आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
“Music has healing power. It has the ability to take people out of themselves for few hours,” ब्रिटिश गायक, संगीतकार आणि गीतकार एल्टन जॉनचं हे वाक्य आहे. आपल्यापैकी अनेकांना याचा अनुभवही आला असेल. जेव्हा आपण नाराज किंवा उदास असता, तेव्हा जर एखादं छानसं गाणं जर कानावर पडलं तर नक्कीच तुमचा मूड बदलून जातो. गायक किंवा गायिकेचा समधुर आवाज आपल्याला क्षणात एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो.
भारतीय संगीत क्षेत्राचा विचार केला तर काही गायकांचा आवाज चितरूण भासतो किंबहुना आहे. किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, कुमार सानू, उदीत नारायण, अलका याज्ञिक, सोनू निगम, श्रेया घोषाल, अरिजित सिंग यासारख्या विविध काळातील गायकांनी भारतीय संगीत समृद्ध केलं आहे. यातील एका नावानं ९०च्या दशकात श्रोत्यांच्या मनावर गारूड केलं. आजही नव्यानं प्रेमात पडलेल्या मुला-मुलींच्या फोनमध्ये या गायकाची गाणी नक्कीचं सापडतात. कुमार सानू असं या गायकाचं नाव आहे. त्यांना सानुदा नावानं ओळखलं जातं.
एका दिवसात दोन-तीन नव्हे तर तब्बल २८ गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम सानुदांच्या नावे आहे. १९९३ मध्ये त्यांनी हा विक्रम केला आहे. याची नोंद ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झालेली आहे.
कुमार सानू यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ ला पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील पशुपती भट्टाचार्य हे देखील गायक आणि संगीतकार होते. त्यामुळं साहजिकच त्यांच्या वडिलांकडून त्यांना संगीताचा वारसा मिळाला. विद्या निकेतन शाळेतून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कोलकाता विद्यापीठातून बीकॉमची पदवी घेतली. संगीताची आवड असणारे सानूदा लहान-मोठ्या ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम करत. खूप कमी लोकांना माहित असेल की, आपल्या जादुई आवाजानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सानुदा उत्कृष्ट तबला वादक आहेत आणि तबला वादनापासूनच त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली होती.
१९७९ पासून त्यांनी गाण्यांचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना म्हणावी तशी संधी मिळाली नव्हती. १९८६मध्ये त्यांना पहिली मोठी संधी मिळाली. ‘तीन कन्या’ या बांग्लादेशी चित्रपटात त्यांना संधी मिळाली. स्व. जगजीत सिंह यांनी सर्वांत पहिल्यांदा कुमार सानू यांना हिंदी चित्रपट सृष्टीत संधी दिली. ‘आंधियाँ’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी संगीत क्षेत्रात पाय ठेवला.
सानूदांच अगोदरचं नाव केदारनाथ भट्टाचार्य होतं. मात्र, संगीतकार कल्याणजी यांनी त्यांच नाव बदलून कुमार सानू केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. साजन, दिवाना, आशिकी, सिर्फ तुम, हम दिल दे चुके सनम, दिलवाले, जुर्म, दिलवाले दुल्हनियॉं ले जाएंगे यासारख्या शेकडो हिट चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली.
जादुई आवाज अन् पुरस्कारांचा ढिग !
आपल्या संपूर्ण कारकीर्दीत आतापर्यंत कुमार सानु यांनी २२ भाषांमध्ये १८ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत.
१९९० ते ९४च्या काळात सलग पाच वर्ष फिल्म फेअर अवॉर्ड मिळवणारे सानुदा एकमेव गायक होते. (आता अरिजित सिंग यांच्या नावे देखील हा विक्रम आहे.) आशिकी, साजन, दिवाना, बाजिगर आणि १९४२: अ लव्ह स्टोरी या चित्रपटांसाठी त्यांना हे पुरस्कार मिळाले.
संगीत क्षेत्रातील अमुल्य योगदानासाठी भारत सरकारने कुमार सानु यांना २००९मध्ये पद्मश्री या नागरी सन्मानाने गौरवलं आहे.
कुमार सानु यांच्या गाण्यांची जादू फक्त भारतातच मर्यादित न राहता सातासमुद्रापार पोहचली आहे. अमेरिकेतील ओहिओ प्रातांच्या महापौरानं सानु यांच्या आवाजानं प्रभावित होऊन ३१ मार्च हा ‘कुमार सानु दिवस’ म्हणून घोषित केला आहे. असा सन्मान मिळवणारे सानुदा हे एकमेव भारतीय गायक आहेत. त्यांना अमेरिकन विद्यापीठानं डॉक्टरेटही दिलेली आहे.
अभिनेता आणि निर्माते सानुदा !
एका दशकापेक्षा जास्त काळ आपल्या आवाजानं श्रोत्यांचं मनोरंजन केल्यानंतर कुमार सानु यांनी दोन चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील केली आहे. १९९९मध्ये ‘हम आपके दिल में रहते है’ आणि २०१५ मध्ये ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. याशिवाय त्यांनी २००६मध्ये ‘उत्थान’ या चित्रपटाची निर्मिती केली.
सानुंच्या गाण्यांमुळे रुग्णही झाले बरे !
लाखो-करोडो लोकांचं मनोरंजन करणाऱ्या कुमार सानू यांच्या गाण्यांमुंळं काही रुग्ण देखील आजारपणातून बरे झाल्याचे किस्से आहेत. त्यांनी गायलेल्या ‘जब कोई बात बिगड जाये’ या गाण्यामुळं हाँगकाँगमधील एक कॅन्सरग्रस्त रुग्ण बारा झाल्याची माहिती समोर आली होती.
याचं गाण्यामुळं मुंबईतील एका बँक मॅनेजरची कॅन्सरग्रस्त पत्नी देखील ठिक झाली आहे. कुमार सानू यांच्या आवाजातील या गाण्यामध्ये एक सकारात्मक उर्जा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
याशिवाय जर्मनीमध्ये असलेल्या स्थायिक असलेल्या एका २२ वर्षीय मुलाने देखील सानुदांच्या ‘कुछ ना कहो’ हे गाणे ऐकून उपचारांना प्रतिसाद दिला. अभिषेक मित्रा असे नाव असलेल्या हा मुलगा सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त होता. कुछ ना कहो हे गाणे ऐकल्यानंतर तो हसत असे, रडत असे आणि ओरडतही असे. मात्र, त्याला दुसरे गाणे ऐकवले की तो काहीही प्रतिसाद देत नसे.
समाजसेवा आणि राजकारणातही आहेत सक्रीय
सेलेब्रल पाल्सी या आजारासाठी काम करणाऱ्या ‘बिस्वा बंधन’ या संस्थेचे ट्रस्टी आणि ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून देखील कुमार सानु सक्रीय आहेत. २००४ मध्ये भारतीय जनता पार्टीचं त्यांनी सदस्यत्व घेऊन राजकारणात पाऊल ठेवलं होतं. मात्र, त्यानंतर काही कारणास्तव त्यांनी सदस्यत्व सोडून दिलं. २०१४मध्ये पुन्हा तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विनंतीवरून सानु यांनी राजकारणात प्रवेश केला.
संगीत क्षेत्रात आपलं अमुल्य योगदान दिल्यानंतर आता सानुदांनी व्यावसायिक गायन थांबवलं आहे असलं तरीही त्यांच्या गाण्याची जादू आजही लोकांच्या मनावर गारुड घालते आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.