आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१५ नोव्हेंबर १८७५ साली झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात सुगना आणि करमी या दांपत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. बृहस्पतीवारी म्हणजे गुरुवारी जन्मला म्हणून त्याचं नाव ठेवलं “बिरसा”.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन आदिवासी समाजक्रांतीचा जनक, एक थोर स्वातंत्र्यसेनानी होईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
उलिहातु येथे उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने बिरसा आपल्या आईवडिलांसोबत आयुभातु या त्यांच्या नातेवाईकांच्या गावी राहू लागले. तिथेच बिरसांना शिक्षणाची गोडी लागली. आधी ते एका वनवासी शाळेत जात मग त्यांची शिक्षणाची आवड बघून तिथल्या शिक्षकांनी त्यांना ख्रिस्ती शाळेत पाठवा म्हणून सांगितले.
त्याकाळी मिशनरी शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागत असे. शाळेसाठी त्यांनी आपला धर्म देखील बदलला. पण त्या मिशनरी शाळेत आदिवासी लोकांसाठी चोर, डाकू, दरोडेखोर, असेच शब्द वापरले जायचे. बिरसांना हे सहन झाले नाही. त्यांनी तिथल्या शिक्षकांना याबद्दल खडसावले. परिणामी त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.
पुढे त्यांनी या धर्माचा त्याग करून वैष्णवपंथीयांकडून धार्मिक शिक्षण घेतले. हळूहळू त्यांना आपल्या जमातीच्या उद्बोधनासाठी मूळ धर्मात बदल करण्याची आवश्यकता आहे हे जाणवले. त्यांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मातील सार गोळा करून बिरसाईट हा नवीन पंथ सुरू केला.
स्वतःला विष्णूचा अवतार म्हणून घोषित करत त्यांनी जनजागृती करायला सुरुवात केली. ते लोकांना त्यांच्या धर्माची खरी ओळख करून देत. त्यांच्या बोलण्याने सगळेच लोम प्रभावित झाले होते. त्यांनाच भगवान मानून लोक ते जे सांगतील ते ऐकायला लागले.
१८५७ च्या उठावानंतर छोटा नागपूर प्रदेशातील मुंडाच्या जमिनी इंग्रजांनी जप्त केल्या. त्याविरोधात त्यांनी एक आंदोलन छेडले, हेच इतिहासात “सरदारी लढाई” म्हणून प्रसिद्ध झाले. मुंडांच्या प्रमुखाला सरदार म्हणत, त्यावरूनच हे नाव देण्यात आले.
१८९४ साली त्या भागात मोठा दुष्काळ पडला. इंग्रजांनी मदत तर केलीच नाही उलट महसूल जमा करण्याची मुदतही वाढवून दिली नाही. शेवटी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकून/गहाण ठेऊन महसूल भरला. तरीही ही रक्कम पूर्ण झाली नाही त्यामुळे एकेकाळी भूमीचा मालक असलेल्या आदिवसी लोकांना आता वेठबिगार म्हणून काम करावे लागले. याविरोधात बिरसांनी आवाज उठवला. आपले बांधव गोळा करून त्यांना इंग्रजांच्या अ*त्याचाराची जाणीव करून दिली. तेव्हा सगळ्या तरुणांनी इंग्रजांच्या कामावर जाणे बंद केले.
बिरसानी इंग्रजांना हुसकावून स्वातंत्र्य मिळवण्याची घोषणा केली. याबरोबरच बिरसा आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली.
कारागृहातून सुटल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपले काम सुरू केले. गावोगावी लोकांच्या भेटी घेऊन त्यांना जागृत करून त्यांनी आदिवासी मुक्तीसंग्राम सुरू केला. यासाठी एक सशस्त्र सेना उभी केली. त्यामार्फत ते इंग्रजांच्या अड्ड्यांवर ह*ल्ले करत. यात प्रत्येक वेळी इंग्रजांचाच पराभव होत असे. शिवाय या बैठका आणि त्यांचे काम गुप्त असल्याने हजारवेळा प्रयत्न करूनही इंग्रजांना बिरसांचा ठावठिकाणा सापडत नव्हता.
शेवटी त्यांनी बिरसांचा पत्ता देणाऱ्यास इनाम घोषित केले आणि काही लालची तरुणांनी बिरसांचे ठिकाण इंग्रजांना सांगितले.
ते जिथे लपले होते त्या जंगलात चुपचाप छापा घालून इंग्रजांनी बिरसांना आणि त्यांच्या साथीदारांना पुन्हा एकदा अटक केली.
आता ते बिरसांना सहजासहजी सोडणे शक्यच नव्हते. रांची येथील कारागृहात इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला. आणि शेवटी ९ जून १९०० साली त्या कारागृहातच अदिवासी मुक्ती संग्रामाचा जनक मृत्युमुखी पडला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.