आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
व्यक्तिस्वातंत्र्याच्या पुरस्कर्ता असलेल्या देशात राहूनच जेव्हा विदेशी ताकदी त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ लागतात तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यक्तिस्वातंत्र्य किंवा आदर्शवाद यांच्यात शीतयुद्ध सुरु होतं. पण राष्ट्रीय सुरक्षा डावलून फक्त व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केल्यास कसं नुकसान होतं याचं उदाहरण भारताची ईशान्येकडील राज्ये आणि त्याबद्दल सतत येत असलेली वक्तव्ये. आदर्शवाद, इत्यादींचा मान राखून भारताने असंख्य आश्रितांना जागा दिली. पण तेच कालचे आश्रित आज अंतर्गत शत्रू बनून असम आणि बंगालसारख्या राज्यांची सुरक्षा व्यवस्था बिघडवू पाहताहेत.
आजचं युग हे हायब्रीड वॉरफेअरचं किंवा इन्फर्मेशन वॉरफेअरचं आहे याबद्दल आपण जाणतोच. परंतु पाकिस्तानने निर्मितीनंतर अवघ्या २ वर्षांत ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ किंवा आयएसपीआर नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेशी संलग्न असून या संस्थेचे एकमेव काम म्हणजे पाकिस्तान तसेच काश्मीरमध्ये भारत देश आणि सरकारबद्दल खोट्या, पुरावेहीन बातम्या छापून आणणे, या खोट्या बातम्या आणि माहितीच्या आधारे स्थानिक तरुणांची माथी भडकावून त्यांना ‘जिहाद’ करायला शिकवणे. यातूनच अनेक अफझल, कसाब, बुऱ्हाण आणि अदिल अहमद दार तयार होतात.
एकविसावं शतक उजाडलं आणि आयएसपीआरचं काम आणखी सोपं केलं ते इंटरनेट आणि फेसबुकसारख्या समाजमाध्यमांनी. मुळात पाकिस्तान देशच ‘टू नेशन्स थिअरी’ नावाच्या खोट्या सिद्धांतावर उभा असल्याने आपल्या अस्तित्वासाठी त्यांना ‘आयएसपीआर’सारखा जुगार खेळावा लागला. सध्या आयएसपीआर आणि त्यांच्या एजण्ट्सनी संपूर्ण ट्विटर आणि युट्युबसारखी समाजमाध्यमं व्यापली आहेत. यावरून काहीही खोटी माहिती आणि बातम्या पसरवून भारतातील मुस्लिम तरुणांची डोकी भडकावून देण्याचं काम आयएसपीआर सतत करत असतं. याचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे सीएए विरोधात झालेलं शाहिनबागचं ‘तथाकथित’ आंदोलन.
चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या यांच्यामुळे इतिहासाची पानं बदलली आहेत. भारत सरकारने अलीकडेच खोट्या बातम्यांवर कारवाई व्हावी यासाठी अनेक पावले उचलली. यामध्ये ‘पब्लिक इन्फर्मेशन ब्युरो – फॅक्ट चेक’ आणि माहिती तंत्रज्ञान विषयी कायद्यांची कठोर अंमलबजावणी यांचा समावेश होतो. अलीकडेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अधिसूचित तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता प्रथमच लागू करून, भारत सरकारने २० युट्युब चॅनेल्स आणि दोन वेबसाईट्सवर ‘भारतविरोधी’ खोटा प्रचार केल्याबद्दल बंदी घातली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी युट्युब आणि दूरसंचार विभागाला भारताच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे साहित्य त्वरित ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, हे साहित्य अतिशय “निंदनीय” स्वरूपाचे होते आणि ही माहिती पसरवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसद्वारे वित्तपुरवठा केला जात होता. हा प्रकार सर्वप्रथम भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आला आणि त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याची गंभीरपणे दखल घेऊन चौकशी केली.
बंदी आणलेल्या प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे ‘नया पाकिस्तान’ नावाचे युट्युब चॅनेल. ‘नया पाकिस्तान’ चॅनेलचे युट्युबवर २० लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. या चॅनेलवरून काश्मीर, शेती कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने आणि अयोध्या यासारख्या मुद्द्यांवर खोट्या बातम्या आणि माहिती चालवली जात असे. बंदी घालण्यात आलेले आणखी एक पोर्टल म्हणजे ‘नया पाकिस्तान ग्रुप’. या ग्रुपचे यूट्यूबवर १५ हून अधिक चॅनेल्स होते आणि या ग्रुपमध्ये तब्बल १५ लाख सदस्य होते.
अशा प्रकारच्या चॅनेल्सवर ‘पीएम मोदींनी काश्मीरमध्ये पराभव मान्य केला, कलम ३७० पुन्हा लागू झाले’, असा मजकूर होता. याशिवाय ‘तालिबान आर्मी काबूलहून भारतावर विजय मिळवण्यासाठी निघाली’, ‘तैय्यप एर्दोगनने काश्मीरसाठी ३५ हजार मार्सिनरी सैन्य पाठवले’ आणि ‘तुर्की आर्मी बदला घेण्यासाठी अयोध्येत राममंदिरात घुसली’ अशा आशयाची भडकाऊ माहिती होती. मंत्रालयाच्या मते, या सर्व गोष्टी भारतामध्ये अशांतता पसरवण्यासाठी केल्या जात आहेत.
माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम १६ अंतर्गत, माहिती आणि प्रसारण मंत्रालय सोशल मीडियावरील या प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य ब्लॉक करणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या चॅनेल्स आणि वेबसाइट्सवर बंदी घालण्याचा आणि ब्लॉक करण्याचा निर्णय ४८तासांच्या आत आंतर-विभागीय समितीसमोर सादर केला जाईल, त्यानंतर या बंदीला नव्या माहिती आणि तंत्रज्ञान नियम,२०२१ अंतर्गत एका उच्चस्तरीय समितीद्वारे मान्यता दिली जाईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.