आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांचा खूप मोठा वाटा असतो. त्यातही उत्तम पुस्तकांचा प्रभाव फक्त कोणा एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. वेदांचा, पुराणांचा पगडा आजही समाजावर पाहायला मिळतो. या ग्रंथांचे महत्व किंवा त्यांचा प्रभाव आज शेकडो नव्हे हजारो वर्षांनीही कमी झालेला नाही.
शेकडो वर्षात कित्येक पिढ्यांवर आपल्या विचारांचा छाप सोडणारा असाच आणखी एक प्रभावी ग्रंथ म्हणजे वात्सायनाचे कामसूत्र.
बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत आजही या पुस्तकाचा क्रमांक वरचा आहे. परंतु वात्सायनाचे हे कामसूत्र फक्त लैंगिक क्रिया आणि लैंगिक आनंद यावरच आधारलेले आहे असे नाही.
भलेही या पुस्तकाचे नाव कामसूत्र असेल पण यातील ‘काम’ म्हणजे संभोग असा संकुचित अर्थ नाही. तर काम म्हणजे इच्छा असा याचा अर्थ होतो. आपल्या इच्छा पूर्तीचे सूत्र म्हणजे कामसूत्र!
तरीही वात्सायनाने इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकात जो विषय हाताळला आहे, ते पाहता त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. जगातील सर्वच धर्मांनी कामेच्छा आणि कामजीवनाला तुच्छ मानले आहे.
कामजीवन म्हणजे भोगविलासात रममाण होऊन आत्मीय सुखाला मुकणे असा विचार जोर धरू लागला असतानाच वात्सायनाने अशा वातावरणात लैंगिक क्रिया हे परमसुख अनुभवण्याचा एक मार्ग असल्याचे म्हटले.
बहुधा सर्व धर्मांनी प्रजननासाठी आवश्यक क्रिया म्हणूनच लैंगिकतेला महत्त्व दिले. पण, लैंगिकता ही फक्त प्रजननासाठी केली जाणारी क्रिया नसून परमोच्च आनंदाच्या अनुभूतीसाठी आवश्यक असणारी क्रिया आहे, हे सांगण्याचे धाडस त्याकाळी वात्सायनाने केले.
वात्सायनाने कामक्रीडेला एका कलेच्या रुपात प्रकट केले. परंतु लैंगिक क्रियांवर इतक्या मुक्तपणे चर्चा करणारा वात्सायन आजीवन ब्रह्मचारी होता ही गोष्ट फारच थोड्या लोकांना माहिती असेल.
त्याने वेदांचाही प्रगाढ अभ्यास केला होता. महर्षी वात्सायनाने आकर्षणाचा सिद्धांत पहिल्यांदा मांडला. या सिद्धांताची वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करणारा तो पहिलाच ऋषी असावा. त्याच्या मते संसारिक जीवनात ज्याप्रमाणे आपण सर्व गोष्टींचा मनसोक्त आनंद लुटतो अगदी तसाच आनंद कामजीवनाच्या बाबतीतही घेतला पाहिजे.
नाहीतरी वेदात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चार पुरुषार्थांचे वर्णन केले आहे.
काम हा देखील एक पुरुषार्थ असल्याने त्याचाही मनसोक्त आनंद घेण्यात काहीच गैर नाही असे त्याचे मत होते. आयुष्यात आपण कधीच आपल्या कामेच्छांचा अनादर किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नये, असाही त्याचा सल्ला होता. कामजीवानावर वात्सायनाने अत्यंत तपशीलवार लेखन केले असले तरी त्याचा या क्रियेशी प्रत्यक्ष संबंध आला नाही.
असे म्हटले जाते की त्याने वेश्यालयात जाऊन तिथल्या नगरवधू आणि वेश्यांशी चर्चा करून या संबंधातील तपशील जमा केले होते. कामसूत्र चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याची कला शिकवते. विवाह संबंधात स्त्री पुरुषांनी एकमेकांना कसे सुख, समाधान दिले पाहिजे, एकमेकांचा आनंद टिकवून ठेवला पाहिजे यावरही या पुस्तकात बरीच माहिती दिली आहे.
