आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
जागतिकीकरणाने रोजच्या कामांना वेग मिळाला असला तरी अनेक गोष्टींमध्ये मात्र अजुनही पारंपारिक पद्धतीच आपल्या उपयोगी येतात. आधुनिकतेने दिलेल्या संख्यात्मक विकासापेक्षा पारंपरिकतेने होणाऱ्या गुणात्मक विकासाचा वापर आजही आपल्याला खुप फायदेशीर ठरू शकतो.
ही पारंपारिकता दुर्दैवाने आज लोप पावत चालली आहे. असे असले तरीही खेड्यात मात्र आजही याची मुळं खोलवर रुतलेली दिसतात. खेड्यातील वर्षानवर्षे चालत आलेल्या अनेक रूढींच्या मागे काहीतरी वैज्ञानिक कारणे आहेत. त्याची उपयुक्तता जास्त तर आहेच परंतु त्या गोष्टींचा पर्यावरणावर कसलाही वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाते.
असाच एक प्रकार म्हणजे ‘सुरंग’ नावाच्या विहिरीचा प्रकार. उत्तर केरळ आणि कर्नाटकमधील हा पारंपरिक जलसिंचनाचा स्त्रोत आता लोप पावतो आहे. या विहिरीला खोदण्यासाठी लागणारी विशेष पध्दतीची माहिती आज खुप कमी लोकांना आहे.
त्यातीलच एक म्हणजे केरळमधील कासारगोड जिल्ह्यात असणाऱ्या कुंदमजुझी या गावातील ६७ वर्ष वय असलेले कुंजम्बू. त्यांनी एकट्यानी या गावात मागच्या ५० वर्षात पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक सुरंग विहिरी खोदल्या आहेत.
१४ वर्षाचे असताना त्यांनी खोदकाम सुरु केले. आता या खोदकामाचे ज्ञान असलेले खुप कमी लोक असले तरी कुंजम्बू यांनी आता पर्यंत १०००पेक्षा जास्त विहिरी खोदल्या आहेत असे ते सांगतात.
कन्नडी भाषेत ‘सुरंग’ म्हणजे बोगदा किंवा मल्याळम भाषेतील ‘थुरंगम’ म्हणजे अरुंद गुहांसारखी एक रचना, ज्याची निर्मिती डोंगराच्या पायथ्याशी केले जाते. या प्रकारच्या विहिरीची रुंदी २.५ फुट आणि लांबी ३०० मीटर पर्यंत किंवा जोपर्यंत पाण्याचा स्त्रोत सापडत नाही तिथपर्यंत असु शकते.
आजही या भागातील एक परिणामकारक जलसिंचनाचा स्त्रोत म्हणुन या विहिरींकडे बघितले जाते. सुरंग म्हणजे थोडक्यात आडवी खोदली गेलेली विहिर असेही म्हणता येईल.
विहिरीच्या बोगद्यातुन बाहेर येणाऱ्या पाण्याला एका तलावात गोळा केले जाते, जे विहिरीच्या जवळच असते. एकदा झऱ्यातुन पाणी येणे सुरु झाले की तो प्रवाह वर्षानुवर्षे कायम चालू राहतो. कसल्याही उपकरणांच्या मदतीशिवाय हे पाणी त्या तलावात वाहत राहते.
कासारगोड जिल्ह्यातील गावांत पावसाळा अतिशय जास्त प्रमाणात असतो. नद्यांना पावसाळ्यात जास्त पाणी असते. उन्हाळ्यात तापमान जास्त वाढते म्हणुन शेतीच्या पाण्यासाठी लोकांना भुजलावर अवलंबून रहावे लागते.
सुरंगाची तुलना ‘कनात्स’शी केली जाऊ शकते. इ.स.पुर्व ७००मध्ये ग्रीसमधील मेसोपोटेमिया आणि बॅबिलॉनमध्ये ही पध्दत वापरली जात असे. नंतर इराणमध्ये वापरल्या गेलेल्या या पध्दतीचा वापर आता कमी होत चालला आहे. कुपनलिकांचा (बोरवेल) वाढत चाललेला वापर यास कारणीभूत आहे.
“सुरंग खोदण्यासाठी जास्ती शक्ती आणि जिद्द लागते. मी जाताना नेहमी एक कुदळ आणि मेणबत्ती घेऊन जातो. एकाच दमात काम पुर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो.” असे कुंजम्बू सांगतात.
