आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
इतिहासात अशा अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना त्या काळी इतके महत्व नव्हते. परंतु आज या घटनांच्या उल्लेखाने अंगावर काटा उभा राहतो. काही रहस्ये अशी आहे जी उलगडली आहेत, काही उलगडली नाहीत. अशाच काही रहस्यांपैकी एक आहे, राजस्थानमधील कुलधरा गाव.
काही लोक कुलधरा गावाला भुतांचे वस्तीस्थान मानतात तर काही लोक शापित गाव मानतात. आजही या गावातील रहस्यांचा उलगडा करण्यासाठी संशोधन करण्यात येते आहे. अजूनही कुठलाही ठोस पुरावा हाती लागू शकलेला नाही.
कुलधरा गाव शापित असण्याच्या मागे एक ऐतिहासिक गोष्ट आहे. एकेकाळी रंगीबेरंगी आणि हसतं खेळतं असलेलं हे गाव एका रात्रीतून अचानक संपूर्णपणे ओसाड झाले होते.
१२९१ मध्ये जैसलमेर शहराच्या पश्चिमेला पालीवाल ब्राह्मणांनी कुलधरा गाव वसवले होते. सुरुवातीला येथे ५० कुटुंबांचे वास्तव्य होते. पण जनसंख्या वाढ होत गेली आणि ८३ गावांमध्ये या कुटुंबांचा विस्तार झाला. १२० किलोमीटरच्या परिघात या ब्राम्हणांच्या घरांचा विस्तार होत गेला. पालीवाल ब्राह्मणांच्या पाच पाच गावांचा एक प्रमुख निवडला जाऊ लागला. पालीवाल ब्राम्हण जैसलमेर राज्यात राहत होते पण ते आपले निर्णय स्वतः घ्यायचे ते कधीच राजाला आपल्या व्यवहारात हस्तक्षेप करू देत नव्हते. गावातील प्रमुखच त्यांच्यातील मतभेद दूर करायचे.
पालीवाल ब्राम्हण हे इतर ब्राम्हण जातीपेक्षा वेगळे होते. ते इतर ब्राम्हणांप्रमाणे पूजापाठ न करता व्यापार करायचे. यांच्यापैकी काही शेतकरी आणि पशुपालक देखील होते. यांच्यापैकी काही लोक उंटावर सामानाची वाहतूक करायचे आणि देशातील इतर भागात विकायचे. ते मुख्यत्वे सुका मेवा, हस्तिदंतापासून तयार करण्यात आलेली आभूषणे, अफू आणि धान्याचा व्यापार करायचे.
ब्राम्हण असले तरी व्यापार करायचे म्हणून दिवसेंदिवस ते श्रीमंत होत चालले. त्यांची श्रीमंती इतर ब्राम्हणांना खटकत होती. यानंतर काही वर्षे पालीवालानी या भागात अत्यंत शांततेत वास्तव्य केले. त्यांचे कोणाशीच वैर नव्हते.
पालीवाल ब्राम्हण विज्ञानवादी होते, त्यांच्या घर बनवण्याच्या पद्धतीवरून ते लक्षात येते. त्यांनी त्यांचे घर बांधण्यासाठी अशा जमिनीचा शोध घेतला होता, ज्यात जिप्समचे प्रमाण अधिक असेल. या खनिजाचा सिलेनाईट देखील म्हटले जाते. यात कॅल्शियम आणि सल्फेटचे अंश असतात. या जिप्समयुक्त माती असलेल्या परिसरात कुलधरा वसवण्यात आले आहे. या जिप्समयुक्त मातीमुळेच दुष्काळ आणि सर्वत्र उष्णता असणाऱ्या जैसलमेरसारख्या भागात मातीत पाणी टिकाव धरते. या जिप्समयुक्त मातीत जर ७५ टक्के पाणी ओतले तर त्यापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार होते. या गावातील लोकांनी आपल्या घरावर सिमेंटचे आवरण चढवले आहे. यामुळे एवढ्या उष्ण भागात देखील पालीवाल ब्राम्हणांची घरे थंड राहतात.
पालीवालंनी त्यांच्या घरांची निर्मिती अशाप्रकारे केली आहे, ज्यामुळे घराच्या एका भागात कोणी काही चर्चा करत असेल तर त्याचा आवाज दुसऱ्या बाजूपर्यंत पोहचत नाही. दोन घरांमध्ये असलेल्या एका छिद्रातून गावकरी एकमेकांशी संवाद साधू शकायचे, हा त्याकाळचा टेलिफोनच होता.
जैसलमेर गाव जमिनीच्या खालच्या भागात वसवण्यात आले होते. जर गावाच्या दिशेने कोणी येत असेल तर चार मैलाहून गावकऱ्यांना त्यांच्या येण्याची चाहूल लागत असे. जलसंचयासाठी ते खडीनचा वापर करायचे. खडीन हा जमिनीचा उतरतीवरील भाग होता, ज्याच्या अवतीभवती भिंती उभारल्या जायच्या. या भिंतींमुळे तिथे एक खोल भाग निर्माण व्हायचा ज्यात पाणी मूरत जायचे. पावसाळ्यानंतर पाणी मुरले की लोक त्यात धान्य शेती करायचे. जैसलमेरपेक्षा कुलधरा प्रगत होते आहे हे जैसलमेरवासियांना खटकत नव्हते.
१७ व्या शतकापर्यंत कुलधरा गावात शांतता कायम राहिली. भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन झाले होते. १८व्या शतकात राजस्थान ब्रिटिश सत्तेचा एक भाग बनला. १८२० मध्ये जैसलमेरचा राजा मुलराज आणि गजसिंह यांचे राज्य होते. त्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता. इंग्रजांनी त्यांना सुरक्षा पुरवण्याच्या बदल्यात उत्पन्नातील वाटा घ्यायचा असा हा करार होता.
