आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताच्या खेड्यापाड्यांत एकतरी मंदिर मारुतीचं असतंच. धर्म आणि आरोग्याची सांगड घालणारी ही देवता अमर्याद शक्तीचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं प्रतिक मानली जाते. मारुतीसारखं पीळदार आणि सुदृढ शरीर प्रत्येकाला लाभावं यासाठी व्यायामशाळांची, तालमींची आणि आखाड्यांची स्थापना गावोगावी झाली. गावातल्या कच्च्याबच्च्यांना व्यायामाची सवय व्हावी या हेतूने त्यांना तालमीत पाठवणे सक्तीचं असायचं. या तालमींना पुढे जाऊन राजाश्रय मिळाल्याने त्यांची भरभराट झाली. आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर हा जिल्हा तालमींचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. या तालमींमधून कित्येक जातिवंत मल्ल निर्माण झाले, ज्यांनी कुस्तीसारख्या मातीतल्या खेळाला प्रतिष्ठा मिळवून दिली.
तालमीतून फक्त पैलवान तयार व्हावेत आणि त्यांनी जत्रेयात्रेत, स्पर्धांमध्ये कुस्तीचे आखाडे गाजवावेत, ही जुनी धारणा आधुनिकीकरणाच्या ओघात मागे पडली आणि तालमीत हौशीने कमावलेली शरीरसंपदा उदरनिर्वाहाखातर इतर कामांसाठीही वापरात आणली जाऊ लागली. अशावेळी गावच्या तालमीत कसलेल्या तरुणांनी घर चालवण्यासाठी सर्वात सोपा आणि सहज मार्ग निवडला तो शहरात जाऊन बाऊन्सर बनायचा!
सीमेवर असलेली गावं गिळत शहरं झपाट्याने वाढू लागली. चंगळवादाला प्रोत्साहन देणारी जीवनशैली शहरात फोफावू लागली आणि त्यातूनच ‘नाईटलाईफ’चं फॅड वाढू लागलं. शहरात गल्लोगल्ली उभे राहिलेले डान्सबार, पब ही सगळी याच नाईटलाईफची देण होते. धकाधकीच्या जीवनातून काही घटका आराम मिळावा किंवा मित्रमंडळींसोबत दिलखुलास मजामस्ती करता यावी यासाठी इथे गर्दी वाढू लागली. विशेषतः तरुणाईने ही नाईटलाईफ डोक्यावर घेतली. दारू आणि इतर अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या या पिढीमुळे बार आणि पबवाल्यांचं चांगलंच फावलं. पण बऱ्याचदा नशेच्या अंमलाखाली असलेल्या लोकांकडून सामाजिक सभ्यतेची हेळसांड होऊ लागली. अशा गैरकृत्यांना चाप बसावा यासाठी बाऊन्सर्स नेमले जाऊ लागले.
शहरांच्या आणि पर्यायाने नाईटलाईफला चालना देणाऱ्या व्यवसायांच्या विस्ताराचा आवाका पाहता अशा बलदंड, गणवेशधारी बाऊन्सर्सची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली. गावातल्या आखाड्यात राबणाऱ्या तरुणांनी या संधीचा लाभ घेतला नसता तर नवलच! मोठ्या प्रमाणावर हे तरुण मल्ल या पेशाकडे वळू लागले. या संधीचा खरा लाभ घेतला तो दिल्लीच्या दक्षिणेला असलेल्या असोला आणि फतेहपूर बेरी या गावांनी!
या दोन्ही गावांची एकत्रित लोकसंख्या वीस हजाराच्या घरात असून शेती हा इथला प्रमुख व्यवसाय! आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या जाट समुदायाची लोकसंख्या इथे जास्त आहे. या भागाला निसर्गाचं देणंही भरभरून लाभलं असून, असोला येथील असोला-भाटी वन्यजीवन अभयारण्य दिल्लीतील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे.
