आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगभरातील इतिहासात काही व्यक्ती अशा होऊन गेलेल्या असतात, ज्यांचे त्यांच्या चांगुलपणासाठी स्मरण केले जाते. तर, काही व्यक्ती अशा असतात, ज्या त्यांच्या विक्षिप्त वागण्यामुळे लक्षात राहतात.
व्यक्तीव्यक्तीतील हा स्वभावभेद तर कायम राहणार आहे. चागंल्या व्यक्तींच्या जीवनप्रवासावरून आपण प्रेरणा घेतो, पुढील पिढ्यांनीही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा म्हणून प्रयत्न करतो. पण, विक्षिप्त, सनकी, क्रूर लोकांच्या चरित्राचा अभ्यास फक्त त्यांच्या क्रूरतेमुळे अनेकांना कशा हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या हे समजून घेण्यासाठी आणि तशा पद्धतीचे कृत्य आपल्या किंवा इतरांच्या हातूनही होऊ नये म्हणूनच केला जातो.
सत-असत या मानवी जीवनाच्या दोन प्रवृत्तींचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. इतिहासात असे अनेक राजे होऊन गेले ज्यांनी जनकल्याणाचा आदर्श आपल्या समोर ठेवला. पण, असेही काही राजे होऊन गेले ज्यांनी राजा किंवा शासक कसा नसावा याचे उदाहरण घालून दिले.
अशाच उदाहरणांपैकी एक उदाहरण आहे तिसरा रोमन सम्राट कालिगुला याचे. कालिगुलाचे पूर्ण नाव जुलियस सीझर जर्मेनिकस होते. काही काळाने तो कालिगुला या टोपण नावाने प्रसिद्ध झाला.
त्याची राज्यकारभाराची आणि न्याय देण्याची पद्धत पाहून जनता त्याला वेडा राजा म्हणत असे. याचा जन्म इसपू १२ मध्ये झाला. महान राजा ज्युलियस सीझरचा हा पणतू. याचे वडील देखील प्रजाप्रीय होते. कालिगुला तीन वर्षाचा असल्यापासून त्याचे राज्यकारभाराचे शिक्षण सुरु करण्यात आले होते.
कालिगुलाच्या आजोबांनी आपल्यानंतर साम्राज्याची सूत्रे कालीगुलाचे काका टायबेरीयस याच्याकडे सोपवली. पण टायबेरीयसदेखील एक क्रूर शासक निघाला. त्याच्या अन्यायाला जनता पुरती कंटाळली होती. जनतेचा रोष पाहून टायबेरीयसला वाटत असे की त्याचा काटा काढून जनता त्याच्या जागी त्याच्या भावाची निवड करू शकते. याच भीती पोटी त्याने आपल्या भावाचा म्हणजे कालिगुलाच्या वडलांचा वध केला.
इतकेच नाही तर, त्याने भावाची बायको आणि मुलांना कैद केले. त्यांचा अनन्वित छळ केला. कालिगुलाच्या आजीने कालिगुलाला टायबेरीयसपासून लपवून ठेवले आणि त्याचा सांभाळ केला. मोठा झाल्यावर कालिगुलाच्या पराक्रमाने खुश होऊन टायबेरीयसने त्याला आपल्या राज्यात बोलावून घेतले.
कालिगुलाला आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा सूड उगवायचा होता. मनात सुडाची भावना घेऊनच तो टायबेरीयसला भेटण्यासाठी गेला.
योगायोगाने टायबेरीयसने कालिगुलालाच आपला वारस घोषित केले. अर्थात जनता त्याच्या रुपात त्याच्या आदर्शवत वडलांनाच पाहत होती. पण, टायबेरीयसच्या मृत्यूनंतर कालिगुलाने टायबेरीयसच्या वारसांना संपवले. रोमचा पूर्ण कारभार त्याने आपल्या हाती घेतला.
सुरुवातीला त्याने जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना आखल्या. जनतेच्या मनोरंजनासाठी विविध स्पर्धा भरवणे, कुस्त्या आयोजित करणे, नाटकासारख्या मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, अशा कितीतरी गोष्टी तो करत असे.
त्याच्या शासनकाळात प्रजा आनंदात होती. पण, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. सत्तेवर येताच काही दिवसांत कालिगुला आजारी पडला. सहा महिने तो या आजारातून उठलाच नाही. सहा महिन्यांनी त्याचे शारिरीक स्वास्थ्य हळूहळू पूर्व पदावर येऊ लागले. पण, याकाळात कालिगुलाच्या मानसिक स्वास्थ्यावर मात्र प्रचंड विपरीत परिणाम झाला. आजारी पडण्यापूर्वीचा कालिगुला आणि आजारी पडल्यानंतरचा कालिगुला यांच्यात फार मोठा फरक पडला होता.
