आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
मोठ्या यशाची किंमत असते तेवढंच मोठं अपयश. आपल्या भारदस्त आवाजाने सिनेसृष्टीवर वर्चस्व गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांना आकाशवाणीने त्याच आवाजासाठी नाकारले होते. आयुष्यात नकार किती महत्त्वाचा आहे हे या उदाहरणातून कळून येते. नकार जिव्हारी लागला की मग माणूस पेटून उठतो. यश मिळाल्याशिवाय त्याची ती आग विझत नाही.
असंच अजून एक उदाहरण आहे. ते म्हणजे भारताचे सर्वश्रेष्ठ रेडिओ उद्घोषक अमीन सयानी. भारतीय रेडिओ इतिहासातील सगळ्यात जास्त गाजलेले नाव अमीन सयानी यांना आकाशवाणीने आवाजाच्या चाचणीकरिता बोलावले असता त्यांच्या आवाजात इंग्रजी आणि गुजराती भाषेचा प्रभाव जाणवतो असे सांगून त्यांना नाकारले होते. पुढे जाऊन त्यांनी हिंदी भाषेच्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ उद्घोषक म्हणून नाव कमावले.
सयानी यांचा जन्म २१ डिसेंबर, १९३२ रोजी मुंबईच्या एका बहुभाषिक कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईच्या भाषिक मिश्रणातून तयार झालेल्या हिंदी भाषेत झाले. त्यांनी सुरुवातीचे शालेय शिक्षण न्यू एरा शाळेत घेतले जिथे त्यांना मुख्यतः गुजराती भाषेचे शिक्षण दिले जात होते.
अतिशय कमी वयात त्यांनी आपल्या आईच्या ‘रेहबर’ या पाक्षिकात लेख लिहिण्यास सुरुवात केली. देवनागरी, गुजराती आणि उर्दू भाषेत हे पाक्षिक प्रसिध्द होत असे. काही कारणांमुळे त्यांना मुंबईची शाळा सोडून ग्वाल्हेरच्या सिंधीया शाळेत प्रवेश घ्यावा लागला.
त्याचवेळी गांधीजींच्या खू*नाची बातमी आली आणि त्यांनी राष्ट्रभाषेतच काम करण्याचा निर्णय घेतला. १९५२ मध्ये माहिती आणि प्रक्षेपण मंत्री बी. वी. केसकर यांनी चित्रपटगीत आणि ७८ आरपीएमच्या ध्वनीफितींवर बंदी आणली. ऑल इंडिया रेडिओ बंद करण्यात आला. तेव्हा श्रीलंकन रेडिओ मात्र बहरत होता.
ब्रिटिशांनी श्रीलंका सोडले तेव्हा त्यांनी कमी लांबीच्या लहरींचे प्रसारणयंत्र माउंटबैटनच्या दक्षिण-पुर्व भागासाठी सोडुन दिले. कोलंबोने त्यांचा वापर सिंहलीज, इंग्रजी, तमिळ आणि हिंदीमध्ये व्यावसायिक जाहिराती देण्यासाठी केला.
भारतात राहत असलेल्या डैनिएल मोलिना या अमेरीकन व्यक्तीने ही संधी साधुन रेडिओ सुविधा सुरु केली. यासाठी त्याने बालगोविंद श्रीवास्तव, मनमोहन कृष्णा अशा महान लोकांना घेतले.
याच वेळी सयानींनी आपला हिंदी उच्चार अजुन चांगला करण्यासाठी सेंट झेवियर येथे प्रशिक्षण सुरु केले होते. एक दिवस ‘ओवलटाईन फुलवारी’ या कार्यक्रमाच्या उद्घोषकाची अचानक तब्येत बिघडल्याने कार्यक्रमासाठी उद्घोषकाची गरज भासली. तेव्हा अमीन सयानी तिथे असताना त्यांना २-३ जाहिराती घोषित करण्यासाठी विचारले गेले असता कसलाही विचार न करता ते हो म्हटले. यावेळी त्यांनी या जाहिराती अतिशय मोठ्या आवाजात दिल्याने त्यांना हळु आवाजात, न ओरडता घोषणा देण्याचा सल्ला दिला गेला.
