आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताच्या इतिहासात अनेक शूर राजे व महाराजे होऊन गेले आहेत, ज्यांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर इतिहासात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशाच पराक्रमी राजांपैकी एक होते राणा कुम्भा ज्यांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर मुघलांना धडकी भरवली होती. ज्याच्या केसाला देखील धक्का लावता येत नव्हता, त्या महापराक्रमी राणा कुम्भाला त्याच्या पोटच्या पोराने कपटाने मारले होते. त्याने असे का केले, हे जाणून घेऊया…
राजस्थानमधील चित्तोडचे महाराज राणा मोकल यांच्या घरात राणा कुम्भा यांचा जन्म झाला. राणा कुम्भा यांचे वडील प्रचंड प्रतापी होते आणि त्यांच्या वडिलांकडून हाच शौर्याचा वारसा त्यांना मिळाला. १४३१ साली राणा मोकल यांचे निधन झाले. १४३३ साली राणा कुम्भा मेवाडच्या गादीवर विराजमान झाले. त्यांनी त्यांचे सर्वात मोठे शत्रू असलेल्या देवाडा चव्हाणांचा पराभव करून माउंट अबूवर आपले साम्राज्य उभारले. त्यांनी माळव्याचा दिशेने यायला निघालेल्या सुलतान महमूद खिलजीचा पराभव केला. विजयाच्या आठवणीत त्याने विजयस्तंभ उभारला.
आजही हा विजयस्तंभ आपल्याला पहायला मिळतो. राणा कुम्भाच्या विजयाची मालिका अशीच सुरु होती.
नागौर, नराणा, सारंगपूर, अजमेर, बुंदी, खातु, चा़टुस, मंडोर आणि मोडालगड या ठिकाणांवर त्यांनी विजय संपादन केला. इतकेच नाहीतर सुलतान महमूद शहाला त्याने यु*द्धात धूळ चारली. राणा कुम्भा यांच्यावर त्यांच्या शत्रूंनी अनेक वेळा आक्र*मणे केली पण त्यांना कधीच राणा कुम्भाचा पराभव करता आला नाही. दरवेळी राणा कुम्भा त्यांना पिटाळून लावत होता.
राणाच्या विजय अभियानात १४५५ मधील नागौरच्या यु*द्धाला फार महत्त्व आहे. या यु*द्धात राजा मुजाहिद खां याचा पराभव करून शम्स खां याला राजा बनवण्यात राणा कुम्भाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पण सत्ता हाती येताच शम्सने राणा कुम्भाची फसवणूक करत, त्याच्या विरोधात विद्रोह केला. यामुळे संतापलेल्या राणा कुम्भाने नागौरवर स्वारी केली. शम्स यावेळी आपला जीव वाचवत पळाला आणि त्याने गुजरातचा राजा कुतुबुद्दीनच्या राज्यात आसरा घेतला, पण राणा कुम्भाने त्याला इथे देखील शोधून काढले आणि त्याच्या सैन्याचा पराभव केला.
आपल्या राज्यात राणा कुम्भाचे आक्र*मण झाले, असे वाटून कुतुबुद्दीनने आपले सैन्य पाठवले, पण राणा कुम्भाने त्यांना देखील धूळ चारली, हे बघून संतापलेला कुतुबुद्दीन स्वत: चालून आला, पण राणा कुम्भाने त्याला देखील लोळवले.
राणा कुम्भा या यु*द्धात मग्न आहे, हे पाहून सुलतान महमूद खिलजीने माळव्यातील राणा कुम्भाच्या राज्यातील प्रदेश जिंकून घेतला.
पण १४५८ साली राणा कुम्भाने स्वतःच्या हिंमतीवर हा सर्व मुलुख पुन्हा आपल्या साम्राज्याला जोडला.
