आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
संपूर्ण स्त्रीजातीने मातृत्वाचा आदर्श घ्यावा, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचा रक्षक ज्यांनी घडवला, त्या जिजाबाई म्हणूनच मातृत्वाचा आदर्श आहेत. जिजाबाई या नावातच संपूर्ण जीवनाचे सार सामावलेले आहे.
जि म्हणजे जिवंतपणा,
जा म्हणजे जागरूकता,
बा म्हणजे बाणेदारपणा आणि
ई म्हणजे ईश्वरभक्ती.
जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी, १५९८ रोजी म्हाळसाबाई व लखुजीराव जाधवांच्या पोटी झाला. त्यांचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा. जाधव कुटुंब हे देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज. जिजाऊंचा विवाह १६०५ साली शहाजीराजे भोसले यांच्यासोबत देवगिरी येथे झाला.
खंडागळ्यांच्या हत्तीच्या प्रकरणात व्याह्यांनी एकमेकांवर तलवारी उपसल्या आणि डोळ्यातील पाणी आवरत पतिनिष्ठेला महत्त्व देत त्यांनी माहेरशी कायमचे संबंध तोडले. नात्यांना आणि भावनांना बाजूला सारत आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारची कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा हा गुण शिवाजी राजांमध्ये पूरेपूर आला होता.
तरणाबांड दत्ताजी मारला गेला म्हणून जाधव कुटुंब दुःखात होते व जवान संभाजीराजांच्या मृत्युने भोसले कुटुंब शोकाकुल होते. पण जिजाऊंचे काय? त्यांना सख्खा भाऊ दत्ताजीची ह*त्या झाल्याचे जेवढे दुःख होते, तेवढेच सख्ख्या भावाप्रमाणे निर्व्याज प्रेम करणाऱ्या चुलत दीर संभाजीच्या ह*त्येचे देखील होते. पण दुहेरी दुःखाच्या भरीला जे तिसरे दुःख होते, त्याला तर सीमाच नव्हती. ते दुःख होते मराठ्यांच्या अविचाराविषयी.
सगळीकडे उद्विग्न करणारी परिस्थिती असताना जिजाऊ गरोदर होत्या आणि बाळंतपणासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्याबाबतीत विचार केल्यावर त्यांना पुण्याच्या उत्तरेस सुमारे सव्वीस कोसांवर असलेल्या बुलंद शिवनेरी किल्ल्याचे स्मरण झाले. त्या गडाचे किल्लेदार विजयराव विश्वासराव हे त्यांच्या नात्यातील व विश्वासातील असल्याने शहाजी राजांनी जिजाऊंना मोठ्या सुरक्षितपणे गडावर नेले व विजयरावांच्या हवाली केले.
आपल्या पतिची चिंता वगळता तिथे जिजाबाईंना कसलीच काळजी नव्हती. पण त्यातच एकेदिवशी शिवनेरीवर भयंकर बातमी आली. निजामशहाचे दरबारात रुजू असलेले लखुजी जाधव व त्यांचे तरुण मुलगे यांच्याविषयी त्याच दरबारातील एक सरदार सफदरखानाने निजामशहाचे मन कलुषित केले व कपटाने चौघांचा घात केला.
आणखी आलेल्या एका बातमीने जिजाऊंच्या मनातील दुःखाच्या भरीला रागाचीही भर पडली. कारण त्यांची जाऊ शहाजीराजांचे चुलत भाऊ खेलोजी राजे यांची पत्नी नाशिकला गोदावरीकाठी स्नानासाठी गेली असता तिच्या रुपावर फिदा झालेला मोगल सरदार महाबतखान याने तिला दिवसाढवळ्या पळवून नेले. तिचा ह्रदयद्रावक आक्रोश इथे जिजाबाईंना स्वस्थ बसू देत नव्हता.
अशा सगळ्या परिस्थितीत दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी सुर्यास्तानंतर जिजाऊला पुत्ररत्न झाले. बाळाची कुंडली पाहून शास्त्रीबुवांनी जिजाऊला सांगितले “राणीसाहेब आपल्या उदरी जन्मलेला पुत्र पुरुषोत्तम होईल दिगंत किर्ती मिळवेल.”
रोहिडेश्वरी शिवबाने मित्रांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्य स्थापनेसाठी दिल्लीचा मोगल, विजापूरचा आदिलशाहा, गोव्याचा फिरंगी, जंजिऱ्याचा सिद्दी आणि वर्धा व गोदावरीच्या दुआबावर मांड टाकून बसलेला कुतुबशाहा अशा पाच जहरी अजगरांच्या विळख्यातून या भूमीला सोडवणे जरुरी होते. त्या विळख्यातून महाराष्ट्राला सोडवित असतानाच मिर्झाराजांशी झालेल्या तहात राजांना रक्ताच्या थेंबाथेंबाने मिळविलेले, कमाविलेले स्वराज्य गमवावे लागले. याचा त्यांना फार मोठा धक्का बसला आणि त्यांनी स्वतःला महालात कोंडून घेतले.
परंतु त्याक्षणी देखील कर्तव्यकठोर बुद्धीने जिजाऊंनी राजांना मार्गदर्शन केले. इतकेच नव्हे तर प्रसंगी त्यांना रागावून “तुम्हाला मरायचेच असेल तर मिर्झाराजांच्या गोटावर चालून जा. तिथे तुमची राखरांगोळी झाली तरी चालेल पण आमच्या पोटी एक भ्याड पुत्र जन्माला आला, हा कलंक आम्हाला नकोय..” हे सांगायला देखील ही माता कमी पडली नाही हे खरे मातृत्व.
शिवाजी महाराजांना आग्रा येथे जेव्हा कैद झाली, त्यावेळी उतारवयातसुद्धा माँसाहेबांनी राज्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळली. आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी आपल्या पुत्राकरवी पूर्ण करवून घेतली. त्याकरता त्यांनी संस्काराचे बीज महाराजांमध्ये पेरले, म्हणून मातृत्वाचा आदर्श जिजाऊंचा घ्यावा. महाराज देखील मातेच्या सर्व आज्ञांचे पालन करीत जगले. धन्य ती माता, धन्य तो पुत्र.
६ जुन, १६७४ रोजी शिवराज्याभिषेक झाला. राजे छत्रपती, हिंदुपदपादशाह झाले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात अवतिर्ण झाले. जिजामातेचे स्वप्न साकार झाले. त्यांचे जीवन कृतार्थ झाले. त्या कृतार्थतेचा आनंद अवघ्या हिंदू समाजाच्या गगनात मावेना. त्या कृतार्थ, परिपूर्ण जीवनाचा आनंद डोळ्यात साठवितच जिजामातेने जेष्ठ कृष्ण नवमी दिनांक १७ जून ,१६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावी शेवटचा श्वास घेतला.
महाराष्ट्र ही वीरप्रसवा वीरमातांची भूमी आहे. जिजाबाईं म्हणजे कृतार्थ मातृत्व, कृतार्थ जीवन. त्या आदरणीय, वंदनीय मातृत्वाला शतशत प्रणाम!!!
लेखिका – सौ. मीरा चित्तरंजन कावडकर
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.