आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
निसर्गाचे चमत्कार घडण्याआधी मानवाची परवानगी घेत नसतात. निसर्ग नावाच्या कलाकाराला आपल्या कलेची दाद मिळावी अशीही अपेक्षा नसते. आपल्या खुजेपणाची जाणीव असलेले आपण मनुष्य मात्र निसर्गाची स्तुती करण्यात कसलीही कसर ठेवत नाही. याच नैसर्गिक चमत्काराचे आपल्याला असणारे कुतूहूलच आज आपल्याला प्रगतीपथावर आणुन ठेवणारे रसायन आहे हे ही खरंच.
असाच एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपल्या महाराष्ट्र राज्यात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरात सध्या बघायला मिळतो आहे. नेहमी हिरवे-निळे असणारे या सरोवराचे पाणी मागील काही दिवसात गुलाबी रंगाचे झाले आहे. जगभरातील वैज्ञानिक आणि जिज्ञासु लोकांना या घटनेने विचार करण्यास भाग पाडले आहे. आज आपण याच विलक्षण घटनेचा आढावा घेणार आहोत.
बुलढाणा जिल्ह्यात असणारे हे सरोवर स्वत:च एक अद्भुत रहस्य असुन त्याची निर्मिती ५०,००० वर्षांपुर्वी एका उल्कापाताने झाली. उल्कापातापासुन निर्माण झालेल्या या तलावाचा समावेश बुलढाणा वन्यजीव अभयारण्यात होतो. बाकी महाराष्ट्रात कुठेही न सापडणारी जैवविविधता या तलावाच्या परिसरात आढळते. पाण्याच्या विशिष्ट अंतर्गीक गुणांमुळे येथील जलसंपदा अतिशय वेगळी आणि आकर्षक आहे.
ब्रिटिश अधिकारी सीजेइ अलेक्झांडर याने या ठिकाणचा समावेश १८२३ साली विशेष भौगोलिक ठिकाणांमध्ये केला.
याच तलावाच्या आसपास असणाऱ्या दैत्यसुदन मंदिरांसारख्या अनेक प्राचीन मंदिरांचे अवशेष आजही इथे सापडतात. यावरुन या भागाचे असणारे धार्मिक महत्त्वही अधोरेखीत होते. अनेक अन्नसाखळ्या आणि विशिष्ट जलसंपदेमुळे या भागाचे पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे.
मागच्या काही दिवसात या तलावाच्या पाण्याचा रंग गुलाबी लालसर झाल्यामुळे सगळ्या जगाचे लोणारकडे लक्ष इकडे वेधले गेले आहे. यामागचे नेमके कारण काय हे अजुन तरी कोणालाही सांगता आलेले नाही, परंतु जलाशयात असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या शेवाळच्या प्रजातींमुळे हा बदल होऊ शकतो असं काहींचे म्हणणे आहे. तरीही पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्याशिवाय कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बेसॉल्ट खडकात उल्कापाताने तयार झालेले जगातील सगळ्यात मोठे जलाशय असणारे लोणार सरोवर दरवर्षी ४ लाख पर्यटकांना आकर्षित करते.
सरोवरात असणाऱ्या विशेष मीठाचा प्रकार आणि अल्कली गुणधर्मामुळे हा रंग बदलला असेल असाही एक अंदाज आहे. या घटकांनी हॅलोबैक्टेरिया या जीवाणूची वाढ होते. हा जीवाणू लाल रंगाचं एक द्रव्य तयार करतो ज्याने सुर्यप्रकाशाचे रुपांतर उर्जेत केले जाते.
भौगोलिक तज्ञ गजानन खरात यांच्या मते, क्षारतेत झालेल्या वाढीमुळे यावर्षी हा रंग जास्त लाल दिसत आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या ट्विटरच्या संकेतस्थळावर जाहीर झालेल्या एका वीडियोमध्ये गजानन खरात सांगतात की, “सरोवरातील पाण्याची पातळी यावेळी जास्त खाली गेली आहे. पाणी कमी असल्याने क्षारांचे प्रमाण खूप अधिक वाढले आहे. त्यामुळे पाण्याच्या अंतर्गत काही बदल झाले असण्याची शक्यता आहे.”
खरात यांच्या मते, तापमानात वाढ झालेली असल्यामुळे शेवाळ जास्त सक्रिय झाले असण्याची शक्यता आहे. या शेवाळाचा रंग उच्च तापमानात लाल होतो असे ते म्हणतात. तरीही अंतिम कारण हे पाण्याची तपासणी केल्यावरच कळेल असेही ते म्हणतात.
हा बदल तीव्रतेने होण्याचे अजुन एक कारण असु शकते ते म्हणजे राज्य सरकारने कोरोनाच्या प्रसारास रोखण्यासाठी जारी केलेले लॉकडाउन. पर्यटकांची गर्दी नसल्याने सरोवराच्या आसपास कुठलीही मानवी हालचाल आणि हस्तक्षेप नसल्यामुळे या रंगबदलाच्या प्रक्रियेस वेग आला असेही म्हटले जाते.
या बदलाचे नेमके कारण जाणुन घेण्यासाठी महाराष्ट्र वनविभाग खात्याने पाण्याचे नमुने गोळा करून ते नीरी (NEERI) म्हणजेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेकडे पाठवले आहेत. तसेच नीरी मधील काही वैज्ञानिकसुध्दा इथे जाऊन भेटी देणार असल्याचे सांगितले जात आहे.
पाण्याचा रंग गुलाबी होण्याचा हा प्रकार पहिल्यांदा नसला तरी त्याची तीव्रता यावेळी जास्त आहे असे परिसरातील नागरिक सांगत आहेत. निसर्गाचा हा अद्भुत आणि तितकाच विलक्षण चमत्कार बऱ्याच लोकांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. यामागचे कारण जाणून घेण्यासाठी आता संशोधकांच्या अहवालाची वाट बघितली जाते आहे.
निसर्गनियमांचे पुर्णपणे अवलोकन आपल्याला कधीच करता येणार हेच या चमत्कारातुन दिसत आहे. निसर्गाला कोणतीही सीमा नाही, त्याच्या चमत्कारांना कोणतीही सीमा नाही असेच तो सांगत असावा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.