आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
संस्कृती.
विविधतेतुन एकता दर्शविणाऱ्या भारतासारख्या देशाला सांस्कृतिक वैविधतेचं मिळालेलं वरदान अमूल्य आणि अतुलनीय आहे. प्रादेशिक भाषा, प्रादेशिक वेशभूषा, प्रादेशिक भौगोलिक रचना या आणि अजून कित्येक गोष्टी भारतीय वैविधतेमध्ये अमूल्य भर पाडतात. एखाद्याच्या वेशभूषेवरुन त्या व्यक्तीच्या प्रादेशिक अस्मितेची ओळख करता येऊ शकते ही गोष्ट भारतीय संस्कृतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. नऊवारी घातलेली मराठी मुलगी, कुर्ता आणि पायजामा घालून भांगडा करणारा पंजाबी तरुण, घागरा घालून नवरात्रीमध्ये दांडीया खेळणारी गुजराती मुलगी हे भारतीय वेशभूषेत असलेल्या विविधतेचा एक उत्तम नमुना आहे.
पण संस्कृतीची मुळे रुजलेली असतात ती त्या देशाच्या इतिहासात. प्रादेशिक वेशभूषेवर त्या प्रदेशाच्या इतिहासाचा खुप मोठा प्रभाव असतो. तसेच त्या प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती, समाजात स्त्रियांचा असलेला सन्मान या गोष्टी त्या प्रदेशातील वेशभूषेत आपला हातभार नकळतच लावतात.
आता आलेल्या नविन आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि कापड उद्योगात झालेल्या भरमसाठ क्रांतीनंतर आज कापड उद्योगात वैविधतेने नटलेले विविध प्रकारचे कपडे आपल्याला बघायला आणि घालायला मिळतात. पण आजच्या या विविधतेने नटलेल्या भारतीय वेशभूषेची सुरुवात झाली ती हडप्पा (सिंधु) संस्कृती आणि संगम काळात.
आता असणारी विविधता त्यांनी त्या काळी कशी सुरु केली आणि टिकवून ठेवली हे आज आपण जाणून घेऊया.
१. हडप्पा संस्कृती (सिंधु नगरसंस्कृती)
(कालावधी: इ.स.पु ३३०० ते इ.स.पु. १३००)
हडप्पा संस्कृतीची विशेषता म्हणजे त्या वेळी घेतलं गेलेलं भरमसाठ कापूस उत्पादन. जलसिंचनाच्या अतुल्य सोयीसुविधा विकसित असलेला हा प्रदेश कापूस उत्पादनात अग्रेसर होता. कापसाच्या धाग्यापासुन कापड बनवण्याची कला त्यावेळी विकसित झाली होती. या काळातीललोक दुहेरी पेहराव करत असत.
पुरुष आणि स्त्रिया कमरेच्यावरती आत्ता शालसारखे दिसणाऱ्या कपड्यांचा वापर करत तर धोतराचा वापर कमरेपासुन खाली कपडे म्हणून केला जात असे. या काळातील लोक कापड विणण्यात अतिशय पारंगत होते.
उत्खननात मिळालेल्या विविध पुराव्यांमध्ये विविध प्रकारचा आणि रंगाचा दोर, सुया, कापसाच्या बिया सापडल्या असून त्याचबरोबर काही समकालीन पुतळे सापडले आहेत. एका राजपुरोहितचा सापडलेला पुतळा त्यावेळी असलेल्या वेशभूषेची कल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने देतो. पुतळ्याकडे बघितलं की लक्षात येतं की पुरुष फुलांची सूक्ष्म नक्षी असलेली कापडाचा वापर करत असे.
अजुन एका पुराव्यात देवीची मुर्ती सापडली असून महिला दागिन्यांचा वापर करत होत्या हे त्यावरुन स्पष्ट होतंय. छोट्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या असणाऱ्या या गोष्टी आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या वेशभूषेबद्दल एक अंदाज बांधण्यास पुरेशा आहेत.
पुराव्यातुन मिळालेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या वर्गातील लोकांच्या वेशभुषेचा अंदाज लावता येणं अवघड आहे. पण केनोयर जे. एम. या इतिहास संशोधकाच्या अभ्यासानुसार सामान्य पुरुष धोतर तर स्त्रिया परकरसारख्या वेशभूषा दैनंदिन जीवनात वापरत असत.
