आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
बाजीप्रभुंच्या बलिदानाचा 360 वर्ष पूर्ण झाली. इतिहासात फार कमी वेळेस असं होतं की एखाद्या माणसाचं अस्तित्व दैवीय ठरतं. पण त्यापेक्षाही कमी वेळेस असं होतं की येणाऱ्या काळासोबत त्या माणसाबद्दलचा देवभोळेपणा जाऊन जास्त मूलगामी असा काहीतरी विचार अधिकाधिक वाढत जातो.
फक्त त्या भूभागावर राहणाऱ्यांसाठीच नाही तर अखंड मानवजातीसाठी आदर्श अशा मानवी अस्तित्वाचा वारसा ठेऊन गेलेल्यांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
बाजीप्रभूंनी बलिदान दिलं ते या तत्वासाठी. फक्त बाजीप्रभूंनीच नाही तर हंबीरराव, तानाजीराव, शिवा काशीद, मुराबाजी, आणि ज्यांची नावंही माहीत नाही अशा कित्येकांनी. महाराजांची ताकद असलेल्या या मावळ्यांची ओळख आपल्याला व्हावी यासाठी चित्रपटांपेक्षा चांगलं माध्यम दुसरं कुठलं असू शकतं. असे चित्रपट बनवावे ते भालजी पेंढारकरांनीच. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत दिग्पाल लांजेकर आणि त्यांचे सहकारी काम करतायत.
त्यांच्या सात चित्रपटांच्या मालिकेतील फर्जंद आणि फत्तेशीकस्त या चित्रपटांना प्रेक्षकांचा छान प्रतिसाद लाभला. १२ जुलैला बाजीप्रभूंच्या बलिदानाच्या दिवशी त्यांनी पावनखिंडीच्या त्या प्रसंगावर आधारित त्यांच्या तिसऱ्या चित्रपटाचं-जंगजौहरचं टीजर रिलीज केलंय. त्यानिमित्ताने या एकंदर विषयाबद्दल बोलूयात.
मला दोन्ही चित्रपट आवडले नाहीत. बॉलिवूड मसाला चित्रपटासारखा हा एक टिपिकल फॉर्म्युला असणारा चित्रपट वाटला. ”कोणी तरी काही तरी चांगलं काम करतंय महाराजांवर तर करू द्या की, तुमच्या का पोटात दुखतंय? नसेल हा चित्रपट तितका ग्रेट, मग काय झालं? दुसरं कोणी बनवतंय का असं काही? लहान मुलांवर संस्कार होत नाहीत का यामुळं?” या प्रश्नाविषयी आज बोलूयात.
फर्जंद चित्रपटात सिक्स पॅक्स असणाऱ्या पिळदार शरीराचे कोंडाजी फर्जंद आपल्यासमोर आले ते अंकित मोहन या हिंदी भाषिक अभिनेत्याच्या माध्यमातून. लेकरांनाही खोटा वाटेल असा मराठी लहेजा, बारा मावळ पालथी घातली तरी सापडणार नाही असा मुखवटा, रोबॉटिक वाटावी अशी देहबोली असलेले हे फर्जंद. त्यांना बघून ते 80 मावळ्यांनीशी पन्हाळा जिंकतील याची खात्री वाटते कारण ते आपल्याला शेवट माहिती असल्यामुळेच.
दोन्ही चित्रपटांमध्ये मॉंसाहेब जिजाऊंची भूमिका मृणाल कुलकर्णी यांनी खूप संयमीपणे साकारली आहे. अगदी कमी वयापासून शिवचरित्र आणि नाटकातून जिजाऊंची भूमिका साकारल्यामुळे या भूमिकेसाठी यापेक्षा समर्पक दुसरं नाव नाही.
महाराजांची भूमिका साकारण्यासाठी निर्व्यसनी आणि स्वच्छ चारित्र्याचा अभिनेता असावा म्हणून चिन्मय मांडलेकरची निवड झाली. पण स्क्रीनवर मात्र काहीसा उड्या मारत चालणारा, तणावाच्या प्रसंगात एक भुवई उडवून बोलणारा, डोळ्यात अश्रू आले तर एका बोटाने उडवणारा असा हा अभिनय फार फार कॉलेज पातळीवर बसवलेल्या नाटकासारखा वाटला.
