आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
फेब्रुवारी महिन्याची थंडी पडलेली होती. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेला सर्वात क्रू*र शासक २ लाख सैन्यासह समरकंद सोडून पूर्वेकडं ३ हजार मैल दूर असलेल्या चिनी साम्राज्यावर चाल करण्यासाठी निघाला होता. हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळं सर्वत्र बर्फ पडला होता. नद्या गोठल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये त्याचं सैन्य कझाकस्तानात असलेल्या ओट्रारमध्ये थांबलं होतं.
मरणासन्न असवस्थेत असलेल्या आपल्या मालकाला बरं करण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना यश आलं नाही आणि संध्याकाळी आठच्या सुमारास तो मरण पावला. त्याच्या मृत्यूमुळं चिनी आक्रमणाची मोहीम सोडून देण्यात आली आणि त्याचा मृतदेह परत समरकंदला नेण्यात आला. गुर अमीर समाधीच्या घुमटाखाली एका स्टीलच्या शवपेटीत, सहा फूट लांब ब्लॅक जेडच्या स्लॅबखाली त्याला दफन करण्यात आलं. त्या कबरीशेजारी एक शिलालेख कोरण्यात आला. ‘प्रख्यात आणि सर्वांत महान सुलतान, सर्वांत शक्तिशाली यो*द्धा, जगाचा विजेचा तैमूर या ठिकाणी विश्रांती घेत आहे!’
तैमूर म्हटलं की, आपल्याला आता करीना कपूर आणि सैफ अली खानचा छोटा नवाब आठवतो. सध्या या भारतात तोच जास्त प्रसिद्ध आहे. करीनाचा तैमूर कमालीचा निरागस वाटतो मात्र, इतिहासातील खराखुरा अमीर तैमूर अतिशय दुष्ट आणि क्रू*र विजेता म्हणून ओळखला जातो. त्यानं शेकडो प्राचीन शहरं जमीनदोस्त केली आणि लाखो लोकांच्या मानेला तलवार लावली.
दुसरीकडं, त्याला कला, साहित्य आणि स्थापत्यशास्त्राचा संरक्षक म्हणून देखील ओळखलं जातं. अतिशय गुंतागुंतीचा माणूस असलेला तैमूरलंग त्याच्या मृत्यूनंतरही गेल्या कित्येक शतकांपासून अभ्यासकांना मोहित करतो आहे. त्याचं आयुष्य अनेक रंजक गोष्टींचा खजिना आहे.
तैमूरचा जन्म ८ एप्रिल १३३६ रोजी ट्रान्सोक्सियानामधील समरकंदच्या ओॲसिसपासून ५० मैल दक्षिणेला असलेल्या केश शहराजवळ झाल्याची माहिती उपलब्ध आहे. त्याचे वडील ताराघाय बहदूर हे बर्लास जमातीचे प्रमुख होते. तेगिना बेगम ही त्याची आई होती.
बर्लास जमात ही मिश्र मंगोल आणि तुर्क वंशाची होती. त्यांच्या भटक्या पूर्वजांप्रमाणे बर्लास नव्हते. बर्लास लोक हे शेतीवादी आणि व्यापारी होते. अहमद इब्न मुहम्मद इब्न अरबशहाच्या चौदाव्या शतकातील चरित्र, तैमूरला ‘द ग्रेट अमीर’ असं म्हटलेलं आहे. तैमूर त्याच्या आईच्या बाजूनं चंगेज खानचा वंशज असल्याचं म्हटलं जातं. मात्र, ही गोष्ट खरी आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही.
तैमुरलंगच्या सुरुवातीच्या जीवनाबाबतचे अनेक तपशील हस्तलिखितांमधून, डझनभर शौर्यकथा आणि मध्य आशिया, रशिया आणि युरोपमधील ऐतिहासिक साहित्यातून मिळतात. त्याच्याविषयीच्या कथा रोमांच, रहस्यमयी घटना आणि भविष्यवाण्यांनी परिपूर्ण आहेत. त्या कथांनुसार, तैमूर बुखारा शहरात वाढला.