कालिगुलाची शरीरयष्टी किरकोळ होती. त्याचे डोळे खोबणीत बसवल्याप्रमाणे दिसायचे. त्याचा चेहरा देखील सुमार होता. शिवाय, आजारीपणामुळे त्याचा स्वभाव प्रचंड चिडखोर बनला होता. त्याच्यातील क्रूरता बाहेर पडू लागली.
त्याच्या समोर कुणी बकरीचे नाव काढले तरी, तो थेट त्याला फाशीची शिक्षा सुनावत असे.
कालिगुलाच्या स्वभावात अचानक असे टोकाचे बदल दिसू लागले. त्याने आपल्या जनतेवर जुलूम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला जनतेच्या सोयीसाठी त्याने काही कर रद्द केले होते. पण, त्याच्या चैनिखोर स्वभावामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट जाणवू लागल्यावर त्याने जनतेवर अन्यायकारक कर लादले.
तो अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात सोन्याची नाणी टाकत असे. पाणी पिताना त्यात वितळलेले मोती टाकत असे. कुठेही जायचे असेल तेव्हा तो शाही मेणा वापरत असे. चालता चालता अचानक आपल्या मंत्र्यांना घोड्यावरून उतरून पायी चालावयास लावत असे.सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल त्याला खूपच घृणा वाटत असे. लांब केस असलेल्या व्यक्तीचे जबरदस्ती मुंडन करवून घेत असे. असे त्याच्या लहरीपणाचे अनेक किस्से आहेत.
कालिगुला हा नीतिभ्रष्ट राजा होता. त्याने स्वतःच्या बहिणीशी अनैतिक संबंध ठेवले होते. तिच्या मृत्यूनंतर त्याने तिचे मंदिर बनवले आणि त्याला प्रेमाची देवता असे नाव दिले. त्याने चार विवाह केले. एका स्त्रीला तिच्या लग्नमंडपांतून पळवून आणून त्याने तिच्याशी त्याच दिवशी विवाह केला. त्याची चौथी पत्नी मिलोनिया खूप सुंदर होती असे म्हणतात. आपल्या पत्नीचे सौंदर्य आपल्या मित्रांनीही पाहावे म्हणून त्याने तिला आपल्या मित्रांसमोर नग्न परेड करावयास लावले होते.त्याच्या अशा कृत्यांमुळे जनता त्याला एक नीतिभ्रष्ट राजा समजत असे.
कालिगुलाला घोड्यांचे विशेष आकर्षण होते. तो घोड्यांच्या सहवासात रमत असे. घोड्यांच्या शर्यतीवर तो खूप पैसा लावत असे. त्याच्या मित्रांसमवेत तो नेहमी हा खेळ खेळत असे. जर, एखाद्या शर्यतीत मित्राचा घोडा जिंकलाच तो त्याला ठार करून टाकत असे. असे म्हटले जाते की त्याने आपल्या मंत्रीमंडळात एका घोड्याची नेमणूक केली होती.
तो स्वतःला देव समजत असे. त्याला वाटत असे की जनतेने त्याची मंदिरे बांधावीत आणि देवाप्रमाणे त्याची पूजा करावी. त्याने स्वतःच स्वतःची मंदिरे उभारली. जो कुणी त्याची पूजा करण्यास नकार देईल त्याला तो मृत्यूदंड ठोठावत असे.
रोमन जनतेला त्याच्या राज्यात सुखाने श्वास घेणे देखील कठीण झाले होते. त्याच्या जनतेनेच या पापी दुष्ट राजाचा बदला घेण्याचे कारस्थान रचले.
इस. ४१ मध्ये जनतेच्या पाठींब्याने त्याच्याच काही सरदारांनी त्याचा खून केला. त्याची पत्नी आणि त्याच्या मुलीलादेखील मारून टाकण्यात आले. कालिगुलाच्या मृत्युनंतर रोमन सम्रज्याची सूत्रे क्लॉडियस या ज्येष्ठ सरदाराकडे सोपवण्यात आली. क्लॉडियसच्या रुपात रोम साम्राज्याला एक चांगला शासक भेटला.
लहान वयातच कालिगुलाच्या कुटुंबावर जे काही आघात झाले त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडत गेले असावे असा काही लोकांचा अंदाज आहे. म्हणूनच त्याने स्वतःतील क्रौर्याला खुलेपणाने बाहेर आणले. परंतु, त्याचे हे अजबगजब किस्से ऐकून कोणीही त्याला सनकी आणि एक दुष्ट राजा नक्कीच म्हणेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.