याउलट “तान्हाजी” चित्रपटामधील शरद केळकरने साकारलेली भूमिका मिनीमलिस्टिक होती, एका राजाचं वागणं जसं असावं तसाच त्यांचा अभिनय होता. म्हणूनच चिन्मय मांडलेकरपेक्षा शरद केळकरने उभे केलेले महाराज जास्ती खरे वाटले.
ऐतिहासिक चित्रपटात मुख्यत्वे मुख्य पात्र साकारणाऱ्या अभिनेत्यावरच सगळ्यात मोठी जबाबदारी असते कारण त्यांच्या मार्फतच आपण ती कथा बघत असतो. दिग्पाल लांजेकर यांनी या सगळ्यात महत्वाच्या भागात असमाधानकारक काम केलंय. कुठलंच पात्र आपल्यासमोर नीट सेट होत नाही. ती पात्रं आपलीशी वाटत नाहीत. नाही म्हणायला, काही प्रमाणात फर्जंदमध्ये तान्हाजीरावांच्या पात्रात आणि फत्तेशीकस्तमध्ये सुरुवातीला जिजाऊंच्या पात्रात त्या पातळीचं भावनिक कनेक्शन तयार झालं होतं.
फत्तेशीकस्तमध्ये सुरुवातीचा अभंग “हेचि येळ देवा नका” आणि शेवटी “रणी फडकती लाखो झेंडे” या गाण्यांतून जो एक हाय पॉईंट गाठल्या जातो तो बाकी 90% सीन्समध्ये कुठंच सापडत नाही.
ऐतिहासिक चित्रपटातुन आपल्याला तो काळ, ती महानता अनुभवण्याची संधी मिळते. त्यामुळं ऐतिहासिक तथ्य, ते दाखविण्यासाठी वापरण्यात आलेली शैली ही तो काळ जागवणारी असावी, त्याबद्दल आपल्या माहितीत भर घालणारी असावी. इथं मात्र माहितीत भर घालण्यापेक्षा भाकडकथांना बालवाडीत गिरवतात तसं बिंबवलं गेलं.
उदाहरणार्थ, येसाजी कंक यांनी तोफ झेलली ही कथा त्यांच्या शौर्याला अधोरेखित करण्यासाठी रचली गेली असेल, त्यातून येसाजी खरंच तोफ झेलू शकतील असा अर्थ निघत नाही. कुठल्याही माणसानं एकट्यानं तोफ झेलणं तर सोडा पण उचलणंही अशक्यच आहे. ती तोफ फत्तेशीकस्त चित्रपटात चक्क पळत जाऊन झेलताना दाखवली आहे.
तसंच फर्जंद चितपटात एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर उडी मारण्याचा प्रकार असुद्या किंवा स्वतः महाराज चाळीसेक फुटांवरून उडी मारून शत्रूवर तुटून पडल्याचा प्रसंग असुद्या. त्या प्रसंगात तर गंभीर ऐतिहासिक चूक आहे. पन्हाळा जिंकला तेव्हा महाराज रायगडावर होते आणि गुढीपाडव्याच्या सण साजरा करून ते पन्हाळा बघायला आले होते हे सर्वश्रुत असणारं सत्य खोडून महाराजांनाच निर्मात्यांनी युद्धात सामील केलं.
फत्तेशीकस्तमध्ये एका गॅलरीमधून दुसऱ्या गॅलरीत उडी मारून जाण्यासारखा असणारा हा प्रसंगही असाच फिजिक्स आणि इतिहास गुंडाळून ठेवायला लावणारा. प्रतिवाद असाही येईल की “हे सगळं तुम्हाला बाहुबलीमध्ये चालतं ना? मग इथे का नाही?” याची दोन उत्तर आहेत. पहिलं असं की त्यातही ते चुकीचंच होतं. दुसरं उत्तर असं की, तिथं निर्मात्यांचा उद्देश काय होता? ती एक काल्पनिक कथा होती, ऐतिहासिक नाही. तिथं बाहुबलीसोबत काहीच वास्तविक आयुष्यातलं पणाला लागलेलं नाही. इथं महाराजांचा इतिहास पणाला लागतो. सांस्कृतिक वारसा म्हणून आपण काय दाखवतोय हे पणाला लागतं. आपल्याला येणाऱ्या पिढीला या भाकडकथातच अडकवून ठेवायचं आहे की पुराव्यांनीशी जगात कुठे असा राजा झाला नाही हे सिद्ध करून त्यातून प्रेरणा द्यायची आहे?
