आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात एलोन मस्क आणि स्पेस-एक्सने गेल्या काहीच वर्षांमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. मुक्त अर्थव्यवस्था आणि भांडवलशाहीच्या अनेक फायद्यांपैकी एक ‘विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचा देशाच्या विकासाला लागणारा हातभार’ हे सिद्ध होताना दिसत आहे. पण एलोन मस्क पर्यावरणाबद्दलही जागरूक आहे. इतर ग्रहांवर जात असतानाच, पृथ्वीवरील पर्यावरणाच्या रक्षणाचे कामही तो करत आहे. यासाठी ग्लासगो येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘सीओपी-26’ शिखर परिषदेत इतर अनेक देशांसह ‘एलोन मस्क फाउंडेशन’सुद्धा सहभागी होते.
काहीच दिवसांपूर्वी स्कॉटलँडमध्ये ‘सीओपी-26’ शिखर परिषद पार पडली. जागतिक वातावरण बदलविषयक ‘संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या’ दरवर्षी जगातील विविध ठिकाणी सभा होत असतात. या वार्षिक परिषदांच्या चर्चेचे सर्व मुद्दे ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’च्या (यूएनएफसीसी) चौकटीतच असतात. या परिषदेतील सर्व सदस्य यूएनएफसीसी पक्षांची औपचारिक बैठक म्हणून काम करतात.
याच औपचारिक बैठकीला ‘कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज’ किंवा ‘सीओपी’ असे संबोधले जाते. या सभांमध्ये प्रत्येक यूएनएफसीसी देशाचे हवामान बदल हाताळण्याच्या प्रगतीचे मूल्यांकन होत असते. या वर्षी सव्वीसावी ‘कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज पार’ पडली. या परिषदेत अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
‘सीओपी-26’ शिखर परिषदेत भारताने २०७० पर्यंत ‘नेट झिरो’ कार्बन इमिशनचे वचन दिले आहे. नेट झिरो कार्बन इमिशन म्हणजे कार्बन इमिशन होणारच नाही असे नाही, कारण त्याशिवाय देशाची औद्योगिक आणि व्यावसायिक प्रगती जवळ जवळ अशक्य आहे, त्यामुळे जोपर्यंत हवेत कार्बन सोडणाऱ्या संसाधनांना जैव-इंधनासारखी वैकल्पिक संसाधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कार्बन इमिशन होतच राहणार.
‘नेट झिरो’ कार्बन इमिशन म्हणजेच जितकं कार्बन डायॉक्साईड किंवा कार्बनची इतर ॲलोट्रॉप्स/कंपाउंड्स हवेत सोडले जात आहेत तितकेच पुन्हा शोषून घेणे. हे काम प्रामुख्याने जंगलांद्वारे होत असते. कारण वनस्पती कार्बन कंपाउंड्स, सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्या मदतीने प्रकाशसंश्लेषण (फोटोसिंथेसिस) करून स्वतःसाठी अन्न तयार करू शकतात.
पण या संकल्पनेच्याही पुढे जाऊन, आयआयटी बॉम्बे मधील चार विद्यार्थी आणि दोन शिक्षकांनी वातावरणातील कार्बन काढून टाकण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ग्लासगो येथील सीओपी-26 परिषदेतील ‘सस्टेनेबल इनोव्हेशन फोरम’मध्ये या युगप्रवर्तक तंत्रज्ञानासाठी ‘एक्सप्राईझ फाउंडेशन’कडून आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांना २ लाख ५० हजार डॉलर्सचे अनुदान मिळाले आहे.
अन्वेषा बॅनर्जी, श्रीनाथ अय्यर, शुभम कुमार आणि सृष्टी भामरे यांचा समावेश असलेल्या ‘एसएएसआयआयटीबी’ विद्यार्थ्यांच्या टीमने वातावरणातील कार्बन काढून त्याचे क्षारांमध्ये रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हे अनुदान जिंकले. या विद्यार्थ्यांनी एक ‘ट्राय-मॉड्युलर’ तंत्रज्ञान तयार केले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्सर्जनाच्या स्रोतांमधूनच ‘कार्बन डायऑक्साइड’ कॅप्चर होऊन त्यांचे क्षारांमध्ये रूपांतर होऊ शकते.
‘एक्सप्राइज फाउंडेशन’ ग्लासगो येथील सीओपी-26 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या एलोन मस्क फाउंडेशनचा एक भाग आहे. ‘एक्सप्राइज’ ही संस्था सर्वात मोठी आव्हाने सोडवण्यासाठी तसेच नाविन्यपूर्ण मॉडेल्सची रचना आणि अंमलबजावणी करण्यात जागतिक आघाडीवर आहे.
एक्सप्राइज फाउंडेशन आणि एलोन मस्क फाउंडेशनने या वर्षी एप्रिलमध्ये वातावरणातून कार्बन काढून टाकण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान तयार करू शकणार्या प्रत्येकासाठी १०० दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे ७४५ कोटी रुपये) अनुदान देण्याची घोषणा केली. यापैकी ५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३७ कोटी रुपये) हा विद्यार्थ्यांसाठीचा पुरस्कार होता. पुरस्कार जिंकण्यासाठी, सहभागी झालेल्यांना दरवर्षी किमान १००० टन कार्बन वातावरणातून काढून टाकणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवायचे होते शिवाय भविष्यात प्रति वर्ष गिगाटोनच्या प्रमाणात कार्बन रिमूव्हल साध्य करण्यासाठी सोल्युशन द्यायचे होते.
विद्यार्थ्यांच्या या टीमच्या दोन मार्गदर्शकांपैकी एक, अर्णब दत्ता यांच्या मते, टीमने केवळ वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर उद्योगांना आर्थिक फायद्याची हमी देऊन त्याचे व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त रसायनांमध्ये रूपांतर करण्याचे तंत्रज्ञानही विकसित केले आहे.
तसेच उद्योगांद्वारे उत्सर्जित होणारा कार्बन डायॉक्साईड फक्त वातावरणातून काढून न टाकता, उद्योगांना आर्थिक फायद्याची खात्री करून दिल्यास ते या ‘कार्बन डायॉक्साईड व्यवस्थापन’ प्रणालीचा स्वीकार करतील असेही मत दत्ता यांनी प्रकट केले.
याशिवाय जर हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात अस्तित्वात आले तर भारताचा २०७० साली ‘नेट झिरो कार्बन इमिशन’चे उद्दिष्ट निश्चितपणे गाठले जाईल. या तंत्रज्ञानाच्या वापराने भारत ‘शाश्वत विकासाची ध्येये’सुद्धा गाठू शकतो. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात कधी इम्प्लिमेंट होईल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.