आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
शीर्षक वाचून चक्रावलात ना? भारत मंदिरांचा देश म्हणून प्रसिद्ध आहेच, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात वेगवेगळी मंदिरं आहेत. ही मंदिरं वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्धही आहेत. कुठल्या मंदिराचा देव कोपतो, तर कुठे एखाद्या विशिष्ट पद्धतीने केलेलीच पूजा पावते, वगैरे वगैरे.
आज आपण जरा विचित्र वाटणाऱ्या अशा आगळ्यावेगळ्या उंदरांच्या मंदिराची गोष्टं वाचणार आहोत.
राजस्थानच्या बिकानेरपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर एक असं मंदिर आहे ज्या मंदिरात नजर जाईल तिथं तुम्हाला उंदरं दिसतील. एवढे उंदीर असूनही कोणी त्यांना पळवून लावत नाही, मारत नाही. उलट लोक त्यांचे लाडच करताना तुम्हाला दिसतात.
देशनोक येथे स्थित हे मंदिर करणी मातेचं मंदिर आहे. करणी मातेला लोक दुर्गेचं रूप मानतात. असं म्हणतात की या करणी मातेच्या मंदिराची स्थापना १५व्या शतकात बिकानेरचे महाराज गंगासिंह जी यांनी केली होती.
मुघलांच्या वास्तुशिल्पकलेपासून प्रेरणा घेऊन या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं होतं. आणि हेच मुख्य कारण ठरलं हे मंदिर इतकं प्रसिद्ध होण्याचं आणि इथं उंदीर येण्याचं.
एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उंदीर येण्यामागे बऱ्याच कहाण्या आहेत. यातील सगळ्यात प्रसिद्ध आहे २०,००० सैनिकांची गोष्टं.
एक मोठ्ठ यु*द्धं सुरु होतं, जवळपास २०,००० सैनिक हरणार अशा परिस्थितीत होते. त्यांनी आपला जीव वाचावा म्हणून लढाई न करता यु*द्धभूमीवरून पळ काढला. आणि ते येऊन पोहोचले देशनोकला. इथं करणी मातेला कळलं की ते यु*द्ध सोडून पळून आलेत, तिला प्रचंड राग आला. कारण त्याकाळी यु*द्ध सोडून पळून येणं हा गुन्हाच होता. या गुन्ह्याची शिक्षा म्हणजे डायरेक्ट मृत्युदंड! मातेला त्यांच्यावर दया आली, तिने त्यांची शिक्षा माफ केली पण त्यांना सगळ्यांना शिक्षा म्हणून उंदीर बनवलं आणि सध्या जिथे मंदिर आहे तिथे राहायला जागा दिली.
आता गोष्ट किती खरी किती खोटी हे तर मानणाऱ्यावर आहे. पण इथल्या भक्तांसाठी मात्र हे उंदीर मंदिराचाच एक भाग आहे.
आज इथं वीस हजाराहून जास्तं उंदीर आहेत. करणी मातेप्रमाणेच त्यांचीही येथे पूजा होते. हे उंदीर येणाऱ्या भाविकांच्या अंगावर काय चढतात, लटकतात काय, त्यांच्या हातातला प्रसाद काय खातात! पण कोणीच त्यांना काहीच करत नाही. उलट तुम्ही प्रसाद खायच्या आधी जर या उंदरांनी खाल्ला तर ते शुभ मानतात.
इथं या उंदरांची विशेष काळजी घेतली जाते. यांच्यामुळेच आज हे मंदिर जगप्रसिद्ध झालं आहे. इथं कधी जाल तर पाय अगदी सांभाळून ठेवा, कारण कधी कुठून उंदीर पायाखाली येईल याचा काहीच नेम नाही. आणि मंदिरात नियमच आहे की उंदरांना कुठल्याच प्रकारे नुकसान पोहोचता काम नये! मारणं तर फार लांब!
इथं जर कोणी उंदराला मारलं तर त्याला लगेच शिक्षा देण्यात येते. त्या व्यक्तीला सोनं किंवा चांदीची उंदराची मूर्ती बनवून मंदिरात दान करावी लागते.
गंमत अशी की, जिथं जिथं उंदीर असतात तिथं हमखास आजारपणं येतातच. पण या मंदिरात, जिथं वीसेक हजार उंदीर आहेत, तिथं एकही व्यक्ती उंदरांमुळे आजारी पडलेली नाही. अगदी त्या उंदराचा उष्टा प्रसाद खाऊनही! याला जादूटोणा म्हणायचा की चमत्कार!
अजून एक अशीच गंमत आहे. इथं काळे आणि पांढरे दोन्ही उंदीर आहेत. पण पांढऱ्या उंदरांची संख्या तुलनेने कमी आहे. जर तुम्हाला काळ्या उंदरांमध्ये एक पांढरा उंदीर दिसला तर तुमचं भाग्य फळफळलं असं म्हणतात. कारण हा पांढरा उंदीर म्हणजे स्वतः करणी माताच आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे.
अशा या विचित्र वाटणाऱ्या, अद्भुत मंदिराबद्दल अजून काही माहिती तुम्हाला असेल तर आम्हाला नक्की कळवा! याशिवाय असे काही मंदिरं तुम्हाला माहिती असतील तर त्याबद्दलही कमेंट्समध्ये नक्की लिहा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.