आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
१९५० साली संविधान सभेने रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले जन-गण-मन या गीताचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला होता. आजही हेच गीत आपले राष्ट्रगीत म्हणून आपण गातो. लहानपणापासून भारताबद्दलचे अतूट प्रेम याच गीताने जगवले. परंतु, अलीकडे समाज माध्यमातून या गीताबद्दल चुकीची चर्चा केली जाते.
तुम्हीही बऱ्याचदा हे वाचले असेल की, रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत जॉर्ज पंचमसाठी लिहिले होते.
त्यामुळे या गीताचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करण्याबाबत अनेकजण प्रश्नचिन्ह निर्माण करतात. परंतु, खरेच रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत जॉर्ज पंचमसाठी लिहिले होते का? रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत कधी लिहिले आणि यातील ‘भारत भाग्यविधाता’ हे शब्द त्यांनी कुणासाठी लिहिले? जाणून घेऊया यामागील सत्य.
फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करत ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. याच नीतीचा अवलंब करत त्यांनी हिंदू-मुस्लीम फुट पडण्याच्या हेतूने १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली. या फाळणीला संपूर्ण भारतातून विरोध झाला.
लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल आणि लाल लजपतराय यांनी याविरोधात तीव्र आंदोलन केले. बंगालच्या फाळणीविरोधात केलेल्या या आंदोलनाला वंग-भंग आंदोलन म्हटले गेले.
१९११ मध्ये जनतेचा दबाव वाढल्याने बंगालची फाळणी रद्द करून बंगालचे पूर्व आणि पश्चिम भाग दोन्ही पुन्हा एकत्र करण्यात आले.
याचवेळी इंग्लंडचे शासक जॉर्ज पंचम भारत दोऱ्यावर आले होते. त्याच्या आदल्या दिवशीच २७ डिसेंबर १९११ रोजी कॉंग्रेसचे कलकत्ता येथे भरलेल्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी जन-गण-मन, हे गीत गायले होते.
लॉर्ड हार्डिंग्स यांच्या सांगण्यावरून जॉर्ज पंचमने बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तो भारत दौऱ्यावर आला होता. कॉंग्रेसच्या या राष्ट्रीय अधिवेशनात पंचमच्या या निर्णयाचे कौतुकही केले गेले. या अधिवेशनानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जॉर्ज पंचमचा दौरा होता. या दौऱ्यात त्याला खुश करण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांना त्याचे कौतुक करणारे एक गीत लिहून हवे होते.
त्यांनी यासाठी टागोरांना विनंती केली पण, टागोरांनी ही विनंती फेटाळून लावली.
टागोर ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर ब्रिटीशांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. परंतु टागोर त्यांच्या दबावापुढे झुकले नाहीत. त्यांनी बंगाली आणि संस्कृत अशा मिश्र भाषेत लिहिलेले जन-गण-मन हे गीत कॉंग्रेस अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी सादर केले.
जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी इंग्रजांनी दुसऱ्या कवीकडून एक गीत लिहून घेतले जे हिंदीत होते. ते गीत जॉर्ज पंचमच्या स्वागत समारंभात गाण्यात आले. त्या गाण्याचे बोल होते, ‘बादशाह हमारा.’
दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात टागोरांनीच लिहिलेले गीत या कार्यक्रमासाठी गाण्यात आल्याच्या बातम्या छापण्यात आल्या. अर्थात, ब्रिटीश शासनाच्या समर्थकांनी ही अफवा जाणूनबुजून पसरवली होती. ज्यामुळे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले जन-गण-मन हे गीत जॉर्ज पंचमसाठीच लिहिले असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
कॉंग्रेस अधिवेशन पार पडल्यानंतर अमृत बझार पत्रिकेने आपल्या बातमीत असे म्हटले होते की, ‘कॉंग्रेसच्या अधिवेशनाची सुरुवात रवींद्रनाथ टागोर लिखित गीताने करण्यात आली.’ तर इंग्लिश मॅनसारख्या ब्रिटीश समर्थक वृत्तपात्रांनी मात्र,
“कॉंग्रेसचे अधिवेशन टागोर यांनी लिहिलेल्या गीताने सुरु झाले. जॉर्ज पंचमसाठी लिहिलेले हे गीत ब्रिटीश प्रशासकांना खूप आवडले,”
असा खोडसाळपणा करत बातमी छापली. अशा वृत्तपात्रांनी छापलेल्या या खोडसाळ वृत्तांनीच हा वाद उभा केला आणि त्याला खतपाणी घातले. वृत्तपत्रे जेंव्हा शासकांची भाटगिरी करतात तेंव्हा काय गोंधळ उडू शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण ठरेल.
परंतु स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी ही अफवा खोटी असल्याचे म्हटले. ‘भारत भाग्य विधाता’ या शब्दसमूहाचे दोनच अर्थ होतात एक तर देशाची जनता किंवा सर्वशक्तिमान परमेश्वर. या शब्दसमूहाचा दुसरा कुठलाच अर्थ होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण खुद्द टागोरांनी दिलेले असूनही या गीताबद्दलच्या उलटसुलट चर्चा सुरूच राहिल्या.
खरे तर बंगाली साहित्याचा कुणीही विद्यार्थी सांगेल की भारत भाग्य विधाता म्हणजे काय. या घटनेला नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली तरीही हा वाद संपला नाही.
यानंतरही अनेकांनी हे गीत टागोरांनी जॉर्ज पंचमसाठी लिहिले नसल्याचे स्पष्टीकरणही दिले. तरीही या वादावर पडदा पडला नाही.
हे गीत त्यांनी जॉर्ज पंचमला उद्देशून लिहिले नसून भारताच्या अंगभूत शक्तीला आणि आणि ऐतिहासिक वैभवाला उद्देशून लिहिल्याचे त्यांनी स्वतःच म्हटले होते. भारताचे राष्ट्रगीत असलेल्या या गीतात भारत देश सुजलाम्, सुफलाम्, असल्याचे म्हटले आहे. या गीतात भारताच्या समृद्धीचे वर्णन करण्यात आले. तसेच भारतातील नागरिकांचे अनेक गुण या गीतात शब्दबद्ध करण्यात आले आहेत.
या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्वराला भारताच्या कल्याणासाठी साकडे घातले आहे. या गीतावरून सुरु झालेला वाद मिटवण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी १९३९ साली एक पत्र देखील लिहिले होते. या पत्रात टागोर म्हणतात, –
मला मूर्ख समजणाऱ्या लोकांना यावर स्पष्टीकारण देणे हा मी स्वतःचाच अपमान आहे असे मानतो.
भारताच्या घटना समितीने २४ जानेवारी १९५० रोजी देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून या गीताचा स्वीकार केला. रवींद्रनाथांच्या मूळ गीतात पाच कडवी आहेत. यातील पहिल्याच कडव्याचा स्वीकार राष्ट्रगीतासाठी करण्यात आला. बांगलादेशचे ‘आमार बांगला, शोनार बांगला’ हे राष्ट्रगीत देखील रवींद्रनाथ टागोरांनीच लिहिले आहेत.
एकाच कवीची दोन गीते दोन राष्ट्रांची राष्ट्रगीते बनली असे टागोर हे पृथ्वीतलावरील एकमेव कवी असावेत. १९१७ साली स्वतः टागोरांनीच या गीताला संगीत दिले होते. त्यानंतरच्या कॉंग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात या गीतानेच केली जायची.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.