दिल्ली आणि हरियाणाच्या सीमारेषेवर असलेल्या या गावांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांची एक पिढी, त्यानंतर आलेली शेतकऱ्यांची पिढी आणि आत्ताची पैलवानांची नवी पिढी गुण्यागोविंदाने नांदत आहे. गावांतले बरेच जुने आखाडे आजही तितक्याच जोमाने सुरु आहेत. इथल्या तरुणाईचा दिवस आजही आखाड्यातच सुरु होतो असं म्हणायला हरकत नाही. दिल्लीच्या शहरांमधल्या रंगतदार आणि झगमगत्या नाईटलाईफची चर्चा सीमेवरच्या या गावांपर्यंत यायला फार काळ लागला नाही. पण या नाईटलाईफच्या आकर्षक रुपाला न भुलता इथल्या तरुणांनी यात अशी व्यावसायिक संधी शोधली, जिच्यामुळे या गावांच्या आर्थिक उत्कर्षाचा मार्ग आणखीनच सुकर झाला.
ही व्यावसायिक संधी होती बाऊन्सर बनायची! आपण तालमीत कमावलेली शरीरसंपदा अशाही पद्धतीने वापरून अर्थार्जन करता येईल ही संकल्पनाच गावातल्या तरुणाईला झिंग आणणारी होती. त्यानुसार दिनचर्येत आमुलाग्र बदल घडवण्यात आला. काळाची गरज ओळखून गावात आधुनिक मशिन असलेले जिमही लवकरच सुरु करण्यात आले.
भल्या पहाटे सगळी तरुण मुलं तालमीत येऊन कसरत करू लागली. साधारणतः नऊच्या सुमारास आपली पैलवानी न्याहारी उरकून ही मुलं आपापल्या कामांमध्ये व्यस्त होत असत. दुपारी चारनंतर पुन्हा एकदा जिममध्ये तासभर व्यायाम करून ही मुलं शहरातल्या बार आणि पबमध्ये आपल्या ‘ड्युटी’वर जाण्यासाठी निघत.
आखाड्यात नैसर्गिकरीत्या कमावलेल्या शरीराला तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची जोड मिळाली आणि बलदंड देहांची एक फौजच गावात उभी राहिली. शे-पाचशे जणांची ही गणवेशधारी फौज ड्युटीवर जाण्यासाठी एकत्र गावातून निघायची तेव्हा गावांचा माहोलच बदलून जात असे.
गावांमध्ये नव्या उत्पन्नाचा स्त्रोत आणणारी ही फौज इथल्या गावकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण सीमेवरची गावं ही साधारण ओळख आता ‘बाऊन्सर्स घडवणारी गावं’ इतकी अनन्यसाधारण बनली आहे. गावातील तरुणांना “नाईटलाईफमध्ये सामील व्हावं वाटत नाही का?” असं विचारल्यावर ते म्हणतात, “आम्ही यात कधीच सामील झालोय. अंमली पदार्थांची नशा करून पैसे घालवण्यापेक्षा घाम गाळून पैसे कमावत आहोत, हाच काय तो फरक!” बाऊन्सर म्हणून बार किंवा पबमध्ये उभं राहणं हे वरवर दिसायला सोपं असलं तरी हे मुळात फार आव्हानात्मक काम असल्याचं या गावातील तरुण सांगतात.
आपल्या कामावर येणारे विविधरंगी अनुभव हे तरुण आखाड्यात हौशीने व्यायाम करायला जमलेल्या गावातील मुलांना सांगून त्यांचं ज्ञान वाढवतानाही दिसतात. ते म्हणतात, “फक्त शरीर फुगवून बाऊन्सर बनता येतं, असा एक गोड गैरसमज आहे. मुळात यासाठी कठोर मेहनतीची, शिस्तबद्ध आहाराची आणि ‘तथाकथित’ शहरी सभ्यतेची ओळख असणं फार गरजेचं असतं. आपल्या कामाप्रति अतीव आदर असणं हेच आमच्या यशाचं खरं गमक आहे.” या तरुणांसाठी हे फक्त एक काम नसून एक समाजसेवा आहे.
बाऊन्सर्स बनून समाजसेवेचा हा अनोखा वारसा पुढे चालवणाऱ्या या बहाद्दरांना आणि त्यांना घडवणाऱ्या असोला व फतेहपूर बेरी या गावांना सलाम!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.