आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताच्या उत्तरेला आणि ईशान्येला पसरलेली महाकाय पर्वतरांग म्हणजे हिमालय. भारतीय आणि युरेशियन उपखंड एकमेकांना जोडले गेल्याने हिमालयाचे उंचवटे तयार झाले आहेत. या रांगा भारतीय उपखंडाच्या वायव्येपासून, अति-उत्तर आणि ईशान्येला एखाद्या कमानीप्रमाणे पसरल्या आहेत. हिमालय पर्वतरांगांमध्ये अनेक पर्वतरांगा असून आजमितीस एकूण हिमालयापैकी अनेक भागांत मानव पोहोचलेला नाही.
हिमालयाच्या अनेक उप-पर्वतरांगा आहेत. या उप-पर्वतरांगांमध्ये हिमाद्री पर्वतरांग, गणेश हिमालय रांग, पूर्वांचल रांग, हिंदुकुश पर्वतरांग, हिंदुराज पर्वतरांग, शिवालिक पर्वतरांग, लोवर किंवा आतल्या भागातील हिमालयीन रांगा, काराकोरम रांग आणि ब्लॅक माउंटेन्स रांग या काही महत्वाच्या उप-पर्वतरांगा आहेत. उत्तराखंड राज्याचा बहुतांश भाग हा हिमालयीन पर्वतांचा असून त्याठिकाणी अनेक धाम आणि तीर्थक्षेत्रे आहेत. म्हणूनच उत्तराखंडला ‘देवभूमी’ म्हणूनही ओळखले जाते.
हिमालयातील तिबेट पठाराच्या आसपास कुठेतरी बर्फाच्छादित हिमालयीन शिखर आणि निर्जन खोऱ्यांमध्ये एक अस्पृश्य स्वर्ग आहे, असेही म्हटले जाते. त्याठिकाणची शांती आणि सार्वत्रिक धोरण अवर्णनीय आहे. यालाच स्थानिक लोक “निषिद्ध जमीन”, “चमत्कारांची जमीन”, “जिवंत देवांची भूमी” या नावांनीही ओळखतात. शंभला असे या राज्याचे नाव असून ते अज्ञात आहे. याठिकाणी गेल्यानंतर मानवाला अमरत्व प्राप्त होते अशीही एक अफवा आहे, ज्यामुळे गेल्या काही शतकांपासून अनेक लोक या राज्याच्या शोधात आले आहेत.
‘शंभला’ हा एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ “शांतीचे ठिकाण” किंवा “शांततेचे ठिकाण” असा आहे. शंभला हा प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितला गेलेला एक पौराणिक स्वर्ग आहे. याठिकाणीच कालचक्र तंत्र आणि झांग झुंग संस्कृतीचे प्राचीन शास्त्रं आहेत. या प्राचीन शास्त्रांनीच पश्चिम तिबेटमध्ये तिबेटी बौद्ध धर्माची भविष्यवाणी केली होती.
पौराणिक कथेनुसार, या जमिनीवर फक्त शुद्ध अंतःकरण असलेले लोकच राहू शकतात. शंभलामध्ये शुद्ध प्रेम आणि ज्ञानाचं राज्य आहे आणि तेथे लोक दुःख, लोभ आणि वृद्धत्वापासून मुक्त असतात. शंभलाची संकल्पना तिबेटी धार्मिक शिकवणींमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावते आणि तिबेटी पौराणिक कथांमध्ये मानवाच्या आणि जगाच्या भविष्याबद्दल विशेष प्रासंगिकता आहे.
भोगवादी विचारधारा पृथ्वीवर पसरत असताना मानवजातीच्या ऱ्हासाची भविष्यवाणी कालचक्र करते. जेव्हा या भोगवादी विचारसरणीचे पालन करणारे “रानटी” एका दुष्ट राजाच्या अधिपत्याखाली एकत्र येतील आणि जगात जिंकण्यासाठी काहीही शिल्लक नाही असे त्यांना वाटेल, तेव्हा शंभलाच्या बर्फाच्छादित पर्वतांवरील धुके दूर होऊन ‘शंभला’ राज्य प्रकट होईल.
शंभलाचे ते वैभवशाली राज्य पाहून असे रानटी लोक भयंकर शस्त्रांनी सज्ज असलेल्या अगणित सैन्यासह शंभलावर हल्ला करतील. मग शंभलाचा राजा शंभलातून एक प्रचंड फौज घेऊन त्या “दुष्ट शक्तींना” पराभूत करण्यासाठी बाहेर येईल आणि जगभरात पुन्हा सुवर्ण युगाची सुरुवात होईल.
