आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतावर अनेक वर्षे वेगवेगळ्या शासकांचे राज्य होते, काही राजवंशांनी शतकानुशतके या देशावर राज्य केले तर काही राजवंश फार अल्पकाळ सत्तेत राहिले. पण भारताच्या भूमीवर राज्य करणाऱ्या अनेक वंशापैकी एक वंश गुलामांचा देखील होता. एकेकाळी राजाच्या नंतर त्याचा गुलाम सत्तेत येऊन बसला होता व पुढे त्याने त्याचा वंश चालवला होता.
मामलुक वंश हा भारताच्या इतिहासात दास वंश अथवा गुलाम वंश म्हणून ओळखला जातो. इथे गुलाम म्हणजे घरकाम करणारे दास नव्हते, या लोकांना अरबस्तानातून खरेदी करण्यात आले होते.
हे लोक भारतात सुलतानांच्या सैन्य दलात सैनिक म्हणून काम करायचे. काही काळाने याच गुलामांनी मुसलमान राजवटीच्या राजकारणावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इतकेच काय ते बादशाहसुद्धा बनले.
नवव्या शतकात मुस्लिम शासक मोठ्या प्रमाणात या गुलाम विकत घ्यायचे. अल मुतासिम या बगदादच्या शासकाने गुलाम ठेवायला सर्वप्रथम सुरुवात केली होती. यानंतर सगळ्याच मुस्लिम राजांनी गुलाम ठेवायला सुरूवात केली. काही काळाने या गुलामांचा राजकीय सहभाग वाढला. तेराव्या शतकात तर इजिप्त आणि भारतात गुलाम सत्तेत आले, इतके ते शक्तिशाली झाले.
मोहम्मद घोरीच्या विजयानंतर १५२६ पर्यंत भारतावर मुसलमान सुलतान राज्य करत होते. या काळात पाच वंशांनी राज्य केले त्यापैकीच एक होता गुलाम वंश!
मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्याचा कुठलाच उत्तराधिकारी नसल्याने त्याच्या सरदारांत गादीसाठी लढाया सुरू झाल्या. अनेकांनी आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. गझनवीच्या जागेवर ताजुद्दीन यालदुजने सत्ता सांभाळली, महंमद बिन बख्तियार खिलजीने बंगालवर वर्चस्व मिळवले. १२०६ साली दिल्लीच्या मोहम्मद घोरीच्या जागेवर गुलाम वंशाचा राजा कुतुबुद्दीन ऐबक सत्तेत आला.
कुतुबुद्दीन हा एक तुर्की गुलाम होता, मोहम्मद घोरीच्या अगोदर त्याने अनेक मुस्लिम शासकांकडे गुलामी केली होती. आपल्या कौशल्याचा बळावर त्याने घोरीच्या दरबारात मोठे नाव कमावले व काही काळाने त्याच्या गादीवर देखील जाऊन बसला. त्याने दिल्लीत वर्चस्व प्रस्थापित केले, इतकेच नाही तर इस्लामच्या प्रसारासाठी अनेक मोहिमा आखायला सुरुवात केली. त्याने अनेक मंदिरांचा वि*ध्वंस केला. आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याने ताजुद्दीनला पराभूत केले व त्याला अफगाणिस्तानला पिटाळून लावले.
असं म्हणतात की अफगाणिस्तान आणि भारताचे विभाजन होण्याचा काळ हाच होता. भविष्यात कुतुबुद्दीनचा १२१० साली पोलोसारखा एक खेळ खेळताना घोडयावरून कोसळला आणि या अपघातातच त्याचा मृत्यू झाला.
पुढे अरमशहा दिल्लीचा सुलतान बनला. पण त्याच्या ताब्यात जास्त काळ सत्ता टिकली नाही, त्यामुळे त्याला सत्तेचा ताबा सोडावा लागला. पुढे तो एका षडयंत्रापोटी मारला गेला. १२११ साली सुलतान इल्तुतमिश सत्तेत आला व त्याने १२३६ पर्यंत राज्य केले. या काळात गजनीचा व अफगाणिस्तानच्या सुलतानाचा पराभव करून त्याने आपले राज्य बळकट केले.
१२३६ साली रुकन-उद-दीन सत्तेत आला, पण तो फक्त चार महिने सत्तेत होता. त्यानंतर त्याचा जागी रझिया सुलतान या महिला शासकाने राज्य केले. ती अत्यंत पराक्रमी होती. १२३६-१२४० या काळात तिने राज्य केले, या काळात मलिक अलटूनिया नावाच्या राजाशी यु*द्धात ती पराभूत झाली आणि तिने त्याच्याशी विवाह केला. पुढे तिचा भाऊ मियुज-उद-दिन तिच्या विरोधात उभा राहिला. त्यामुळे तिने काढता पाय घेतला व अखेरीस तिचा एका दरोडेखोराच्या हातून खू*न झाला.
मियुज-उद-दिन सत्तेत आला खरा पण, त्याच्यासमोर मंगोलांचे मोठे आव्हान उभे होते. त्यांच्यासमोर याचा निभाव लागला नाही. त्यानंतर त्याला मंगोलांनी त्याला दिल्लीच्या सफेद किल्ल्यात कैद केले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्याजागी मंगोलांनी अल-उद-दीनला सत्ता दिली. त्याने चार वर्ष राज्य केले पण, त्याच्यावर सरदारांचे वर्चस्व होते.
त्याच्यानंतर नासिर महमूद सुलतान झाला याने देखील दीर्घकाळ सत्ता उपभोगली. पण त्याचा भाऊ घियाध-उद-दीन हाच मुख्य कारभार बघायचा. नासिरचा बहुतांश वेळ न्यायनिवाडा आणि दानधर्म करण्यात जात होता, त्याच्या मृत्युनंतर घियाध सुलतान बनला. त्याने पुढे १२८७ पर्यंत सत्ता उपभोगली. त्याच्या कार्यकाळात त्याने आपल्या सरदारांचा बिमोड करून एकछत्री अंमल प्रस्थापित केले.
मुयुज-उद-दीन-कुईकुबाद हा भारतावर राज्य करणारा शेवटचा गुलाम वंशाचा राजा होता, १२८७ ते १२९० या काळात त्याने राज्य केले.
पुढे खिलजी नावाच्या सरदाराने त्याची ह*त्या केली व अशाप्रकारे गुलाम वंशाचा अंत होऊन, खिलजी सत्तेवर विराजमान झाले.
असं मानलं जातं की मुयुजुद्दीनच्या ह*त्येनंतर गुलामवंश कायमचा संपला, त्याला कोणीही वारस शिल्लक राहिला नाही. एकेकाळी बाजारात ज्यांची विक्री केली जायची त्या गुलामांचा वंश सत्ताधीश बनला होता, ते ही ९० वर्षं, ही खरंतर महत्त्वपूर्ण अशी ऐतिहासिक घटना होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.