काश्मिरवर होती पण भारतीय सैनिकांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना ते जिंकता नाही. आणि याच वीर सैनिकांपैकी एक होते ते नायक जदुनाथ सिंग.
जदुनाथ सिंग यांनी आपल्या मूठभर सैन्याचं अत्यंत हुशारीने नेतृत्व करून पाकिस्तानी सैनिकांवर एकट्याने गोळ्यांची खैरात केली होती. नायक जदुनाथ सिंग यांच्या या अफाट सहासामुळे पाकिस्तानला कितीतरी वेळा मागे हटावं लागलं. दुर्दैवाने या लढाईत आपले कर्तव्य बजावताना यदुनाथ सिंग यांना वीरमरण प्राप्त झाले.
नायक जदुनाथ सिंग यांना त्यांच्या कामगिरीसाठी मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
राठोड राजपुत नायक जदुनाथ सिंग यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९१६ रोजी उत्तर प्रदेशच्या शहजहानपूर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील बिरबलसिंग हे शेतकरी होते तर जमुना कंवर या त्यांच्या आई होत्या.
८ भावंडांच्यात जदुनाथ हे तिसरे अपत्य होते. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा संपूर्ण भार शेतकरी असणाऱ्या वडिलांवर असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नव्हती. याच कारणामुळे जदुनाथ यांना चौथीच्या वर्गातच शाळा सोडावी लागली. नंतर जदुनाथ हे वडिलांना शेतीत मदत करू लागले.
जदुनाथ यांची हनुमानावर प्रचंड श्रद्धा होती. त्यांना हनुमान भक्त याच नावाने लोक हाक मारायचे. हीच लहानपणी लागलेली ही हनुमान भक्तीची ओढ कायम राहिली व जदुनाथ यांनी ब्रम्हचारी मार्गाने जीवन जगण्याचा संकल्प केला.
जदुनाथ यांच्यात लहानपणीच देशभक्ती आणि माणुसकीची भावना रुजली होती. देशासाठी पडेल ते काम करण्याची त्यांनी तयारी होती. लोकांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असायचे. पैलवानगिरी करणारे जदुनाथ गावात कुस्ती चॅम्पियन म्हणून ओळखले जायचे.
१९४१ साली त्याचं देशसेवेचं स्वप्न पूर्ण झालं. २५ वर्षांचे असताना जदुनाथ यांना ब्रिटिश भारतीय सैन्यात भरती केलं गेलं आणि ते रजपूत रेजिमेंटचा एक भाग बनले. सैन्यात भरती होणं ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
सैन्याचं सुरवातीचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते रेजिमेंटच्या एका बटालियनमध्ये सहभागी झाले. १९४२ मध्ये त्यांना बर्मा मोहिमेसाठी अर्कान प्रांतात तैनात करण्यात आलं आणि तिथे त्यांनी जपानविरुद्ध पहिली लढाई लढली.
पुढे जदुनाथ यांनी दुसऱ्या महायु*द्धात आपल्या शौर्याची चुणूक दाखवली. आणि याच कामगिरीच्या बळावर त्यांची नियुक्ती नायक या पदावर करण्यात आली.
पुढे १९४७ मध्ये पाकिस्तानने आपल्या सशस्त्र सैनिकांना काश्मीरला पाठवलं. हे सगळं घडत असताना इकडे भारत सरकारने घोषित केले महाराजा हरीसिंग काश्मीरला भारतात औपचारिकरित्या विलीन करण्यास तयार आहेत. पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील भारताच्या ठिकाणांवर ह*ल्ले केले आणि डिसेंबरमध्ये पाकिस्तानने झंगरवर त्यांचा कब्जा केला.
यावेळी राजपूत बटालियनला पाकिस्तानी सैन्यास बाहेर ढकलण्याचा आणि नौशेरा सेक्टरला सुरक्षित करण्याचा आदेश दिला. याच नौशेरा इथे असणारा टेनधार मोर्चा हा शत्रूंसाठी खूप महत्त्वाचा होता कारण इथून श्रीनगरच्या विमानतळावरील नियंत्रण हाताळणे अतिशय सोपे होते. आता शत्रूची नजर नौशेरावर होती. आणि ते त्यांच्या ताब्यात गेल्यास त्यांना काश्मीरवर नियंत्रण मिळवण्यात सहज यश आलं असतं.
याचवेळी ब्रिगेडियर उस्मान यांच्या नेतृत्वात १ फेब्रुवारी १९४८ रोजी भारताच्या ५० पॅराब्रिगेडियरच्या तुकडीने नौशेरावर ह*ल्ला केला आणि पाकिस्तानला धूळ चारण्यात यशस्वी झाले. त्यांनी पाकिस्तानी सैन्याला मागे पाठवून पुन्हा नौशेरावर नियंत्रण मिळवले.