आणखी मिळालेल्या काही पुराव्यांनुसार पायांची मोकळी हालचाल गरजेची असल्याने तरुण पायजम्याचा वापर करत असत असाही निष्कर्ष काढता येतो. कापसाबरोबरच रेशम, अंबाडी, लोकर यांचा वापरही कपडे तयार करण्यासाठी केला जात असावा.
तसेच पुरुष-स्त्रिया अंगावरती भरपुर दागिने वापरत असावीत. हे दागिने सोने,चांदी,ताम्र यांनी बनवलेले असत तर मूल्यवान मोती त्यामध्ये वापरले जात असत. यावरुन त्यावेळी असलेल्या धनिक संपदेचा ही अंदाज लावता येतो.
तसेच हडप्पा संस्कृतीमध्ये केसांना लावण्यासाठी विविध दागिन्यांचा वापर केला जात असावा असा अंदाज आपण पुराव्यांवरुन लावू शकतो. या दागिन्यांवरुन त्यावेळी लोकांना केशभूषेबद्दल अतिशय आकर्षण होतं हे सुध्दा स्पष्ट होतं. तसेच केसांमधे टोपी आणि पागोटे यांचादेखील वापर केला जात होता.
या वैविध्याने समृध्द असलेल्या हडप्पा संस्कृतीमधूनच आत्ता आपण वापरत असलेल्या पगड्या, तसेच विविध दागिने यांची सुरुवात झाली असं म्हणण्यास हरकत नाही. सिंधु संस्कृतीनंतर गुप्त काळात साडीचं महत्त्व वाढत गेलं. तसंच मुघल आ*क्रमणात वाढ झाल्यानंतर सलवार-कमीजसारख्या कपड्यांचं महत्त्व वाढत गेलं.
२. संगम काळ (ई .स.पू.५०० ते ई. स. पू. ३००)
इतिहास समजून घेत असताना त्या काळातील साहित्य अतिशय महत्त्वाची भुमिका बजावत असते. संगम काळातील वेशभूषा समजून घेण्यात आपल्याला त्या काळातील साहित्याचा उपयोग करता येतो. त्याकाळात लिहिल्या गेलेल्या कविता, वेद, आणि लेखांमधून आपल्याला वेशभुषेचा अंदाज येतो.
संतनम स्वामीनाथन या पत्रकाराने या लेखांचा अभ्यास करुन त्या काळातील एक कवी ‘नक्कीरार’ याबद्दल लिहिलंय.
नक्कीरारच्या लेखानुसार, प्राचीन तमिळ लोक वरती एक कपडा आणि खाली धोतर या प्रकारे कपडे घालत असत. ‘कंचुकम’ नावाचा सदरा वापरात असल्याचे पुरावे सापडले आहेत ज्याचा वापर सैनिक किंवा परदेशी अंगरक्षक करत असत.
काही शिल्पांनुसार आणि चित्रांनुसार त्या काळी महिला फक्त कमरेच्या खाली झाडांच्या पानाचा वापर करत असत हे दिसतंय. अशोका या झाडाची पाने, तसेच पुन्नैच्या फुलांचा वापर करुन परकर बनवले जात असत. तेच काही शिल्पांमध्ये स्त्रिया ‘कलिंगम’ नावाचं वस्त्र पुर्ण शरीर झाकण्यासाठी करत असत असं दाखवण्यात आलं आहे.
महिला दागिन्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असत असा अंदाज विविध ऐतिहासिक पुराव्यातुन येतो. ‘मकुता’ नावाचा सोन्याचा दागिना, मौल्यवान हिरे-मोत्यांनी जडलेला होता. तसेच केस आणि कानांमध्ये विविध दागिने वापरले जात असत. दागिने बनवण्यासाठी सोने, विविध मोती, हिरे यांचा वापर केला जात असे.
आजच्या काळात आपण आपला हा ऐतिहासिक ठेवा जसाच्या तसे समोर जरी आणला नसेल तरी या इतिहासाचा आपल्या आता असलेल्या वेशभूषेवर खुप मोठा प्रभाव आहे. इतिहासाशिवाय वर्तमान शक्य नाही याचं हे एक उत्तम उदाहरण. हाच वारसा आपण पुढे चालु ठेवूयात यातच त्याचा सन्मान आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.