तिथेच त्याची पहिली पत्नी अलजाई तुर्कानागाशी भेट झाली आणि त्यांनी लग्न केलं. १३७० साली तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी नेते सराय मुल्क आणि अमीर हुसेन काराउनासच्या अनेक मुलींशी लग्न केलं. तैमूरनं डझनभर बायका, प्रेयसी गोळा केल्या आणि त्यांच्या वडिलांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या.
अभ्यासकांमध्ये तैमुरच्या अपंगत्वाबद्दल सर्वांत जास्त वाद-विवाद झाले आहेत आणि आजही होतात. १९४१ साली पुरातत्वशास्त्रज्ञ मिखाईल गेरासिमोव्ह यांच्या नेतृत्वाखालील रशियन टीमनं तैमूरचा मृतदेह बाहेर काढला होता. त्याची तपासणी करताना त्यांना तैमूरच्या उजव्या पायावर दोन जखमा झाल्याचे पुरावे मिळाले. त्याच्या उजव्या हाताला दोन बोटं देखील नव्हती.
तैमूरविरोधी लेखक अरबशाह यांच्या मतानुसार, बालपणी मेंढ्या चोरताना तैमूरला बाण मारण्यात आला होता. तर, इतिहासकार रुय क्लॅविजो आणि शराफ अल-दीन अली याझदी यांच्या मतानुसार १३६३ किंवा १२६४ साली सिस्तानसाठी (आग्नेय पर्शिया) सैनिक म्हणून लढताना तो जखमी झाले होता.
तैमूरच्या तारुण्यादरम्यान, ट्रान्सोक्सियानाचा प्रदेश स्थानिक भटक्या कुळांमध्ये आणि त्यांच्यावर राज्य करणाऱ्या मंगोल खान यांच्यातील संघर्षामुळे पेटला गेला होता. मंगोलनं चंगेज खान आणि त्यांच्या इतर पूर्वजांचे व्यापारी मार्ग बंद केले होते आणि लोकांवर मोठ्या प्रमाणावर कर लावला होता. स्वाभाविकच, या करामुळे नागरिकांमध्ये असंतोष होता. १३४७ साली काझगान नावाच्या स्थानिक व्यक्तीनं चागाताई शासक बोरोल्डे याच्याकडून ट्रान्सोक्सियानाची सत्ता हस्तगत केली.
१३५८ साली त्याच्या ह*त्येपर्यंत काझगननं राज्य केलं. काझगनच्या मृत्यूनंतर, विविध सरदार आणि धार्मिक नेते सत्तेसाठी लढले. १३६९ साली तुघलक तैमूर नावाचा एक मंगोल सरदार यात विजयी झाला. त्यावेळी तैमूरचे काका हाजी बेग यांनी बर्लासचं नेतृत्व केलं परंतु, तुघलक तैमूरला शरण जाण्यास त्यानं नकार दिला.
तुघलकानं हाजीला पळवून लावलं आणि त्याच्याऐवजी अधिक हुशार तरुण तैमूरलंगला सत्तेवर बसवण्याचा निर्णय घेतला. खरं तर, त्यावेळी तैमूर अगोदरचं मंगोल लोकांच्या विरोधात कट रचत होता. त्यानं काझगानचा नातू अमीर हुसेनसोबत युती केली. मात्र, मंगोलांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. एका कथेनुसार तैमुरलंग आणि अमीर हुसेन या दोघांनाही काही काळासाठी पर्शियामध्ये तुरुंगावास भोगावा लागला होता.