जरी हे कालचक्र युद्धाची भविष्यवाणी करत असले तरीही हिंसा मान्य नसणाऱ्या बौद्ध शिकवणींच्या मान्यतांशी शंभलाच्या संकल्पनेचा विरोधाभास दिसून येतो. यामुळे काही धर्मपंडितांनी या युद्धाचे प्रतीकात्मक अर्थ लावले आहेत. त्यांच्यामते कालचक्र हे लोकांविरुद्ध हिंसाचाराचा पुरस्कार करत नाही तर भिक्षु किंवा साधूच्या अंतर्गत असुरी प्रवृत्तींविरुद्ध अंतर्गत लढाईचा संदर्भ यातून देण्यात आला आहे.
कित्येक शतकांपासून, असंख्य शोधक, साधक आणि अध्यात्मिक गुरु शंभलाच्या पौराणिक नंदनवनाच्या शोधांवर निघाले आहेत. त्यापैकी बहुतेकांनी त्याठिकाणी पोहोचल्याचा दावा केला, पण ते कोणताही ठोस पुरावा किंवा शंभलाचे नकाशावर निश्चित स्थान सांगू शकले नाहीत. तथापि बहुतेक संदर्भांनुसार युरेशियाच्या डोंगराळ प्रदेशात शंभला राज्य असण्याच्या शक्यता आहेत.
अनेक साहसी आणि संशोधक हे गूढ राज्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही नाझी संशोधकांनी सुद्धा शंभला राज्य शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. काहींच्या मते, शंभला कदाचित युरेशियाच्या डोंगराळ प्रदेशात असून ते बाहेरील जगापासून लपवले गेले आहे.
प्राचीन चिनी ग्रंथ झांग झुंगमध्ये पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील सतलज नदीचे खोरे शंभला असल्याचे सांगितले जाते. मंगोलियन लोकांच्या मते शंभला दक्षिण सायबेरियाच्या काही दऱ्यांत असावी. अल्ताई लोककथांनुसार बेलुखा पर्वताला शंभलाचे प्रवेशद्वार मानले जाते.
आधुनिक बौद्ध विद्वानांच्या मते शंभला हिमालयातील उच्च पर्वतांमध्ये, सध्याच्या हिमाचल प्रदेशातील मक्लेओडगंजच्या आसपास धौलाधार पर्वतांकडे असावे. तर काही आख्यायिकांच्या मते, शंभलाचे प्रवेशद्वार तिबेटमधील एका दुर्गम, बेबंद मठात दडलेले असून शंभलाचे पालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवांनी त्याला संरक्षण दिले आहे.
एस्टेवाओ कॅसेला नावाच्या पोर्तुगीज कॅथोलिक पाद्रीच्या माध्यमातून या राज्याबद्दल माहिती सर्वप्रथम पाश्चिमात्य लोकांपर्यंत पोहोचली. एस्टेवाओ कॅसेलाने काही स्थानिक लोकांकडून शंभलाबद्दल ऐकले होते. त्यानंतर १८३३ साली, सॅन्डर कॉरोशन कोसोमा नावाच्या हंगेरियन विद्वानाने शंभलाचे को-ऑर्डिनेट्स ४० ते ५० ‘उत्तर अक्षांशा दरम्यान असल्याचे सांगितले.
त्यानंतर शंभलाच्या आख्यायिकेने निकोलस रोरीच नावाच्या गूढ आणि थिओसॉफीच्या विद्यार्थ्याचे लक्ष वेधले. उत्सुकतेपोटी, त्याने १९२३ ते १९२८ दरम्यान गोबी वाळवंटापासून अल्ताई पर्वतांपर्यंत या शंभला राज्याचा शोध घेतला. यादरम्यान त्याने जगातील ३५ सर्वोच शिखर पार केले, पण इतके प्रचंड प्रयत्न करूनही ते राज्य सापडू शकले नाही. ॲलेक्स बर्झिन सारख्या काही विद्वानांनी कालचक्र तंत्राच्या गणनेचा वापर करून वर सांगितलेलं भाकीत २४२४ मध्ये घडेल असा निष्कर्ष काढला आहे.
शंभला हे संस्कृत नाव हिंदू पुराणांमध्ये नमूद केलेल्या शहराच्या नावावरून घेतले गेले आहे, बहुधा ते उत्तर प्रदेशातील ‘संभल’ किंवा ओडिशामधील ‘संबलपूर’च्या संदर्भात असावे. हिंदू संस्कृतीमध्ये या ठिकाणाचे वर्णन भविष्य पुराणांमध्ये आढळून येते. त्यानुसार भगवान विष्णूंचा दहावा अवतार कल्कीचा जन्म याच शम्भल गावात होणार आहे. कल्की नव्या सतयुगाची सुरुवात करून देणारा आहे. कालचक्राच्या भाकितानुसारही या युद्धानंतर ‘सुवर्णयुगाची’ सुरुवात होणार आहे.
काहींसाठी, शंभला कधीही सापडलं नाही या वस्तुस्थितीचे अगदी सोपे स्पष्टीकरण आहे. ते म्हणजे शंभला भौतिक जगाच्या अगदी काठावर आहे. शंभला म्हणजे या भौतिक जगाला भौतिकतेच्या पलीकडे असलेल्या जगाशी जोडणारा पूल असावा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.