आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर मानवी वस्ती करण्याची महत्त्वाकांक्षा गेली अनेक शतकं मानव बाळगून आहे. मार्स वन या प्रकल्पानं हे स्वप्न वास्तवात आणण्याचं स्वप्न तमाम पृथ्वीकरांना दिलं मात्र अखेरीस हा फ़ुगा फ़ुटून हे स्वप्न स्वप्नच उरलं. चार वर्षांपूर्वी मार्स वन या प्रकल्पानं जगभरात धुमाकूळ घातला होता. मार्स वनविषयी बातमी नाही असा एकही दिवस जात नसेल. या अनोख्या प्रकल्पानं अक्षरश: लोकांना सातव्या आसमानात नेऊन बसवलं होतं.
काय होता हा प्रकल्प की ज्यानं पृथ्वीवरचे लोक खुळावले होते?
एक छोटी आणि खाजगी डच कंपनी या सगळ्या गोंधळाला कारणीभूत ठरली होती. या कंपनीने एक जगावेगळा दावा केला गेला होता. हा दावा होता मंगळ ग्रहावर स्वत:च्या मालकीची जमीन विकत घेण्याचा! ही कल्पनाच इतकी रम्य होती की भल्याभल्यांना याचा मोह आवरता आला नाही. गुंतवणूकदारांकडून मंगळावरच्या प्रकल्पासाठी भांडवल गोळा करण्यात आलं होतं.
या प्रकल्पाद्वारे असा दावा करण्यात आला होता की मंगळावर कायमस्वरूपी मानवी वसाहत निर्माण केली जाणार असून अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच साकार करण्यात येणार होता. २०१२ साली या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. अर्थातच या प्रकल्पात पुढे काहीच घडलं नाही आणि २०१९ ला हा प्रकल्प अधिकृतरित्या दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात आला.
मात्र या अनोख्या प्रकल्पानं कोट्यावधी डॉलर्सचं भांडवल जमा केलं. मार्स वनमधे दोन कंपन्यांचा सहभाग होता. नॉट फ़ॉर प्रॉफ़िट मार्स वन फ़ाऊंडेशन आणि मार्स वन व्हेंचर्स. नेदरलॅण्डस येथे असणार्या या कंपनीत केवळ चार कर्मचारी होते. या प्रकल्पाच्या घोषणेमागोमाग अनेक माध्यमांनी याचा समाचार घेण्यास सुरवात केली होती. वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी, सीएनएन, फॉक्स न्यूज आणि इतर बर्याच मिडिया संस्थांद्वारे वैज्ञानिकांना निर्दयपणे – आणि नियमितपणे या प्रकल्पातील दोष दाखवले.
आता दिवाळखोरीमुळे तर या प्रकल्पानं दिलेली खोटी वचनंदेखील संपुष्टात आलेली आहेत. स्वित्झर्लंडमधील बेसल शहर दिवाणी कोर्टाच्या आदेशानुसार स्विस वृत्तपत्र लॅन्डबोटे आणि रेडडिटवर ही बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. १५ जानेवारी २०१९ रोजी या कंपन्यांची अधिकृतरित्या दिवाळखोरी घोषित केली आहे. यांच्या खात्यात 25,000 डॉलर्सपेक्षा कमी रक्कम असून कंपनी आता डिजॉल्व्ह करण्यात आली आहे.
नेमकं काय झालं?
सुरवातीला खळबळ माजवल्यानंतर मार्स वन एकदमच थंड पडलं होतं. काही तुरळक प्रेस रिलिज वगळता विशेष अशा बातम्या येत नव्हत्या. या कंपनीचे संस्थापकही जाहिररित्या या प्रकल्पाविषयी काहीही बोलत नव्हते. जणू काही त्यांनी मार्स वनविषयी मौन बाळगलं होतं. हे लक्षण काही ठीक दिसत नव्हतंच. त्यात २०२० साली एक रोबोटिक मिशन मंगळावर लॉन्च करणार असल्याच्या “महत्वाच्या” बातमीव्यतिरिक्त फ़ारशी काही डेव्हलपमेंट नव्हती.
२०१२ साली पहिल्यांदा मंगळावर सामान्य माणूस पाऊल ठेवणार अशा हेडिंगखाली बातम्या आल्या आणि जगभरातल्या लोकांचं लक्ष या बातमीनं वेधून घेतल. या योजनेनुसार पृथ्वीवरून माणसांना मंगळावर ट्रीपसाठी पाठवण्यात येणार होतं. हा प्रकल्प आणि त्या संदर्भातली बातमी, दोन्हीही उत्कंठावर्धक, रोमांचक असल्यानं जगभरातल्या माध्यमांनी याची दखलही घेतली आणि पाठपुरावाही केला.
या प्रकल्पानुसार पृथ्वीवरून मंगळावर २०२३ साली पहिले रहिवासी पाठवण्याची योजना होती. मंगळावर काही यंत्रसामग्री आणि रोबोटिक यंत्रणा पाठवून मानवी वसाहतीस मदत होतील अशा सोयी करण्याची प्राथमिक टप्प्यातील योजना जाहीर केली.
