आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतातील विद्वानांनी अखिल विश्वाला अनेक अलौकिक गोष्टी दिल्या आहेत. यासाठीच भारताविषयी लिहिताना अनेक महान लेखक भारताला रत्नांची खाण असे संबोधतात.
याच रत्न मालेतील एक अनमोल रत्न म्हणजे “थोर गणिततज्ज्ञ रामानुजन श्रीनिवास अय्यंगार’.
रामानुजन श्रीनिवास अयंगार यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी सध्याच्या तमिळनाडू तर तेव्हाच्या मद्रास प्रांतातील इरोडे गावात झाला. त्यांचे वडील एका कापड दुकानात हिशोबनीस कारकून होते. रामानुजन यांचा गणिताचा वसा हा अनुवांशिकच असावा असं म्हणायला हरकत नाही.
रामानुजन बालपणीपासूनच गणितात हुशार होते, त्यांचे प्राथमिक शिक्षण इरोडजवळ असणाऱ्या कुंभ कोनम या गावात झाले. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, पण शिक्षणाच्या गोडीत ती कुठे फारशी आडवी आली नाही. बालपणी शिकत असताना वर्गात जेव्हा गुरुजी प्रश्नोत्तर करायचे तेव्हा रामानुजनकडे उत्तरे तयार असायची.
रामानुजन यांना अभ्यासात गोडी होती, विशेषतः गणितात अधिक रुची होती, याच बळावर ते शाळेतील शिक्षक वर्गाचे आवडते बनु लागले, एवढेच काय तर अनेक वेळा तर गुरुजींच्या शिकवणीवर प्रतिप्रश्न करून गणितातील प्रत्येक बाबी समजूनही घेऊ लागले.
त्यांच्या या उत्सुकतेमुळे हा मुलगा नक्की काही ना काही वेगळं करून दाखवणार हा विश्वास त्यांच्या शिक्षकांना होता.
प्राथमिक शिक्षण घेत असताना रामानुजन यांनी गणिताचा पाया भक्कम करून घेतला. माध्यमिक शिक्षणादरम्यान तर त्यांनी अनेक गणितीय प्रमेये मांडली. वयाच्या अवघ्या १२-१३ व्या वर्षीच लोनेची त्रिकोणमिती त्यांनी पूर्णपणे अभ्यासली व त्यावर व्यक्तिगत बदल घडवण्याचा प्रयत्न सुरु केला. अभ्यासातील पुस्तकाव्यतिरिक्तही त्यांनी अनेक सिद्धांत मांडले.
१५ व्या वर्षी एका गणित अभ्यासकाचा एक लेख त्यांनी वाचला त्यातून तर त्यांची गणित विषयीची आवड अधिकच बळावली.
विविध प्रकारच्या कल्पना वापरून कठीण गणितेही ते सहजपणे सोडू लागले.यातच ते मॅट्रिकची परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले, त्याकाळी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यास मद्रास प्रांतातील सुब्रह्मण्यम शिष्यवृत्ती मिळत असे.
ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. गणितातील आवड एवढी होती की महाविद्यालायाच्या निकालानंतर रामानुजन इंग्रजी, इतिहास या विषयांमध्ये कमी पडले. वडिलांना वाटले असे चालू राहिल्यास याला नोकरी कशी मिळेल, हा कमावणार काय?
रामानुजन यांना या गणिताच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या वडिलांनी रामानुजन यांचे लग्न लाऊन द्यायचे ठरवले. रामानुजन तयार नव्हते पण घरच्यांपुढे त्यांचे काही चालले नाही.
अखेर जानकी नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. आजपर्यंत एकटे होतो म्हणून भागात होते, आता दोनाचे चार झाले आहेत. कमावण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना उमजले होते, म्हणून त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
नोकरीची कागदपत्रे घेऊन ते अनेकदा सरकारी कार्यालयात जात पण त्यांना फार कोणी गांभीर्याने घेत नव्हते, अखेर मद्रास पोर्ट ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याला त्यांच्या गणितातील चपळाई विषयी समजले त्यांनी रामानुजन यांना २५ रुपये प्रती महिना असलेली कारकुनाची नोकरी देऊ केली.
रामानुजनांची गणिताची आवड काही केल्या कमी होत नव्हती, पण आपली आवड जर योग्य असेल तर त्यासाठी सवड मिळतेच.
रामानुजन यांचे गणितातील ज्ञान आश्चर्यकारक होते, त्यांच्या गणितावर प्रभावित होऊन त्यांच्या या कलेचा वापर आपण इंग्लंडसाठी करू शकतो. या विचारातून ब्रिटीश अधिकारी असलेल्या लॉर्ड डे याने आपले विशेष अधिकार वापरून रामानुजन यांना ७५ रु मासिक शिष्यवृत्ती मिळवून देत विलायतेस जाण्याची व्यवस्था करून दिली.
