आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारत हा इंग्रजांच्या ताब्यात असल्याने त्यांची वसाहत होता. या युद्धात भारताचे सैन्य इंग्रजांच्या वतीने सहभाग घेईल असे इंग्रजांनी जाहीर केले. अर्थात युद्धात भारताला सहभागी करून घेण्याची घोषणा करण्यापूर्वी इंग्रजांनी भारतीयांना विश्वासात घेणे आवश्यक समजले नाही. भारतीय कॉंग्रेसने आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांच्या या निर्णयाला विरोध केला. मात्र युद्धानंतर देशाला स्वातंत्र्य देण्याच्या बोलीवर इंग्रजांनी कॉंग्रेसची समजूत काढली. या युद्धात भारतीय सैनिकांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करून इंग्रजांना अनेक आघाड्यांवर विजय मिळवून दिला.
या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना ब्रिटीश लष्कराने व्हिक्टोरिया क्रॉस या अत्युच्च सन्मानाने गौरवले. भारतातील नऊ सैनिकांना हा सन्मान बहाल करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्राच्या नामदेव जाधव या थोर सुपुत्राचाही समावेश होता. नामदेव जाधव यांच्या पराक्रमाची ही गाथा आज खूप कमी लोकांना माहिती आहे.
या युद्धात भारताने इंग्लंडला मदत केल्यास ब्रिटीश भारताला स्वातंत्र्य बहाल करतील असे वचन ब्रिटीशांनी दिल्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या वतीने १ करोड भारतीय सैनिक उत्तर आफ्रिका, मध्य आशिया आणि युरोप अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. उत्तर आफ्रिकेनंतर ब्रिटीश सैन्याने सिसिलीमार्गे इटलीवर हल्ला चढवला. तो दिवस होता ९ एप्रिल १९४५चा, ब्रिटीश भारतीय सैनिक इटलीच्या सिनिओ नदीकाठी तळ ठोकून बसले होते आणि पलीकडून जर्मन सैन्याने मशीनगनचा मारा सुरू केला होता.
या हल्ल्यात दोन ५व्या मऱ्हाटा इन्फंट्रीचे तीन सैनिक जखमी झाले होते त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती. यातील एका सहकाऱ्याला त्यांनी आपल्या खांद्यावर घेतले आणि नदीतून ते दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ लागले. पलीकडून सतत गोळीबार सुरूच होता.
तरीही त्यांनी एकेक करून तीनही सैनिकांना आपल्या पाठीवरून नदीच्या पल्याड नेले आणि पुन्हा मागे येऊन जर्मन लष्कराची तळी उध्वस्त केली. त्यांच्या या शौर्यामुळे मित्र राष्ट्राच्या सैन्याला पुढे मार्गक्रमण करणे सोपे झाले.
जर्मनचे लष्करी तळ पूर्णतः उध्वस्त केल्यावर नामदेव जाधव एका उंच ठिकाणी चढले आणि तिथून त्यांनी ‘बोला शिवाजी महाराज की जय!’ अशी आरोळी ठोकली.
९ एप्रिल १९४५ च्या संध्याकाळी ५ मऱ्हाटा लाईट इन्फंट्री कंपनीने सिनिओ नदीच्या पूर्व बाजूवर हल्ला चढवला. त्यानंतर बरोबर तीन मिनिटांनी ब्रिटीश सैन्याच्या आणखी एका कंपनीला पश्चिमेकडून हल्ला करायचा होता. सिनिओ नदीचे हे पात्र १५ फुट रुंद, ४ ते ५ फुट खोल तर त्याचे काठ ३० ते ३५ फुट उंचावर होते. नदीच्या दोन्ही तीरावर जर्मन सैन्यांनी लपून बसण्यासाठी बोगदे खोदले होते आणि ठिकठिकाणी सुरुंग पेरले होते. पलीकडून जर्मन सैन्य मशीनगनच्या सहाय्याने आग ओकत होते. अशात मऱ्हाटा इन्फंट्रीला नदी पार करण्याचे आदेश देण्यात आले.
मऱ्हाटा इन्फंट्रीचे सैनिक नदी पार करण्यासाठी नदीत उतरले मात्र पलीकडून होणाऱ्या मशीनगनच्या माऱ्यामुळे या कंपनीचे अनेक सैनिक जखमी झाले. कित्येक शहीद झाले. तरीही उरलेले सैनिक आगेकूच करत राहिले.
