आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय चित्रपटक्षेत्रात अनेक अविश्वसनीय ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ असलेले सिनेमे झाले आहेत. जसे हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड म्हणतात तसंच दक्षिण भारतीय (तमिळ) सिनेसृष्टीला ‘कॉलिवूड’ म्हणूनही ओळखलं जातं. अनेकदा अशक्य वाटणारे स्टंट्स आणि इतर अतिशयोक्त गोष्टी दाखवल्यामुळे ‘कॉलिवूड’चे अनेक चित्रपट चर्चेत आणि विनोदांमध्ये असतात. याच प्रादेशिक चित्रपटसृष्टीतून रजनीकांत, प्रभास, मोहनलाल, नागार्जुन असे एकाहून एक सरस अभिनेते तयार केले आहेत.
कॉलिवूडने अलीकडच्याच काळात भारताला आणखी एक चिरंतन आणि अद्भुत गिफ्ट दिलं ते एका चित्रपटाच्या स्वरूपात. दिवाळीच्या उत्साहपूर्ण वातावरणात, २ नोव्हेंबरला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ‘ओव्हर-द-टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्मवर ‘जय भीम’ चित्रपटाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. गेल्या एक-दीड वर्षांपासून कोव्हीड महामारीमुळे जवळजवळ सर्वच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज होत असल्याने या चित्रपटांच्याही निर्माते आणि दिग्दर्शकांनी हाच निर्णय घेतला.
अनपेक्षितपणे या चित्रपटाने भारतीय, विशेषतः दक्षिण भारतीय चित्रपटक्षेत्रात एक नवा रेकॉर्डच केला आहे. आयएमडीबी (इंटरनेट मूव्हीज डेटाबेस) वेबसाईटवर या चित्रपटाला जागतिक स्तरावर १० पैकी तब्बल ९.६ एवढी रेटिंग मिळाली. म्हणजेच आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग मिळालेला हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. रिव्ह्यूजच्या रेसमध्ये या चित्रपटाने ‘द शोशांक रीडम्प्शन’, ‘द गॉडफादर’ आणि ‘द डार्क नाईट’ अशा हॉलिवूड चित्रपटांनासुद्धा मागे टाकले आहे.
‘द शोशांक रीडम्प्शन’ या चित्रपटाला जागतिक स्तरावर ९.३ रेटिंग होती आणि या चित्रपटाला आतापर्यंत तयार केल्या गेलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखले जातं. पण ‘जय भीम’ रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे स्थान बदलले आणि ‘द शोशांक रीडम्प्शन’ दुसऱ्या स्थानावर आला.
‘द गॉड फादर’ हा चित्रपट सर्वाधिक विकल्या गेलेल्या ‘मारियो पुझो’ कादंबरीवर आधारित उत्कृष्ट सिनेमॅटिक नमुना आहे, याचेही जागतिक स्तरावरील रेटिंग १० पैकी ९.२ इतके होते. पण या सर्वच चित्रपटांना मागे टाकून ‘जय भीम’ या सत्यघटनेवर आधारित चित्रपटाला न भूतो न भविष्यती अशी रेटिंग मिळाली आहे.
‘जातीभेद’ हा भारताला मिळालेला शाप आहे. या जातीभेदाचे अनेक भीषण परिणाम आजवर भारताने ‘राष्ट्र’ म्हणून आणि त्यातील रयतेनेही भोगले आहेत. दक्षिणोत्तर पसरलेला हा जातीभेद समूळ नष्ट करून एकी निर्माण करण्यासाठी डॉ. आंबेडकरांसह अनेक नेत्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. दक्षिण भारतात जातीभेदाविरुद्धचा लढा तीव्र होता. तरीही जातीभेदाचा अंधार अजूनही समाजाच्या काही भागात तसाच होता. हा चित्रपट जातीवादावर परखड भाष्य करतो.
‘जय भीम’ हा तामिळनाडूमधील सत्यघटनेवर आधारित, टी. जे. ज्ञानवेल दिग्दर्शित चित्रपट जातीभेदाची भीषणता आणि पोलिसांच्या क्रूरतेचे चित्रण करतो. हा चित्रपट १९९३ च्या कुड्डालोर घटनेवर आधारित आहे. कुड्डालोर येथे कुरुंबर आदिवासी समुदायाचा सदस्य राजकन्नूवर चोरीचा खोटा आरोप लावला गेला. यामुळे त्याला तुरुंगात डांबले गेले आणि पोलिस अधिकार्यांनी त्याचा अनन्वित छळ केला.
या छळामध्येच राजकन्नूचा मृत्यू होतो आणि पोलीस अधिकारी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या मृत्यूनंतर, राजकन्नूची पत्नी अजूनही न्यायासाठी लढत होती. चंद्रु नावाच्या वकीलाने मोठा संघर्ष करून ही ऐतिहासिक केस लढवली आणि जिंकली. आजही या गोष्टीचे अनेक लोक स्मरण करतात. यातील मुख्य पात्र चंद्रुची भूमिका पार पाडलेल्या ‘सुरिया’च्या अभिनयाचे अनेक समीक्षक आणि दर्शकांकडूनही कौतुक होत आहे.
भाषा हे कोणत्याही प्रेक्षकाच्या मार्गात अडथळा ठरू नये यासाठी तामिळ भाषेत चित्रित केलेला हा ‘सुपरहिट’ चित्रपट अनेक भाषांमध्ये डब केला गेला आहे. तुम्ही हा चित्रपट नसेल बघितला तर नक्की बघा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.