“जेव्हा तुम्ही ३०० फूट लांब बोगदा खोदत असता तेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारी म्हणून मी एक आगपेटी आणि मेणबत्ती घेऊन जातो. मेणबत्ती पेटवण्यासाठी जर आगपेटी आग पकडत नसेल तर तिथे ऑक्सिजनची कमी आहे हे मला कळते आणि तिथे काम थांबवून मी परत जातो”, अनुभवाची ही शिदोरी सांगताना कुंजम्बू हे रहस्य सांगतात.
कधीकधी एका सुरंगाच्या आत छोटेछोटे सुरंग बनवले जातात. हवा खेळती राहुन नैसर्गिक दबाव रहावा म्हणुन आत हवेच्या नलिका बसवल्या जातात. या हवेच्या नलिकेचा आकार २ मी. बाय २ मी. इतका असतो.
“खोदकाम करणारा व्यक्ती निसर्गाशी एकरुप झालेला असावा. खोदकामासाठी लागणारी योग्य जागा, तिथली माती या सगळ्या गोष्टी त्याला कळायला हव्यात. जसे की, जर आपल्याला खोदकामासाठी योग्य अशी जागा शोधायची असेल तर मी आसपासच्या झाडांकडे बघतो. ही झाडे बहरत असतील आणि मातीत एक विशिष्ट ओलावा असेल तर आपल्याला योग्य जागा मिळाली आहे असे मी ठरवतो. हे ज्ञान फक्त वर्षानुवर्षे केलेल्या कामाच्या अनुभवातुनच येऊ शकते. निसर्गावर एक प्रकारची श्रध्दा असणेही गरजेचे आहे”, असे ते म्हणतात.
“जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा सुरंग म्हणजे आमच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक होता. शेतीसाठी जलसिंचनाचा तो एक मुख्य उपाय होता. परंतु कुपनलिकांच्या शोधाने हा उपाय पर्यायामध्ये बदलला आणि हळुहळु आम्हाला काम मिळेनासे झाले.”
सुरंग खोदण्यासाठी मानवी ताकद लागते, कुपनलिकेच्या तुलनेत खर्चही जास्त येतो. सुरंग खोदण्याला अंदाजे ०.७२ मीटरसाठी १००-१५० रुपये लागतात. या एका कारणामुळेही लोक आता सुरुंग खोदत नाहीत, असे कुंजम्बू सांगतात.
“कुपनलिकेची पध्दत आपल्या निसर्गासाठी एकदम हाणीकारक आहे. त्यासाठी खोदत असताना आपण थेट पृथ्वीच्या हृदयात घाव घालतो. त्यामुळे नैसर्गिक यंत्रणेच्या विरोधात आपण जातो आणि म्हणुनच यातुन भुकंंप होण्याची सुध्दा शक्यता आहे.” असे कुंजम्बू म्हणतात.
कासारगोड जिल्ह्यातील प्रसिध्द लेखक, शेतकरी पत्रकारितेतील एक मोठे नाव असलेले श्री पाद्रे यांच्या नुसार, “सुरंग पध्दती शेतकऱ्यांसाठी एक अतिशय परिणामकारक उपाय म्हणून काम करत आली आहे. वर्षभर पाण्याचा पुरवठा करणारी ही पध्दत एकमेव आहे. कासारगोडसारख्या भागात जिथे जमीन खचण्याची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी तर कुपनलिका कधीही योग्य पर्याय ठरणार नाहीत.”
आज कासारगोड जिल्ह्यात ५०००पेक्षाही जास्त सुरंग विहिरी आहेत. त्यातील बऱ्याचशा आता कालबाह्य झाल्यात. परंतु, कुंजम्बूसारखे लोक मात्र अजुनही ही पारंपारीक पध्दत जपण्याचा प्रयत्न करत आहेत.
कुंजम्बू शेवटी सांगतात, “सुरंग पध्दती कमी होत असली तरीही पृथ्वीच्या अंतर्गत भागात सुरु केलेला माझा हा प्रवास मी असाच सुरु ठेवणार आहे, या पध्दतीचा पूनर्जन्म होईल एवढी एकच आशा मला आहे.”
या विशिष्ट आणि पर्यावरणाशी एकरुप असलेल्या पध्दतीचे रक्षण करणे आज खुप गरजेचे आहे. यामुळे निसर्गाची हानी तर वाचेलच परंतु कुंजम्बूसारख्या मोजक्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रोजगाराचे साधन सुध्दा परत मिळेल. तसेच ऐतिहासिक वारसा असलेली ही जलसिंचनाची पध्दत गमवायची नसेल तर लवकरात लवकर या सुरंग पध्दतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.