सहाजिकच या योजनेसंदर्भात माध्यमांनी प्रश्न उपस्थित करायला सुरवात केली. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता की, ही यंत्रणा कोण विकसित करणार आहे? या सगळ्यासाठी जो निधी लागणार आहे तो कशाप्रकारे उभारण्यात येणार आहे? यावर या प्रकल्पाचा एक संस्थापक सदस्य असणार्या लान्सड्रॉप याचं उत्तर होतं की हा संपूर्ण प्रकल्प “सेल्फ़ फ़ंडिंग” असून प्रत्यक्षात मंगळावर जाण्यापूर्वी लोकांचं प्रशिक्षण अंतराळ संशोधकांद्वारे केलं जाणार असल्याचं त्यानं एका टिव्ही शोमधे प्रात्यक्षिकासहित दाखविलं.
मार्स वनने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलं की, मार्स वन, भविष्यातील अंतराळवीरांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देईल. याचा उद्देश हाच आहे की, मंगळासारख्या परग्रहावर मानवी वसाहत निर्माण करून तिथे एक वेगळा, नवा समाज प्रस्थापित करणे हा आहे.
मार्स वनची २०१२ मध्ये घोषणा झाल्यानंतर ते काही वर्ष शांत बसले. २०१५ पर्यंत, त्यांनी प्रसिद्धीकृत अर्ज प्रक्रियेनंतर, त्यांनी अंतिम १०० स्वयंसेवकांची घोषणा केली जी मंगळावर कंपनीच्या कार्यासाठी प्राथमिक प्रशिक्षण देणार होती. या १०० जणांनी मीडियाचे लक्ष वेधून घेतले. ते विविध टॉक शोमध्ये उपस्थित राहत होते. विविध वृत्तपत्रांनी त्यांची संपूर्ण माहिती देणारी प्रोफाइल बनविली.
हे सगळं घडत असतानाच या प्रकल्पाला तडे पडायला सुरवात झालेली होती. २०१४ मधे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी) यांनी या मिशनच्या व्यवहार्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा अहवाल सादर केला. या अहवालात या प्रकल्पावर सडकून टिका करण्यात आली होती.
या अहवालात असे नमूद केलं होतं की साधारण ६८ दिवसातच पहिल्या वस्तीतील लोकांचा गुदमरून मृत्यू होईल. कारण या निवासी वस्तीसाठी जी यंत्रणा उभी रहाणार आहे तिचं आयुष्यच मर्यादित असणार आहे.
हे कमी होतं म्हणून की काय, त्या १०० निवडलेल्यांपैकी एक, जोसेफ़ रोश, यानं फ़सवणुकीचा प्रकार असल्याचं जाहीर केलं. त्याच्यामते ते मर्चंडाईस विक्रीच्या प्रयत्नात समर्थकांवर दबाव आणत आहेत. रोश यांच्या म्हणण्यानुसार, “निवड प्रक्रियेच्या प्रत्येक फेरीमधून जावं लागेल आणि या फ़ेर्यांसाठी तुम्हाला गुण मिळतील आणि या फ़ेर्यांत अधिकाधिक गुण मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मार्स वनकडून माल खरेदी करणे किंवा त्यांना पैसे दान करणे” रोशो यांच्या खुलाशानंतर या प्रकल्पावर जे प्रश्नचिन्ह होतं ते अधिकच अधोरेखित झालं.
या सगळ्याचा क्लायमॅक्स २०१५ च्या उत्तरार्धात चालू झाला आणि याला कारण ठरलं, MIT सोबत झालेला टोकाचा वाद!
दोन संशोधकांनी एकामागे एक लॅन्सडॉर्पच्या प्रकल्पातील त्रुटी जाहीर करायला सुरवात केली. त्यानंतरच्या काही वर्षांत, मंगळावर मनुष्याने मंगळ पाठवण्याच्या नियोजित तारखेला पुन्हा पुढे ढकलले गेले. २०१७ साली त्यांचं शेवटचं प्रेसरिलिज प्रकाशित झालं यात या मोहिमेसाठी नवीन महसूल अंदाज जाहीर केला होता. त्यानंतर थेट या प्रकल्पाच्या दिवाळखोरीचीच बातमी आलेली असून एका रोमांचक मात्र वास्तवात न आलेल्या प्रकल्पाचा शेवट झालाच.
गेल्या काही वर्षांत मंगळ ग्रहाविषयी एक प्रकारचं कुतुहल मानवाला आहे. मंगळ मोहिमा आणि तिथे मानवी वसाहतीला पुरक असणर्या गोष्टी याविषयी बरेच बोललं जातंय. या कल्पनेतूनच मंगळावर मानवी वसाहतीची कल्पना आली असावी. अनेकांना या प्रकल्पानं आकुष्ट केलं आणि मंगळावर आपण राहू शकतो या भोळ्या आशावादामुळे लोकांनी या प्रकल्पाला साथ दिली.
सत्य काहीही असो, ही गाथा आता संपली आहे. मात्र भविष्यात योग्य ते तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा करून मंगळावर मानवी वसाहत साकार करण्याचा उत्साह तसाच राहिल यात शंका नाही!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.