रामानुजन यांना आपण गणितासाठी भरीव काम करतोय याचा आनंद होता. ते तात्काळ तयार झाले, ठरल्याप्रमाणे १७ मार्च १९१४ रोजी ते इंग्लंडला रवाना झाले.
तेथील विद्यापीठात गणितीय संशोधन करत ते बी.ए. उत्तीर्ण झाले. ज्या अधिकाऱ्याने रामानुजन यांना पहिल्यांदा कारकुनाची नोकरी दिली होती, त्यांना ही बाब समजल्यावर अतीव आनंद झाला, त्यांनी आपल्या वरिष्ठांना विनंती करून रामानुजन यांची शिष्यवृत्ती ७५ रुपयांवरून वाढवून २५० रुपये केली.
रामानुजन गणितात इतपत विद्वान झाले होते की त्यांनी त्याच विद्यापीठातील जगप्रसिद्ध गणित अभ्यासक व संशोधक असणाऱ्या डॉ. हार्डी यांना काही समीकरणे आठवून देत आपले सिद्धांत सिद्ध केले. प्रथम दर्शनी हार्डी यांचे सहकारी लिटीलवूड यांनी यावर फारसे लक्ष दिले नाही पण हार्डी यांना यात तथ्य जाणवू लागले.
त्यात अविभाज्य संख्या, अतिगुणोत्तरीय मालिका, मॉडय़ुलर फंक्शन, लंबगोलीय भूमिती, रेईमन सारणी, हायपरजॉमेट्रिक सारणी यांचा समावेश होता. हार्डी यांनी यासाठी रामानुजन यांचे कौतुक केले.
रामानुजन यांनी मांडलेले सिद्धांत, त्यांच्या गणितविषयी संकल्पना, प्रमेय यांना विद्यापीठाची अधिकृत मान्यता मिळाली, आणि यातूनच रामानुजन “माननीय रामानुजन” म्हणून सर्वश्रुत झाले.
रामानुजन यांनी आपले संपूर्ण आयुष्य गणितातील अमुलाग्र बदल, संशोधन यांसाठी खर्च करण्याच जणू काही संकल्पच केला असावा, या प्रमाणे ते काम करताच राहिले.
इंग्लंडमधील जीवनमान म्हणा वा वातावरण, हे आपल्या देशासारखे नाहीये, याचा काहीसा परिणाम रामानुजन यांनाही जणू लागला. एकदा काही कारणाने ते आजारी पडले.
डॉक्टरांकडे जाऊन तपासल्यानंतर रामानुजन यांना क्षयरोगाची लागण झाली आहे, काळजी घ्या असे डॉक्टरांनी सांगितले.
इंग्लंडमध्ये तेव्हा कडाक्याची थंडी पडली होती, मान्साहारानंतर थंडी जाणवत नाही असा सल्ला त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रामानुजन यांना दिला. पण रामानुजन हे ब्राह्मण होते मांसाहार करणे त्यांना वर्ज्य होते. त्यांनी हा सल्ला मानला नाही. कडाक्याची थंडी त्यातच जडलेला क्षयरोग यामुळे ते खचत होते, त्यांना प्युटनी नावाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्याकाळी क्षयरोगावर म्हणावा तसा उपचार उपलब्ध नव्हता. रामानुजन यांना आता वेदना असह्य वाटू लागल्या.
त्यांनी भारतात परतण्याच्या निर्णय घेऊन तसे एक विनंतीपत्र विद्यापीठाला धाडले, प्रशासनानेही त्यांचा सन्मान राखत त्यांना परतण्याची परवानगी दिली.
रामानुजन भारतात परतले, आजार अधिकच तीव्र होऊ लागला, अशा परिस्थितीतही रामानुजन यांनी गणितावर काम बंद केले नाही. गणिताबरोबर रामानुजन यांना ज्योतिष्यशास्त्राचाही काहीसा छंद जडला होता.
उपलब्ध आकडे व त्यांच्यासाठी असणारे ग्रंथ संदर्भ यांचा कस लावत १७२९ या अंकावर असेच एक अंकगणिती भविष्य मांडले.
तेव्हापासून १७२९ ह्या अंकाला रामानुजन अंक असे नाव लौकिक प्राप्त झाले.
अखेर २६ एप्रिल १९२० ला रामानुजन यांनी शेवटचा श्वास घेतला. रामानुजन यांच्यासारखे थोर गणिततज्ञ भारतात जन्माला आले हे खरंतर आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, म्हणूनच रामानुजन यांच्या सन्मानार्थ स्वतंत्र भारतात २२ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय गणित दिवस” म्हणून साजरा केला जातो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.