आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
साधीसोपी सामान्य माणसाची गोष्ट आकर्षकरित्या मांडावी तर ती हृषीदांनीच! समीक्षक असो वा प्रेक्षक, दोघांनीही त्यांचा सिनेमा आपलासा वाटत होता. कारण, त्यांनी अगदी सामान्य भारतीयाचे जगणे रुपेरी पडद्यावर उलगडून दाखवले.
“बाबू मोशाय…… जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये”
कॅन्सर पेशंट असलेला आनंद सेहगल आपला डॉक्टर मित्र भास्कर बॅनर्जीला हे वाक्य ऐकवतो. राजेश खन्नाने आपल्या खास शैलीत हा डायलॉग उच्चारून या शब्दांना जणू अमरत्व दिले आहे. १९७१ साली आलेल्या आनंद या चित्रपटात राजेश खन्नाने कॅन्सर पेशंट असलेल्या आनंदची भूमिका साकारली होती. या एका वाक्यातून आनंदचेच नाही तर, या चित्रपटाचे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांच्याच जीवनाचे सार प्रतिबिंबित होते.
आयुष्यातील वेगवेगळ्या क्षणी आलेले अनुभव मनमुरादपणे जगणे म्हणजेच आयुष्य!
यापेक्षा आयुष्याची वेगळी व्याख्या काय असू शकेल! हृषीकेश आणि राज कपूर यांच्यातील संबंध खूपच भावूक होते. हृषीदांनी ही फिल्म करायला घेतली तेव्हा राज कपूर खूपच गंभीर आजारी होते. दोघांच्या या मैत्रीतूनच या चित्रपटाची कथा आकारास आली असावी असे म्हटले जाते. चित्रपटातील आनंद जसे आपल्या मित्राला बाबू मोशाय म्हणतो तसेच राज कपूर देखील हृषीदांना बाबु मोशाय अशीच हाक मारत.
राज कपूर यांना आपण कायमचे गमावू की काय या भीतीतूनच त्यांना ही कथा स्फुरली. जीवनातील असेच विविध प्रसंग आणि वळणांचा वापर करत हृषीकेश मुखर्जी यांनी आपल्या चित्रपटांची निर्मिती केली. म्हणूनच सर्वात चांगली आणि संस्मरणीय अशा चित्रपटांची निर्मती त्यांच्या हातून झाली.
हृषीकेश मुखर्जी यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी, कलकत्ता येथे झाला. तो पारतंत्र्याचा काळ होता. एक मध्यमवर्गीय भारतीय माणसाप्रमाणेच त्यांचेही आयुष्य होते. त्यांनी विज्ञानातील पदवी घेतली. रसायनशास्त्रातून बीएससी पूर्ण केली. त्यांना जैवरसायनशास्त्रज्ञ व्हायचे होते. काही काळासाठी ते लेक्चरर म्हणून काम करू लागले.
परंतु, अचानकच त्यांनी आपला मोर्चा कलाक्षेत्राकडे वळवला. कलकत्त्यातील न्यू थिएटर या फिल्म स्टुडीओमध्ये त्यांनी कॅमेरामन आणि एडिटर म्हणून नोकरी सुरु केली.
त्यांनी बिमल रॉयसारख्या नामांकित चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले. दो बिघा जमीन या हिंदी चित्रपटाचे एडिटिंग हृषीदांनी केले होते. चित्रपट क्षेत्रातील त्यांचा हा पदार्पणाचा काळ होता. रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली हृषीदांना भरपूर गोष्टी शिकावयास मिळाल्या. चित्रपटाचे वेगवेगळे पैलू तर त्यांना अभ्यासायला मिळालेच त्यासोबतच त्यांना दो बिघा जमीनचे स्क्रिप्ट रायटिंग करण्याची देखील संधी मिळाली. इटालियन चित्रपट बायसिकल थीव्हज या चित्रपटाच्या कथेवरून हा चित्रपट बेतलेला आहे.
आपल्याला चित्रपट निर्मितीत आणण्याचे श्रेय ते नेहमीच दिग्गज कलाकार दिलीप कुमार यांना देत. मुखर्जी यांच्या मुसाफिर या चित्रपट दिलीप कुमार यांनी कोणतेही मानधन न घेता काम केले होते. एकाच घरात राहणाऱ्या तीन कुटुंबांची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली होती.
मानव्यजन्य परिस्थितीमुळे घडणाऱ्या घडामोडी आणि त्यांचे परिणाम हाच बहुधा हृषीदांच्या चित्रपटाचा मध्यवर्ती विषय असे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत त्यांनी कोणतेही नवे प्रयोग केले नाहीत. तरीही समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही त्यांचे चित्रपट तितकेच भावत.