नामदेव जाधवांच्या हातालाही गोळी लागली होती. तेही जखमी झाले होते तरी त्यांनी एका जखमी सैनिकाला आपल्या पाठीवर घेऊन नदी पार केली. त्याला दुसऱ्या काठावर पोहोचवल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसऱ्या सैनिकाला नदी पार करवण्यासाठी पाठीवर घेतले आणि त्यालाही पलिकडच्या तीरावर सुखरूप पोहोचवले आणि मग तिसऱ्या सैनिकाला नेण्यासाठी त्यांनी १५ फुट रुंद असणारे ते नदीपात्र तिसऱ्यांदा पार केले. यावेळी नामदेव जाधव फक्त २३ वर्षांचे होते. दुसऱ्या काठावर जर्मन सैनिकांनी सुरुंग पेरले होते. तेही त्यांनी शिताफीने चुकवले. जर्मन सैन्याने त्याच्या कंपनीला पूर्णत: नेस्तनाबूत केले होते. तरीही नामदेव जाधव हातपाय गाळून बसले नाहीत.
हाताला दुखापत झाल्याने त्यांना मशीनगन चालवणे शक्य नव्हते तरीही ग्रेनेडच्या सहाय्याने त्यांनी शत्रूच्या मशीनगन नष्ट केल्या. त्यांच्याकडील ग्रेनेडचा साठा संपल्यानंतर त्यांनी पुन्हा माघारी जाऊन आपल्या तळावरून ग्रेनेड आणले आणि शत्रूच्या सगळ्या छावण्या नष्ट करून टाकल्या.
आपल्या जखमी सहकाऱ्यांनाही जीवनदान दिले. एकट्या सैनिकाने आपल्याच सहकाऱ्यांना वाचवणे आणि त्यात शत्रूचे तळ नष्ट करणे ही काही छोटी बाब नव्हती. यासाठी हवे प्रचंड धाडस, प्रसंगावधान आणि संयम! जाधवांकडे हे तीनही गुण पुरेपूर होते.
त्यांच्या या अतुलनीय पराक्रमाची दखल घेत ब्रिटीश लष्कराने त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च सन्मान बहाल केला. भारतीय लष्करातून नामदेव जाधव आपल्या मूळ गावी परत आले. आयुष्यभर तिथेच राहिले. आपल्याला मिळालेल्या या सन्मानाचा त्यांनी कधीच गर्व केला नाही.
१९५३ साली राणी एलिझाबेथच्या राज्याभिषेक सोहळ्याला त्यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. ब्रिटीश लष्कराने कधीच त्यांच्या या योगदानाचा विसर पडू दिला नाही. उलट दर दोन वर्षांनी त्यांना इंग्लंडच्या राणीच्या स्वागत समारंभासाठी आमंत्रण दिले जायचे.
२ ऑगस्ट १९८४ रोजी त्यांचे निधन झाले. तोपर्यंत इंग्लंडला नामदेव यांचा विसर पडला नव्हता आणि त्यानंतरही पडला नाही. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनीही त्यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी तुम्हाला काय हवे विचारले होते. जाधव म्हणाले, “मला काही नको पण माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या.” किती ती निस्वार्थ बुद्धी!
लष्करातून निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या मुलीसोबत वीरगाव येथे राहत असत. ब्रिटीश सरकारने नेहमीच त्यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांच्या कुटुंबीयाशीही सलोख्याचे संबंध राखले. त्यांच्या नातवाने गावातील मुलांना कंप्युटरचे शिक्षण देण्यासाठी कंप्युटर सेंटर सुरु केले. या सेंटरला मदत करण्यासाठी इंग्लंडहून ब्रिगेडियर री स्वतः आले होते. त्यांनी जाधव यांच्या नातवाला या कंप्युटर सेंटर साठी ३७,५०० रुपयांची मदतही केली.
पण नामदेव जाधव यांच्यासारख्या पराक्रमी व्यक्तिमत्वाची दखल घेणे भारतीय सरकारला जमलेच नाही.
खरे तर व्हिक्टोरिया क्रॉसच्या जोरावर जाधवांनी हवा तितका पैसा कमावला असता, पण ते पडले प्रामाणिक, इमानदार व्यक्ती. आयुष्यभर आपला साधेपणा आणि नम्रपणा त्यांना सोडता आला नाही. ब्रिटीश सरकारशी असलेल्या संपर्काचीही त्यांनी कधीच बढाई मारली नाही.
संगमनेर तालुक्यातील निमज या छोट्याश्या खेड्यात जन्मलेल्या जाधव यांनी आपल्या कर्तृत्वाने अटकेपार झेंडा लावला. त्याच्या हयातीत तरी त्यांची दखल घेणे शक्य झाले नसले तरी त्यांच्या पश्चात त्यांच्या या पराक्रमाचे आणि शौर्याचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्या गावी आज त्यांच्या नावाने एक ट्रस्ट चालवला जातो. या ट्रस्टच्या वतीने समाजोपयोगी कामे केली जातात. त्यांच्या असामान्यत्वाची जाण ठेवणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणे हे एक भारतीय नागरिक म्हणून आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.