तैमूरचं शौर्य आणि रणकौशल्याने त्याला पर्शियामध्ये एक यशस्वी सैनिक बनवलं. त्याने लवकरचं त्याच्या समर्थकांचा एक मोठा गट जमा केला. १३६४ साली तैमूर आणि हुसेन पुन्हा एकत्र आले आणि तुघलकाने तैमूरचा मुलगा इलियास खोजाचा पराभव केला. १३६६ पर्यंत, दोघांनी ट्रान्सोक्सियानावर नियंत्रण प्रस्थापित केलं.
पुढच्या दशकभरात तैमूरलंगनं उर्वरित मध्य आशियावरही आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. मध्य आशिया हातात घेतल्यानंतर तैमूरनं १३८० साली रशियावर आक्र*मण केलं आणि त्यानंतर पाच वर्षातच त्यानं हेरात आणि पर्शिया काबिज केलं.
१३९१ आणि १३९५ साली तैमुरच्या सैन्यानं पुन्हा रशियावर आक्र*मण केलं आणि मॉस्को काबीज केलं. तैमूर उत्तरेत व्यस्त असताना इकडे पर्शियानं बंड केलं. त्यानं संपूर्ण शहरे नेस्तनाबूत करून हे बंड मोडून काढलं. १३९६ पर्यंत इराक, अझरबैजान, आर्मेनिया, मेसोपोटेमिया आणि जॉर्जिया देखील तैमुरलंगच्या अधिपत्याखाली होते.
यानंतर तैमुरचं लक्ष प्रचंड समृद्ध भारतीय उपखंडावर होतं. तैमूरच्या ९० हजार सैन्यानं सप्टेंबर १३९८ मध्ये सिंधू नदी ओलांडली आणि भारतावर ह*ल्ला केला. तेव्हा दिल्लीचा सुलतान फिरोज शाह तुघलकाचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या तुकडे झाले होते. बंगाल, कश्मीर आणि दख्खनमध्ये स्वतंत्र राज्यकर्ते होते. डिसेंबर महिन्यापर्यंत तैमुरनं दिल्ली शहर पूर्णपणे ओरबाडून नेलं आणि ९० हत्तींवर ती प्रचंड ‘लूट’ लादून तो समरकंदला गेला.
दिल्ली लुटून नेल्यानंतरही तैमुर शांत बसला नाही. त्यानं आणखी मोठं ध्येय समोर ठेवलं. त्यानं १४०४ साली चीनवर विजय मिळवण्याचा निश्चय केला. मात्र, त्याला ही मोहिम पूर्ण करता आली नाही. मोहिमेवर असताना १७ फेब्रुवारी १४०५ रोजी कझाकिस्तानमध्ये त्याचा मृत्यू झाला.
तैमुरचं व्यक्तिमत्त्व गोंधळात टाकणारं होतं. त्याच्या मनाचा ठाव लावणं कठीण होतं. तो तैमूर एक चांगला मुस्लिम असल्याचं सांगितलं जातं. मात्र, असं असताना त्यानं अनेक मुस्लिम शहरं नष्ट केली आणि तेथील रहिवाशांच्या कत्त*ली केल्या होत्या. दमास्कस, खिवा, बगदाद यासारख्या शिक्षणाची शहरं तैमूरच्या ह*ल्ल्यांमधून कधीच सावरली नाहीत.
समकालीन साहित्याचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं, तैमूरच्या सैन्यानं त्यांच्या विविध मोहिमांदरम्यान सुमारे २ करोड लोकांना ठार केलं. तैमूरने स्वतःच्या फायद्यासाठी आणि सत्ता विस्तारासाठी क्रू*र ह*त्याकां*डं घडवून आणली. त्यात त्याला आनंद मिळाला.
तैमूरशिवाय भारताचा इतिहास देखील अपुरा आहे. कारण, तैमूरच्या वंशजांनी त्याच भारतावर सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण केलं. बाबरनं १५२६ साली भारतात मुघल सत्तेची स्थापना केली आणि औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत मुघल भारतात सामर्थ्यवान होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.