पुरुषाने पत्नीशी समागम करण्यापूर्वी आणि नंतरही कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे याबाबतही सूचना या पुस्तकात दिलेल्या आहेत. वात्सायनाच्या मते प्रत्येक स्त्रीने विवाहापूर्वी त्याचे हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
पुरुषाला कसे सुखी समाधानी ठेवावे. त्याचे मन कसे जपावे. त्याला रती सुख देताना कोणती दक्षता घ्यावी यावरही या पुस्तकात सूचना देण्यात आल्या आहेत.
स्त्रियांचा इतर शास्त्राच्या अभ्यासाशी भलेही संबंध येत नसेल पण लैंगिक क्रिया ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार असल्याने त्यांनी या क्रियेतील कौशल्य प्राप्त करावे असा त्याचा विचार होता. या क्रियेतील माहिती जर स्त्रीला लग्नाआधीच मिळाली तर, लग्नानंतर पतीचे मन राखण्यात आणि आपल्याकडे त्याला आकृष्ट करण्यात तिला अडचण येणार नाही.
समाजात लैंगिक विषयावर खुलेपणाने बोलले जात नाही, हे वात्सायनाने ओळखले होते. अर्थात कदाचित लैंगिक बंधने आजच्या इतकी घट्ट नसतील म्हणूनच वात्सायनाला हे पुस्तक लिहिणे शक्य झाले असेल असेही म्हटले जाते. पण, लोकांनी लैंगिक क्रिया आणि त्यातील आनंद याविषयी उत्तमोत्तम माहिती जाणून घेणे गरजेचे आहे, या उद्देशाने त्याने हा ग्रंथ लिहिला. आजच्या काळातही या ग्रंथाची समर्पकता कमी झालेली नाही.
वात्सायनाने यात संभोगाचा आनंद लुटण्यासाठी कोणकोणती आसने करावीत याचे अत्यंत तपशीलवार वर्णन केले आहे. त्याने समलिंगी संबंध कसे असतात याबद्दलही सविस्तर चर्चा केली आहे. पण चर्चेअंती आपल्या संस्कृतीत असे संबंध त्याज्य असल्याच्याही सूचना दिल्या आहेत.
रती सुखाचा परमोच्च आनंद मिळवणे हा स्त्रियांचाही अधिकार असल्याचे त्याने म्हटले आहे.
म्हणून स्त्रियांनी आपल्या आनंदासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे याच्या टिप्सही त्याने दिल्या आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी स्त्रीने घरात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही यासंबधातही बरेच लिहिले आहे.
पत्नीने आपल्या पतीशी कसे वागावे, त्याच्या इच्छा कशा समजून घ्याव्या, पुरुषाच्या मन कसे जाणावे, परपुरुषाशी कसे वागावे, प्रियकराशी कसे वर्तन ठेवावे, याबद्दलही सल्ले दिले आहेत. विवाहित स्त्रियांनी परपुरूषांशी बोलणे त्याज्यच आहे, असे तोही मानतो. पण, हे सल्ले त्याने वेश्या आणि गणिकांसाठी दिले आहेत.
लैंगिक क्रियेतील आनंद हा संमतीनेच मिळवता येतो हेही वात्सायनाने आवर्जून लिहिले आहे. रती सुख हे ओरबाडून घेण्याची वस्तू नाही, त्यामुळे प्रणयासाठी स्त्री-पुरुष दोघांचीही संमती असणे किती महत्त्वाचे आहे, याचेही त्याने महत्व पटवून दिले आहे. या क्रियेतून दोघांनाही आनंद मिळाला पाहिजे.
स्त्रियांना जर नेहमीच या आनंदापासून वंचित ठेवत असेल तर पुरुष बदलूही शकतो असा इशाराही त्याने यातून दिला आहे.
पुरुषाने फक्त शरीरसंबंधासाठी स्त्री निवडताना कशी निवडावी आणि लग्न करताना स्त्री कशी निवडावी याबद्दलही त्याने लिहिले आहे. आपल्या पत्नीशी समागम करताना कोणते नियम पाळावे आणि वेश्येशी संबंध ठेवताना कोणते नियम पाळावे याबद्दलही त्याने बरीच माहिती दिली आहे.
वात्सायानाचे हे पुस्तक आजच्या काळात तर आवर्जून वाचले पाहिजे. यामुळे लैंगिक संबंधाबाबतचे अनेक गैरसमज दूर होऊ शकतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.