ब्रिगेडियर उस्मान हे आपल्या तुकडीच्या मदतीने काश्मीर वाचवण्यात यशस्वी झाले होते. नौशेराच्या ह*ल्ल्यानंतर ते पाकिस्तानवर बारीक नजर ठेऊन होते. त्यांनी पॅराब्रिगेडच्या सगळ्या तुकड्यांना सैन्याच्या तुकड्यांसह वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त केलं होतं.
भारतीय सैनिकांनी नौशेरावर नियंत्रण मिळवलं तर इकडे नौशेरा वाचवण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचं खूप नुकसान झालं. पुढे याच रागातून त्यांनी ६ फेब्रुवारीला टैनधारवर ह*ल्ला केला. तिथेच नायक जदुनाथसिंग आपल्या ९ सैनिकांसोबत गस्तीवर सतर्क होते.
पाकिस्तानने सकाळी टैनधारच्या बाजूला आग लावली जेणेकरून धूर होईल आणि ते सहज ह*ल्ला करू शकतील. पाकिस्तान एकापाठोपाठ एक ह*ल्ले करत होता. नायक जदुनाथ हे आपल्या ९ सहकाऱ्यांसोबत तिथला भाग सांभाळत होते. त्यांनी यशस्वीपणे पाकिस्तानचा हा ह*ल्लासुद्धा परतवून लावला.
थोड्यावेळाने पाकिस्तानने पुन्हा ह*ल्ला करण्यास सुरुवात केली. या वेळेस त्यांच्या सैनिकांच्या व ह*त्यारांच्या संख्येत खूप वाढ झाली होती. या ह*ल्ल्यावेळी नायक जदुनाथ यांचे चार सैनिक या ह*ल्ल्यात घायाळ झाले. जखमी झाल्यावर मागे न सरकता जदुनाथ आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत राहिले. ते दुश्मनांसोबत खूप ताकदीने लढत होते पण शेवटी शत्रूंनी त्यांना घायाळ केलंच.
जखमी झाल्यानंतरसुद्धा जदुनाथ यांनी हिम्मत सोडली नाही. त्यांना जखमी असूनसुद्धा लढताना पाहून त्यांच्या सहकारी सैनिकांना जोश आला आणि त्यांनी पुन्हा शत्रूवर ह*ल्ला केला. या ह*ल्ल्यात त्यांना यश आलं आणि ते पुन्हा एकदा शत्रूंना माघारी पाठवण्यात यशस्वी झाले.
नायक जदुनाथ यांनी दुसऱ्यांदा मोर्चा सांभाळताना पाकिस्तानला मागे धाडलं होतं. तेव्हा त्यांच्यातील काही सैनिकांना वीरमरण आले होते. पाकिस्तान अजून ह*ल्ला करण्याच्या तयारीत होता तेव्हा ब्रिगेडियर उस्मान यांनी जदुनाथ यांना बॅकअप म्हणून आणखी एक तुकडी पाठवली.
परंतु ही तुकडी तिथे पोहचण्यास थोडाच वेळ बाकी असताना पाकिस्तानने आणखी एक तिसरा ह*ल्ला केला तरीसुद्धा भारताच्या या वीर सुपुत्राने अजून हार मानली नव्हती. जदुनाथ पुन्हा एकदा विरोधकांना पुरून उरत होते. त्यांचे उरलेले सैनिक सतत फायर करत होते. जदुनाथ यांनी जखमी असूनही हिम्मत सोडली नव्हती. त्यांनी नवीन तुकडी येईपर्यंत आघाडी पेलून धरली.
आता जदुनाथ यांचे सगळे सैनिक घायाळ झाले होते आणि जदुनाथ सिंग हे एकटेच दुश्मनांना हुशारीने तोंड देत होते पाहतापहाता जदुनाथ यांचा आपल्या रागावरचा संयम सुटला आणि ते स्वतःच मशिनगन हातात घेऊन गोळ्या झाडात शत्रूवर तुटून पडले. नेमकी तेव्हाच त्यांच्या डोक्यात आणि छातीत गोळी लागली. शत्रूच्या गोळीने जदुनाथ यांना आपले प्राण सोडावे लागले.
जदुनाथ यांनी प्राण गमावले तेव्हाच बॅकअप म्हणून पाठवलेली तुकडी तिथे पोहचली आणि त्यांनी लढत देत पाकिस्तानचा हा तिसरा ह*ल्ला मोठ्या ताकदीने परतावून लावला होता.
हे सगळं केवळ जदुनाथ यांच्या कामगिरीमुळे शक्य झालं होतं.
६ फेब्रुवारी १९४८ रोजी देशावर आपले प्राण ओवाळून टाकणाऱ्या नायक जदुनाथ सिंग यांना भारतीय सेनेच्या सर्वोच्च परमवीरचक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारत पाकिस्तान यु*द्धात काश्मीरला पाकिस्तानपासून वाचवणाऱ्या सैनिकांच्या यादीत आजही नायक जदुनाथ यांचं नाव आदराने घेतलं जातं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.