श्रीलंकन रेडिओवर त्याकाळात बिनाका हिट परेड नावाचा एक कार्यक्रम यायचा, ज्यामध्ये इंग्रजी गाणे लोकांच्या विनंतीवरुन प्रस्तुत केले जात असत.
त्यावेळी रेडिओला असाच कार्यक्रम हिंदी गाण्यांसाठी करण्यात यावा असे अनेक पत्र येत असत. त्यातुनच बिनाका गीतमालेचा जन्म झाला. या कार्यक्रमासाठी उद्घोषक म्हणुन अमीन सयानी यांनी पुढाकार घेतला. आठवड्याला २५ रुपये एवढा पगार त्यावेळी त्यांना दिला जाणार होता.
डिसेंबर १९५२मध्ये पहिला कार्यक्रम होणार होता. २००-३०० पत्रांची अपेक्षा असताना त्यांना त्यावेळी गाण्याची विनंती करणारे ९००० पत्रं आली. कार्यक्रमाशी निगडीत असलेल्या सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. यातुन काही निवडक पत्रं निवडून बाकी पत्रं पुढच्या भागात घेण्याचा निर्णय घेऊन कार्यक्रम सुरु झाला.
कार्यक्रमाच्या यशात अमीन सयानी यांच्या आवाजाची पण कमाल होती. “भाईयों और बहनों” या पारंपरिक घोषणेला बगल देत त्यांनी “बहनों और भाईयों” अशी सुरुवात केली. पुढे जाऊन हिच घोषणा भारतीय रेडिओ इतिहासातील सगळ्यात महत्त्वाची आणि परिणामकारक घोषणा म्हणुन लोकांच्या लक्षात राहिली.
श्रीलंकन रेडिओवर असलेल्या या गीतमालेने सयानी यांचे नाव भारतभर प्रसिद्ध केले. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी भारतातील लाखो कुटुंब बुधवारी संध्याकाळी रेडिओला कान लावून बसत असत. मध्यमवर्गीय घरांमध्ये अजुन दुरचित्रवाहिनी पोहचली नव्हती. त्यामुळे रेडिओच अजुनही सगळ्यात मोठे मनोरंजनाचे साधन होते.
३ डिसेंबर १९५२ रोजी सुरु झालेला हा गीतमालेचा कार्यक्रम भन्नाट लोकप्रिय झाला. ७०च्या दशकाच्या शेवटी या कार्यक्रमाला ऐकणाऱ्या लोकांची संख्या २१ कोटी एवढी झाली होती. प्रत्येक आठवड्याला येणाऱ्या पत्रांची संख्या होती ६५,०००. त्यावेळी हा कार्यक्रम सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळवत होता, त्याचे कारण म्हणजे अमीन सयानी यांचा नाजुक आणि सुन्दर आवाज होता.
१९८९ पासून गीतमाला ऑल इंडिया रेडिओच्या विविध भारतीवर प्रसारित होण्यास सुरुवात झाली.
नंतर त्यांनी काही फैशन कार्यक्रमसुध्दा निवेदित केले. ‘मेड फॉर इच ऑदर’ नावाच्या कार्यक्रमात त्यांनी उद्घोषक म्हणुन काम केले. भूत बंगला, बॉक्सर, तीन देविया, कत्ल आणि २०१६ साली रुस्तम सिनेमाच्या उद्घोषकाचे काम त्यांनी केले.
अमीन सयानी आजही सर्वात लोकप्रिय उद्घोषक आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी ५४,००० पेक्षाही जास्त रेडिओ कार्यक्रम संबोधीत केले आहेत.
कोणत्याही उद्घोषकाने ७ ‘स’ सांभाळावेत असे ते म्हणतात. ते म्हणजे सही, सत्य, सरळ, स्पष्ट, सभ्य, सुंदर आणि स्वाभाविक.
आवड आणि इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती कितीही भयाण असली तरीही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते याचे उदाहरण असलेले अमीन सयानी म्हणजे आपल्या स्वप्नांवर प्रेम करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत हे मात्र नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.