भालजी पेंढारकरांनी ज्या काळात सिनेमे बनवले तेव्हाचे प्रेक्षक आता इतके सजग नव्हते. उलट भाकडकथा सारखे परिचित प्रकार या माध्यमात आणून माध्यमाला अजून जास्त प्रसिद्ध करण्याची गरज होती. तेव्हा सिनेमापेक्षा नाटक हे मोठं माध्यम होतं. तिथल्या कथा श्रीराम लागू सारख्या महान अभिनेत्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लेयर्ड होत होत्या.
मात्र आता सिरीयल, सिनेमा आणि वेबसिरीज यातून प्रेक्षक जागतिक पातळीचा कंटेंट छोट्या शहरात बघून बघताय. यातून जास्तीत जास्त वास्तविकतेच्या जवळ जाणाऱ्या कथा समोर येऊ लागल्या. प्रेक्षक वर्ग इतका सजग होत असताना अजूनही फक्त सिंगल स्क्रीनवर किंवा टीव्हीवर चालू शकेल असा कंटेंट बनवून “आम्हाला प्राईम टाईम शो” मिळत नाही असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
हे चित्रपट बघताना कधीतरी असं वाटून जातं की कदाचित पुढच्या चित्रपटांना खूप मोठ्या पातळीवर नेऊन बनविण्यासाठी सुरुवातीला काही उथळ गोष्टींचा साहारा घ्यावा लागला असेल जेणेकरून पुढील प्रयोगांना निर्माते साथ देतील. म्हणून काही तडजोड करावी लागली असेल असं वाटलं.
पण जंगजौहर या चित्रपटाचा टीजर बघून ती उरलीसुरली आशासुद्धा नष्ट झाली.
नव्वदच्या दशकात हिर हिरोईन नाचताना त्यांच्या मागे जे रंगेबिरंगी बॉम्ब फुटायचे तशा काहीशा बॉम्ब हल्ल्यातून रस्ता काढणारे महाराज आणि मावळे ड्रोनने शूट केलेला सिन बघून वाईट वाटलं.
पुन्हा, तीच पॉज घेऊन धीरगंभीर आवाजात बोलणारे विचित्र वेशभूषा असलेले मुस्लिम सरदार व्हिलन म्हणून बघताना कार्टून बघितल्यासारखं वाटलं. एकही डाग नसलेल्या शुभ्र मराठी कपड्यात उगाच तलवारी फिरवणारे मराठी सैनिक याआधीच्या दोन चित्रपटातून उचलल्यासारखे वाटले. मागच्या चित्रपटात जिजाऊंनी तोफेला बत्ती दिली होती, यावेळी त्यांच्या हातात तलवार दिसली.
माँसाहेबांच्या हातात तलवार बघण्याआधी सगळे मावळे शाहिद झाले असते, या सर्वपरिचित असलेल्या गोष्टीला बगल देऊन त्यांच्या हातात तलवार बघून थिएटरमध्ये लोकांनी टाळ्या वाजवाव्यात अशी निर्मात्यांची अपेक्षा असेल तर काय बोलावं? प्लॉट, पद्धत, तथ्य, आणि अस्मिता, कुठल्याच कप्प्यात नीट न बसू शकणारा चित्रपट वाट्याला येईल याचं वाईट वाटतं.
पण निर्मात्यांविषयी वाईट का वाटतंय? कारण याआधी या विषयात एवढ्या तयारीनिशी, एवढ्या अभ्यासानिशी कोणी उतरलं नव्हतं. दिग्पाल लांजेकर यांना जवळजवळ 20 प्रकारचे फेटे बांधता येतात, त्यांना स्वतःला शस्त्र चालवता येतात, ते इतिहास संशोधकांमध्ये वाढलेत, त्यांनी जागतिक पातळीवर आदर्श ठरलेल्या ट्रॉयसारख्या चित्रपटांतून प्रेरणा घेतली आहे. ते शूट सुरू होताना शिवआरती करतात, ते स्वतः सर्व किल्ल्यांवर जाऊन आले आहेत. पहिली स्क्रिप्ट त्यांनी रायगडावर बसून लिहिली आहे. एखाद्या विषयाबद्दल एवढी आस्था असतानाही चित्रपट असा बिघडतो तेव्हा मनापासून वाईट वाटतं.
जंगजौहर बघून किमान आधीच्या चित्रपटांइतकं वाईट वाटू नये एवढीच आशा ठेवूयात.
जय शिवराय!!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.