राणा कुम्भा हा एक अजेय राजपूत शासक बनला होता, त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरु होती. त्याचा पराक्रम डोळे दीपवून टाकणारा होता. मुघल व सुलतानी सैन्याने त्याच्यासमोर नांगी टाकली होती. अवघ्या ३५ वर्षांच्या राणा कुम्भाचा पराक्रम अनेकांना भुरळ घालणारा होता.
त्याने फक्त यु*द्धच लढले नाहीत, तर चित्तोडगड, कुंभलगड, अचलगड, अशा काही मजबूत किल्ल्यांची निर्मिती देखील केली. राणा कुम्भाची कीर्ती सर्वदूर पसरली. जोपर्यंत राणा कुम्भा जिवंत आहे, तोपर्यंत मेवाड साम्राज्याला दुसरा अधिपती मिळणे अशक्य आहे, हे त्याच्या शत्रूंच्या देखील लक्षात आले होते. त्याच्या सर्व बाह्य शत्रूंनी त्याच्या वाट्याला जाण्याचा नाद सोडला होता.
पण याच काळात त्याच्या घरातच एक अंतर्गत शत्रू उभा राहत होता. हा शत्रू दुसरा तिसरा कोणी नाहीतर त्याचा मुलगा उदा सिंह होता.
उदा सिंह हा आपल्या पित्याचा विपरीत होता. तो अत्यंत विलासी आणि अतिआत्मविश्वासी होता. मेवाडच्या साम्राज्याचा चाव्या त्याला आपल्या हातात घ्यायचा होत्या. यासाठी त्याच्या मार्गातील सर्वात अडथळा त्याचा बाप राणा कुम्भा असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने लगेचच कुम्भाचा काटा काढण्याची योजना आखण्यास सुरुवात केली.
राणा कुम्भाची दिनचर्या उदा सिंहला ठाऊक होती, त्याला हे माहिती होते की सकाळी मंदिरात जाताना राणा कुम्भा ह*त्यार बाळगत नाही. संपूर्ण दिवसात हाच तो क्षण होता, ज्यावेळी त्याच्याकडे राणा कुम्भाचा काटा काढण्याची संधी होती. त्याने केले देखील तसेच, तो सकाळी महादेव मंदिराच्या पाठीमागे वाट बघत थांबला होता.
त्याला इतक्यात राणा कुम्भाच्या पावलाची चाहूल लागली आणि तो गर्भगृहात जाऊन लपला, जसा राणा कुम्भा गर्भगृहात येऊन महादेवाच्या पिंडासमोर नतमस्तक झाला. संधीचा फायदा घेऊन उदा सिंहने राणा कुम्भाचा शिर*च्छेद केला. मंदिरासारख्या पवित्र स्थळी त्याने पितृह*त्येचे महापाप केले.
राणा कुम्भाच्या मृत्युनंतर उदा सिंह राजा बनला खरा, पण गाढवाला गुळाची चव काय? सत्ता हाती आल्यावर त्याने विलासी जीवन जगण्यास सुरुवात केली, याचा फायदा घेऊन राणा कुम्भाच्या शत्रूंनी मेवाडच्या ताब्यातील बहुतांश भागावर आपले राज्य स्थापित केले. उदा सिंहला याची कसलीच पर्वा नव्हती, तो आपल्या विलासी जीवनशैलीत रमला होता. काही काळाने एकदा आपल्या बागेत तो फिरत असताना आकाशातून वीज त्याच्या अंगावर पडली, यामुळे त्याचा मृत्यू झाला.
आजही या भागातील लोक मानतात की त्याच्या अंगावर राणा कुम्भा स्वत: विजेचे रूप घेऊन त्यावेळी आपल्या ह*त्येचा प्रतिशोध घेण्यासाठी आला होता.
राणा कुम्भासारख्या पराक्रमी राजाला मारून त्याच्या मुलाने मेवाडचेच नाहीतर संपूर्ण भारताचे मोठे नुकसान केले होते. राणा कुम्भा त्यावेळी मृत्युमुखी पडला असला तरी आज तो इतिहासात अमर झाला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.