त्यांच्या चित्रपटातून झळकणारी मध्यमवर्गीय मानसिकता, खोलवर जाऊन डिवचणारा उपहास आणि संवेदना या गोष्टींमुळे कुणालाही सहजपणे त्यांच्या चित्रपटांशी समरूप होता येत असे. त्यांच्या चित्रपटातून हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला जाणारा नर्मविनोद हसवत हसवत कोपरखळ्या मारून जात असे.
गोलमाल, चुपकेचुपकेसारखे त्यांचे विनोदी चित्रपट हसवता हसवता मानवी स्वभावातील संवेदना उलगडून दाखवतात.
अनुराधासारखे त्यांचे चित्रपट नव्याने शिक्षित मध्यमवर्गीयांसाठी एक अनोखी मेजवानी ठरली. धर्मेंद्र, शर्मिला टागोर, संजीव कुमार आणि अशोक कुमार यांना घेऊन केलेला त्यांचा सत्यकाम हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला. भारतीय स्वातंत्र्यानंतर तरुणांमध्ये झालेला भ्रमनिरास या चित्रपटातून दाखवण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचा अर्थ ब्रिटीश शोषक राज्यकर्ते जाऊन तिथे भारतीय राज्यकर्त्यांची भरती एवढाच मर्यादित होता का? हा प्रश्न त्यांच्या या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला.
“नमकहराम” या त्यांच्या चित्रपटात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन ही जोडगोळी पुन्हा एकदा पडद्यावर आली. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भांडवलवादी विचारांना शरण गेलेला विकी (अमिताभ बच्चन) आणि त्याचा मित्र सोमू (राजेश खन्ना) जो एक साधा गिरणी कामगार आहे, त्यांच्यातील वाढत्या दरीची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली.
त्यांच्या चित्रपटातील पात्र हुबेहूब सामान्य माणसाची भाषा बोलत. त्यांच्यासमोरील प्रश्न आणि सामान्य माणसाला भेडसावणारे प्रश्नही सारखेच असत. त्यांच्या वेदनेत आणि आनंदात तुम्हाला स्वतःचेच प्रतिबिंब दिसते. हृषीदांच्या चित्रपटांची हीच खासियत होती.
“बावर्ची” हा त्यांचा सिनेमा एकत्र कुटुंब पद्धतीत गैरसमजामुळे निर्माण होणाऱ्या दऱ्या यावर बेतलेला होता. कुटुंबात दऱ्या असल्या, तरीही त्या खाली कुठेतरी प्रेमाची ओल झिरपत असते, हेच त्यांना यातून सांगायचे होते.
“खुबसुरत”सारख्या चित्रपटातून त्यांनी नव्या-जुन्या पिढीचा संघर्ष मांडला. प्रत्येक पिढीमध्ये काही तर कमी जास्त असणारच आहे. त्यांच्यात मेळ घालत आपल्याला पुढे जायचे आहे, असा संदेश त्यांच्या चित्रपटातून मिळत असे. यासाठी त्यांना कुठलेही नवे प्रयोग करण्याची गरज भासली नाही.
मानवी नात्यातील गुंतागुंत हाच त्यांच्या चित्रपटांचा मुख्य गाभा होता. खुबसुरत, नरमगरम , अनुपमा, गुड्डी आणि मिली हे त्यांचे चित्रपट पाहिल्यावर याची अनुभूती येते. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जया बच्चन यांना बहुतेक चित्रपटातून त्यांनी पडद्यावर झळकण्याची संधी दिली. शिवाय, या अभिनेत्यांशी सामान्य माणसांची नाळ जोडली गेली ती त्यांच्या अशा कथानकांमुळेच.
भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत सरकारने त्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
२७ ऑगस्ट २००७ रोजी किडनी फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले.
एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले होते, “पाऊस सुरु असताना बाल्कनीत उभ्या असलेल्या व्यक्तीने खाली पाहिल्यास त्याला पावसामुळे चिखलाने माखलेला रस्ते दिसतील, आणि वर पाहिल्यास आभाळ सरताना शुभ्र होत जाणारे आकाश दिसेल, हेच आयुष्य आहे”. हेच आयुष्य त्यांनी आपल्या चित्रपटातून पडद्यावर जिवंत केले.
एकाच वेळी आपल्या आयुष्यात असे क्षण येत असतात जे जीवनाची काळी आणि लख्ख बाजूदेखील स्पष्ट करतात. असे क्षण आणि अशी स्थिती हेच हृषीदांच्या चित्रपटांच्या कथानकाचे विषय होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.