गज सिंह यांनी सलिम सिंह या नवीन दिवाणाची नेमणूक केली व त्याच्याकडे करवसुलीची जबाबदारी सोपवली. कुलधरा परिसरात राहणारे पालीवाल ब्राम्हण हे व्यापारामुळे श्रीमंत झाले होते, जैसलमेरच्या राजघराण्याचा त्यांच्यावर आधीपासूनच सुप्त राग होता, करवसुलीच्या आड त्यांनी या ईर्षेला वाट करून दिली. त्यांनी पालीवाल ब्राम्हणांकडून अतिरिक्त करवसुली करण्यास सुरुवात केली. ते गावात कर गोळा करताना धिंगाणा घालायचे आणि गावकऱ्यांच्या संपत्तीची नासाडी करायचे.
पुरुषांना मारहाण केली जात होती आणि स्त्रियांच्या अब्रूवर हात टाकला जात होता. इंग्रजांचे पालीवाल ब्राम्हणांशी चांगले संबंध होते. सलिम सिंहाच्या अत्याचाराला कंटाळून पालीवाल ब्राम्हणांनी इंग्रजांना राजाशी असलेला करार तोडण्याची मागणी केली, पण इंग्रजांनी याला नकार दिला.
१८२५ सालापर्यंत पालीवाल ब्राम्हण हा अत्याचार सहन करत होते. आता सलिम सिंहाची नजर पालीवाल स्त्रियांवर होती. त्याने कुलधरा येथील पालीवाल समाजाच्या प्रमुखाच्या मुलीशी लग्नाची मागणी केली. त्याचे तिच्यावर प्रेम जडले होते. लग्न लावल्यास गावकऱ्यांवर जितका कर लावण्यात आला आहे, तो माफ करण्यात येईल, अशी ऑफर त्याने गावकऱ्यांना दिली होती. पण गावकऱ्यांनी याला नकार दिला, यामुळे संतप्त झालेला सलिम सिंह याने सैन्य घेऊन येण्याची धमकी गावाला दिली.
सलिम सिंहाच्या आक्रमणाच्या भयाने ८३ गावच्या पालीवाल ब्राम्हणांनी महापंचायतीचे आयोजन केले आणि सलिम सिंहाचा सामना कसा करावा, याची योजना आखण्यास सुरुवात केली. सर्व गावांमध्ये तब्बल पाच हजार कुटुंबांचे वास्तव्य होते. आपल्या आयाबहिणींच्या रक्षणासाठी पालीवाल ब्राम्हणांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. सलिम सिंहाचे सैन्य येऊन धडकेल या भीतीने गावकऱ्यांनी हाती लागेल ते सामान आणि पैसे आडके एकत्र जमवून एका रात्रीत गावातून पलायन केले, आपला देश सोडून निघून गेले.
पण, जाता जातागावाला शाप दिला होता की कुलधरा आमचे होते आणि आमचेच राहणार, आता हे गाव ओसाड आहे, असेच भविष्यात देखील ओसाडच राहणार आहे.
रात्र संपून नवीन दिवसाची पहाट होईपर्यंत कुलधरावासी राजस्थानच्या वाळवंटात अदृश्य झाले होते. सलिम सिंह ज्यावेळी दुसऱ्या दिवशी कुलधऱ्याला पोहचला, त्यावेळी तिथे ओसाड गाव बघून त्याला आश्स्चर्य वाटलेच पण त्याहून अधिक राग आला. त्याने आपल्या सैनिकांना घरे जाळण्याचा आदेश दिला, गावातील घरे तपासण्याचा आदेश दिला, पण त्या गावातील ओसाडपणा व्यतिरिक्त दुसरे काही त्यांच्या हाती लागले नाही.
पालीवालांचा शाप आजदेखील जसाच्या तसा आहे. त्यांच्यानंतर त्या गावात कोणीच स्थायिक झाले नाही. गावकरी रात्री कुठे गेले हे कोणालाच माहिती नाही. इतिहासकार म्हणतात की त्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये निवास केला.
आज कुलधरा तसेच ओसाड गाव आहे. अनेक लोक दिवसा या गावाला बघायला जात असतात, पण रात्री या गावात जाण्याची कोणाचीच हिंमत होत नाही. असे म्हणतात जो कोणी या गावात रात्रीच्या वेळी जातो, तो कधीच परत येत नाही. इथे कोणीच नसल्याने इथे रात्री विचित्र आवाज घुमत असतात.
२०१३ मध्ये काही भूत-प्रेतांवर संशोधन करणाऱ्या टीमने या गावात नकरात्मक ऊर्जेचा वास असल्याचे म्हटले होते, पण राजस्थान सरकारने याला खोडून काढत, हा जनतेच्या मनात अंधविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते.
आज ६०० वर्षांनी या गावात जुनी घरे, मंदिरे, एक डझनाहून अधिक विहरी, तलाव, आणि अर्धा डझन गोल छत्र सापडतात. या गावात काही घरांच्या खाली तळघर असून यामध्ये सोने नाणे आणि दागिने लपवण्यात यायचे, सलिम सिंहाने या गावावर आक्र*मण केल्यावर येथील उरलेली संपत्ती देखील जप्त केली होती. आता भयावह शांततेच्या व्यतिरिक्त इथे काहीच नाही.
‘जर तुम्ही कधी राजस्थानच्या दौऱ्यावर गेलात तर या कुलधरा गावाला नक्की भेट द्या.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.