आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
इंग्रजांविरोधात सर्वात पहिले बंड पुकारणाऱ्या भारतीय क्रांतिकारकाचे नाव होते मंगल पांडे!
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पहिले नायक म्हणून मंगल पांडे यांचे नाव पुढे येते. १९ जुलै १८२७ साली उत्तर प्रदेशच्या बालिया जिल्ह्यात मंगल पांडेंचा जन्म झाला.
२९ मार्च १८५७ मध्ये इंग्रजांच्या विरोधात बैरकपुर येथे उठाव करण्यात आला होता, त्या उठावाचे नेतृत्व मंगल पांडे यांनी केले होते. १८ एप्रिल १८५७ रोजी इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी देण्याचे ठरवले, परंतु त्यांना १० दिवस अगोदरच इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मंगल पांडे यांनी क्रांतीचे बीजारोपण केले होते. मंगल पांडे कोलकत्ताच्या जवळील बैरकपुरच्या सैनिक छावणीत ३४ व्या बंगाल लाईट इन्फन्ट्रीमध्ये जवान म्हणून मंगल पांडे काम करायचे. २९ मार्च १८५७ च्या संध्याकाळी ब्रिटिशांवर गोळ्या झाडल्याच्या व ह*ल्ला चढवल्याच्या आरोपाखाली त्यांना ब्रिटिश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांना १८ एप्रिल १८५७ रोजी फाशी देण्यात येणार होती पण त्यांना फाशी देण्यासाठी कुठलाच जल्लाद तयार नव्हता.
बैरकपूरमध्ये कुठलाच जल्लाद फाशी देण्यासाठी तयार नव्हता म्हणून इंग्रजांनी बाहेर गावाहून चार जल्लाद बोलावले. ही बातमी जशी पसरली तसा तिथल्या सैनिकांमध्ये व कैद्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.
पण लोकांनी काही करू नये या भीतीने इंग्रजांनी मंगल पांडे यांना १० दिवस अगोदरच ८ एप्रिलला फाशी दिली.
इतिहासकार किम एन वैगनर यांच्या ‘द ग्रेट फियर ऑफ १८५७ – ऱ्यूमर्स, कॉन्सपिरेसीज अँड मेकिंग ऑफ द इंडियन अपराइजिंग’ या पुस्तकात मंगल पांडे यांच्या उठावाची व त्यांना देण्यात आलेल्या फाशीचा सर्व इतिहास नमूद करण्यात आला आहे.
२६ फेब्रुवारी १८५७ रोजी गाई व डुकराच्या चरबीचे काडतुस हिंदू व मुस्लिम सैनिकांना देऊन त्यांचा धर्मभ्रष्ट करण्याचा प्रयत्न ब्रिटिश करताहेत म्हणून मंगल पांडे यांनी आपल्यासारख्या असंख्य शिपायांना जागृत करून त्यांना बंडासाठी प्रेरित केले.
ब्रिटिश इतिहासकार रोजी लिलवेलन जोन्स यांच्या ‘द ग्रेट अपराइजिंग इन इंडिया, 1857-58 अनटोल्ड स्टोरीज, इंडियन एंड ब्रिटिश’ या पुस्तकात लिहिले आहे की २९ मार्चच्या संध्याकाळी मंगल पांडे त्यांच्या साथीदारांसह युरोपियन अधिकारी तुरुंगात येण्याची वाट बघत होते. ज्यावेळी ते तुरुंगात आले त्यावेळी मंगल पांडे यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया म्हणून पुन्हा ह*ल्ला चढवला.
वैगनर लिहितात की मंगल पांडे यांनी दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळीबार केला पण निशाणा दोन्ही वेळा चुकला. शेवटी त्यांनी तलवार उपसली आणि ते त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर चालून गेले. यात एक अधिकारी फार जखमी झाला. अखेरीस एका ब्रिटिशाने मंगल पांडे यांना पकडले. त्यावेळी मंगल पांडे यांनी स्वतःच्या पायाच्या अंगठ्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली, पण त्यात त्यांना काहीच झाले नाही.
पुढे ब्रिटिशांनी मंगल पांडेवर खटला लढवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. ‘फिरंग्यांना मारा’ हा नारा मंगल पांडे यांनी दिला व यातूनच १८५७ च्या क्रांतीची ज्वाला भडकली होती. जोन्स हा इतिहासकार लिहितो की मंगल पांडे यांनी जेम्स हिसन्स या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. पण हिसन्स यात वाचला होता.
शेख पलटू नावाचा एक ब्रिटिशांचा साथीदार मंगल पांडेंसोबत घटनास्थळी होता. ज्यावेळी बेपंदे नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी ह*ल्ला केला त्यावेळी शेख पलटूने त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. त्यावेळी ईश्वरी प्रसाद या मंगल पांडेंच्या सहकाऱ्याने त्या शेखला कंठस्नान घातले. मंगल पांडेंच्या नंतर २१ तारखेला ईश्वरी प्रसाद यांना फासावर लटकवण्यात आले होते.
पुढे ब्रिटिशांनी ३४ लाईट इन्फन्ट्री ही सैन्य तुकडी बरखास्त करून मंगल पांडे यांचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
ज्या बैरकपूरमध्ये मंगल पांडे यांनी बलिदान दिलं, तिथे आज एक मोठं उद्यान उभारण्यात आलं आहे. १९८४ साली भारत सरकारने मंगल पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवीन टपाल तिकीट काढले होते.
देव व देशाचा जाज्वल्य अभिमानाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजेच हुतात्मा मंगल पांडे होय!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.