आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतात अनेक शासक होऊन गेले आहेत. या सगळ्यांत सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे नाव निश्चितच अग्रक्रमावर घेतले जाईल. त्याने नंद वंशाचा विनाश करून नवीन, मौर्य साम्राज्याची स्थापना केली. छोट्या छोट्या स्वतंत्र राज्यांना एका छत्राखाली आणण्यात त्याने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. वयाच्या २०व्या वर्षी उत्तर भारतातील बहुतांश राज्यांवर त्याने विजय संपादन केला होता. त्याच्या विजयी घोडदौडीत त्याने सिकंदराच्या सेल्युलस निकेटर या महापराक्रमी सरदाराचा पराभव केला होता. याच सेल्युलसच्या नावाने लांबवर बसलेल्या शासकांची तारांबळ उडायची.
चंद्रगुप्त मौर्याचा जन्म इसवी सन पूर्व ३४० साली पाटलीपुत्र म्हणजेच आजच्या पाटणा शहरात झाला होता. तो कोणत्या परिवारात जन्माला आला यावरून अनेक विवाद आहेत. काही लोकांच्या मते त्याचा जन्म शूद्र जातीच्या नंदा राजकुमारच्या घरात झाला होता तर काही म्हणतात की तो मौर्य जनजातीचा होता.
तो कुठे का जन्माला येईना पण त्याला आर्य चाणक्याची साथ लाभल्यामुळे त्याच्या आयुष्याला एक ध्येय, एक दिशा मिळाली. चाणक्य त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाला होता. त्याच्या मदतीने चंद्रगुप्त तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेऊ शकला. अनेक कलांमध्ये, शस्त्रास्त्रांमध्ये पारंगत असलेला चंद्रगुप्त पुढे जाऊन एक उत्कृष्ट शासक म्हणून नावारूपास आला.
त्याने चाणक्याच्या मदतीने सैन्यदलाची स्थापना केली आणि नंद साम्राज्याचा पतनाचा मार्ग मोकळा केला.
ज्यावेळी चंद्रगुप्त स्वतःला तयार करत होता त्यावेळी भारत देश सिकंदराच्या ह*ल्ल्यांनी ग्रस्त होता. सिकंदराला विश्वविजयी होण्यासाठी भारतावर विजय मिळवायचा होता. इसवी सन पूर्व ३२३ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला आणि त्याचे साम्राज्य त्याचा तीन सरदारांमध्ये विभागले गेले. चंद्रगुप्ताने ही संधी साधून सिकंदराच्या सर्व मोक्याच्या ठिकाणांना आपल्या साम्राज्याला जोडले. यातल्या सेल्युलसचा यु*द्धात पराभव करण्यासाठी त्याला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.
यु*द्धात पराभव झाल्यानंतर सेल्युलसने त्याच्याशी करार केला. करार करताना कुटनीतीचा वापर करून चंद्रगुप्ताने त्याचा मुलीशी विवाह केला. आपल्या साम्राज्याच्या मजबुतीसाठी युनानी साम्राज्याशी जवळीक निर्माण करणे गरजेचे आहे, हे चंद्रगुप्ताच्या लक्षात आले होते. याचा भविष्यात चंद्रगुप्ताला चांगला फायदा झाला आणि त्याला पाश्चात्य राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करता आले.
व्यापार वाढल्यामुळे मौर्य साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास करता आला. आर्थिक आणि सामाजिक स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. राजकीय सुधारणा झाल्या आणि केंद्रीय प्रशासन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. याबरोबरच सेवा क्षेत्राचा विस्तार मौर्य साम्राज्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आला.
चंद्रगुप्ताने भारताच्या उत्तरेतील बहुतांश भागावर विजय मिळवला होता, विंध्य पर्वतरांगेपासून ते दख्खनच्या पठारापर्यंत त्याचे साम्राज्य विस्तारले होते. भारतीय उपखंडावर एकछत्री शासन करणारा तो एकमेव शासक होता.
पूर्वेच्या तटावरील कलिंग आणि दक्षिणेतील तामिळ साम्राज्य वगळले तर संपूर्ण भारत त्याच्या साम्राज्याचा भाग होता. पुढे उरलेला भाग देखील मौर्य साम्राज्याला जोडण्यात आला.
आणि अचानक एक दिवस वयाच्या ५०व्या वर्षी त्याने आपले सगळे साम्राज्य आपला मुलगा बिंदुसार याला देऊन जैन धर्माचा स्वीकार केला आणि तो कर्नाटकात निघून गेला. त्याच्या या निर्णयाने लोकांना धक्का बसला होता.
चंद्रगुप्त गेल्याने मौर्य साम्राज्याचे काय होईल, हे साम्राज्य लयाला जाणार नाही ना, अशी भीती लोकांना होती. पण चंद्रगुप्ताला मात्र याची कसलीच फिकर नव्हती, तो आपल्या गुरुसोबत पूजापाठ करण्यात व्यस्त होता. पुढे त्याने संथारा नावाचा तप करण्यास सुरूवात केली. मृत्यू येईपर्यँत हा तप करावा लागत होता. चंद्रगुप्ताचा असा मृत्यू अनेकांना रुचत नव्हता, पण चंद्रगुप्ताची हीच इच्छा होती. अखेरीस हा तप करत असतानाच त्याला मृत्यूला कवळटाळले. चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर चाणक्यने बिंदुसारला साम्राज्य उभारण्यासाठी मदत केली.
चाणक्य आणि बिंदुसार यांनी एकत्रितपणे मौर्य साम्राज्याला कायम ठेवले पण बिंदुसारला या साम्राज्याचा विस्तार करता आला नाही. पुढे त्याचा मुलगा सम्राट अशोकाने मात्र एका सम्राटाची भूमिका योग्य रीतीने निभावली.
चंद्रगुप्ताने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत मोठ्या साम्राज्याचा पाया रचला होता. अदम्य साहस आणि इच्छाशक्तीचे तो एक उत्तम उदाहरण बनला होता. त्याच्यावर अनेक पुस्तकांचे लेखन करण्यात आले, चंद्रगुप्त मौर्य नावाची मालिका तयार करण्यात आली. चंद्रगुप्त मौर्य हा भारताचा असा चक्रवर्ती सम्राट आहे ज्याची कीर्ती आजदेखील तरुण पिढीला प्रेरणा देत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.