आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
थंडीचा ऋतू जवळपास सगळ्यांना आवडतो. एकदम गुलाबी-गुलाबी थंडीमध्ये सकाळी जास्तवेळ अंथरुणात पडून राहण्याची मजा काही औरचं असते नाही का? मात्र, दरवर्षी हिवाळा ऋतू आला की, दिल्लीकरांना धास्ती पडते. कारण त्यांना धुक्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. हवा प्रदुषण आणि थंडीत पडणारं धुकं यांचं एकत्र मिश्रण होऊन एकदम दाट धुक्याची चादर दिल्लीवर दरवर्षी पसरते. याचा परिणाम म्हणून अनेकदा जनजीवन देखील विस्कळीत होतं. पण सुदैवानं दुपारपर्यंत का होईना दिल्लीतील धुकं काहीसं कमी . मात्र, १९५२ लंडनमध्ये याचं धुक्यानं मोठ्या प्रमाणात दहशत माजवली होती. एरवी एकदम अल्हाददायक वाटणाऱ्या धुक्यानं लंडनमध्ये हजारो लोकांचा बळी घेतला होता.
६९ वर्षांपूर्वी लंडनमध्ये असं काय झालं होतं की, आजही तेथील लोकांच्या मनात धुक्याची भीती बसलेली आहे?
थंडीच्या ऋतूतील ती ५ डिसेंबरची सकाळ होती आणि आकाश निरभ्र होतं. लंडनमध्ये आठवड्याभरापासून प्रचंड थंडी वाढली होती. त्यामुळं शहरातील प्रत्येक घरात आणि दुकानात मस्त उबदार शेकोट्या पेटलेल्या होत्या. लंडनवासी हळूहळू आपापल्या कामासाठी घराबाहेर पडत होते. मात्र, जसजसा दिवस डोक्यावर चढला, वातावरणात विचित्र बदल होऊ लागले. बिग बेन, सेंट पॉल कॅथेड्रल, लंडन ब्रिज आणि शहराच्या खुणा एकदम दाट धुक्यात हरवून गेल्या.
पुढच्या काही तासातच, हे धुकं आणि लंडनमधील फॅक्टरीच्या चिमण्या व शेकडो वाहनांनी सोडलेला धूर एकत्र आल्यामुळं पिवळसर तपकिरी रंगाची एक चादरच शहरावर पसरली.
थंडी आणि धुक्याची सवय असलेल्या नागरिकांनी या धुक्याला जास्त गांभीर्यानं न घेता आपला दिनक्रम सुरू ठेवला. मात्र, दुसऱ्या दिवशी देखील वातावरण आणखी बिघडलं. लंडनमध्ये परसलेल्या या स्मॉगला(स्मोक आणि फॉग यांचं मिश्रण) सहन करणं नागरिकांसाठी कठिण झालं.
लंडन शहरासह संपूर्ण दक्षिण इंग्लंडमध्ये हवेचा उच्चदाब तयार झाला होता. त्यामुळं तापमानात अनेक उलटसुलट बदल होऊन हवा अतिशय कोंदट झाली. लंडनमधील गंधकयुक्त कोळशाचा धूर वातावरणाच्या वरच्या थरात विरून जाऊ शकला नाही. कुजलेल्या अंड्यांसारखा वास हवेला प्राप्त झाला होता. एकूणच दिवसेंदिवस लंडनची स्थिती बिघडत चालली होती. ५ डिसेंबर(शुक्रवार) ते ९ डिसेंबर(मंगळवार) पर्यंत लंडनच्या वातावरणात हा स्मॉग भरला होता. त्याची घनता इतकी जास्त होती की, रस्त्यावर उभं राहिलं तर स्वत:चे पाय देखील दिसत नव्हते.
जवळपास सहा दिवस स्मॉगमुळं लंडन अगदी पॅरालाईज झाल्यासारखं झालं होतं. भुयारी रेल्वे वगळता इतर सर्व वाहतूक बंद करावी लागली होती. व्हिजिबलीटी कमी झाल्यानं थेम्स नदीतील बोटींची वाहतूक ठप्प झाली. विमान उड्डाणं थांबवण्यात आली आणि गाड्या रद्द करण्यात आल्या. लोकांनी रस्त्यावर ठिकठिकाणी आपल्या गाड्या तशाच सोडल्या होत्या.
इतकंच काय घराच्या बाहेर पडलेला माणूस पूर्ण काळं तोंड घेऊनचं घरी येत होता. (स्मॉगमुळे चेहरे काळवंडत होते) त्यांची अवस्था अगदी खाण कामगारांसारखी झाली होती.
शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. पालकांनी मुलांना घराबाहेर जाऊ न देण्याचा सल्ला देण्यात आला. जवळचा माणूसही नीट दिसत नसल्याचा मात्र, गुन्हेगारांना फायदा झाला. शहरात लूटमार, घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. विकेन्डला होणारे सॉकर गेम्स रद्द केले गेले. ऑक्सफर्ड आणि केंब्रिजनं मात्र, त्यांची वार्षिक क्रॉस-कंट्री स्पर्धा विम्बल्डन कॉमनमधील ट्रॅक मार्शलच्या मदतीनं खेळवली. सुरुवातीला घराबाहेर असणारा स्मॉगनं हळूहळू लोकांच्या घरांचा देखील ताबा घेतला होता.
१९५२ चा हा ग्रेट स्मॉग उपद्रवी आणि प्राणघातक होता. विशेषत: वृद्ध, लहान मुले आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांवर याचे घातक परिणाम झाले. जेव्हा शहरात कॉफिन्स आणि बुकेंची कमतरता जाणवू लागली तेव्हा स्मॉगचा परिणाम समोर आला. ब्राँकायटिस आणि न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये सातपट वाढ झाली तर लंडनच्या ईस्ट एंडमधील मृत्यूचं प्रमाण नऊपटींनी वाढली होतं.
प्राथमिक अहवालांनुसार स्मॉगमुळं जवळपास ४ हजार नागरिकांचा अकाली मृत्यू झाला. १९५३ च्या उन्हाळ्यापर्यंत मृत्यूदर हा वाढतच राहिला. अनेक तज्ज्ञांच्या मते, ग्रेट स्मॉगमुळं ८ ते १२ हजार लोक मरण पावले होते. स्मॉगचा परिणाम फक्त माणसांवर नाही तर, प्राणी आणि पक्ष्यांवर देखील झाला. हजारो पक्षी इमारतींना धडकून मरण पावले. कित्येक पशुपालकांनी आपल्या जनावरांना गोणपाटाचे मास्क लावले होते.
वास्तविक पाहता १३व्या शतकापासून लंडनमधील हवेची गुणवत्ता खराब होण्यास सुरुवात झाली होती. १६०० च्या दशकात तर ती आणखी खालावली. त्यानंतर दोन्ही महायुद्धातील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योग वाढवण्यात आले. याचा परिणाम म्हणून लंडनला ‘ग्रेट स्मॉग’चा सामना करावा लागला.
ही ब्रिटनच्या इतिहासातील वायू प्रदूषणाची सर्वात वाईट घटना असल्याचं मानलं जातं. त्यानंतर पर्यावरणीय संशोधन, सरकारी नियमन आणि हवेची गुणवत्ता व आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल जनजागृती करण्याचं महत्त्व अधोरेखित झालं.
या घटनेनंतर एक समिती तयार करून या घटनेमागची कारणं पडताळण्यात आली. समितीनं दिलेल्या अहवालानंतर संसदेनं १९५६ मध्ये ‘क्लीन एअर ऍही ब्रिटनच्या इतिहासातील वायू प्रदूषणाची सर्वात वाईट घटना असल्याचं मानलं जातं. त्यानंतर पर्यावरणीय संशोधन, सरकारी नियमन आणि हवेची गुणवत्ता व आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल जनजागृती करण्याचं महत्त्व अधोरेखित झालं. ऍक्ट’ मंजूर करण्यात आला. ज्यामुळे शहरी भागात कोळसा जाळण्यावर प्रतिबंध घालण्यात आला. घरमालकांना कोळशाच्या शेकोट्यांचे पर्यायी हीटिंग सिस्टममध्ये रूपांतर करण्यासाठी अनुदान देण्यात आलं. गॅस, तेल आणि वीज यांना शहराच्या उर्जेचा मुख्य स्रोत होण्यास बरीच वर्षे लागली. याकाळात अधूनमधून स्मॉग येण्याच्या अनेक लहान मोठ्या घटना घडल्या. १९६२ मध्ये देखील स्मॉगमुळं ७५० लोकांनी आपला जीव गमावला होता. मात्र, १९५२चा ग्रेट स्मॉग हा तीव्रता आणि जिवितहानीच्या बाबतीत ग्रेटच राहिला आहे.
सध्या जगभरातील विविध शहरांतील प्रदुषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ती पाहता भविष्यात ग्रेट स्मॉगपेक्षाही काहीतरी मोठं संकट नक्कीच येऊ शकत यात शंका नाही. भूतकाळात घडलेल्या घटनांपासून आपण सर्वांनी धडा घेतला पाहिजे आणि पर्यावरण संतुलनासाठी युद्धपातळीवर काम केलं पाहिजे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.