आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१८५७ च्या उठावात ईस्ट इंडिया कंपनीच्या चाकरीत असणाऱ्या अनेक भारतीय सैनिकांनीदेखील बंड पुकारले होते. यात हिंदू आणि मुस्लिम सैनिक खांद्याला खांदा लावून लढत होते. इंग्रजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात निम्न जातीच्या लोकांना स्थान देण्यात आले होते.
इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा भारतात मोठ्या प्रमाणात जातीभेद होता. उच्चजातीय लोक इतरांना अत्यंत तुच्छ भावनेने वागवत होते. याच भावनेतून अनेक निम्न जातीय लोकांनी इंग्रजांच्या सैन्यदलात सामील होण्यास सुरुवात केली. पण जेव्हा इंग्रजांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या विरोधात बंड करणाऱ्या वर्गात या निम्नवर्गीय लोकांचा मोठा सहभाग होता. अनेकांनी इंग्रजांशी युद्ध करताना आपले सर्वस्व राष्ट्रासाठी अर्पण करून टाकले.
गंगू मेहतर.
हे अशाच राष्ट्रभक्तांपैकी एक होते. त्यांचा जन्म कुठे झाला यासंदर्भात अधिक माहिती उपलब्ध नाही, याला उच्च वर्णीय इतिहासकारांनी निम्नजातीय लोकांच्या त्यागपूर्ण इतिहासाकडे केलेलं जाणीवपूर्वक दुर्लक्ष कारणीभूत ठरतं.
काही दंतकथांनुसार गंगू यांचा जन्म मातंग समाजात झाला. त्याकाळी या जातीच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. यामुळे त्यांना स्वतःच्या पारंपरिक व्यवसायात स्वतःला झोकून द्यावे लागले. लोकांची विष्टा वाहण्याचे कार्य ते करत होते. उच्च जातीच्या लोकांकडून त्यांना पदोपदी अपमानाचा सामना करावा लागत होता. या अस्पृश्यता व सामाजिक विषमतेला कंटाळून गंगू आणि त्यांचा परिवार कानपूर शहरात वास्तव्याला आला.
इथे स्थायिक झाल्यावर त्यांनी पहिलवान बनण्याचा निर्णय घेतला आणि रोज तालमीत जाऊन ते एका मुसलमान प्रशिक्षकाकडुन कुस्तीचे डावपेच शिकून घेऊ लागले. काही काळात गंगू कुशल मल्ल बनले आणि त्यांना सर्वत्र ‘गंगूदीन’ नावाने ओळखले जाऊ लागले.
शेवटच्या इंग्रज मराठा युद्धातील एका दुर्दैवी पराभवानंतर दुसरे बाजीराव पेशवे कानपूर नजीक बिठुर याठिकाणी स्थायिक झाले. इथे आल्यावर त्यांनी पाच लग्न केले. याआधी त्यांच्या ६ बायका होत्या. परंतु संतती प्राप्त होत नसल्याचे दुःख पेशव्याला होते. मग पुढे नाईलाजाने त्यांनी नानासाहेब पेशव्याला दत्तक घेतले. १८५१ साली दुसऱ्या बाजीरावाचा मृत्यू झाला आणि इंग्रजांनी नानासाहेबांना पेशवा म्हणून स्वीकारण्यास साफ इन्कार केला. परिणामत: नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरोधात सैन्य दल उभारण्यास सुरुवात देखील केली.
सुरुवातीला गंगू हे नानासाहेब पेशव्यांच्या सैन्यात नगाडा वाजवण्याचे काम करत पण पुढे आपल्या प्रतिभेच्या बळावर त्यांनी एक महापराक्रमी सैनिक म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
१८५७ चा उठावाला सुरुवात झाली, कानपूर हे या उठावाचे एक केंद्र होते. नानासाहेब आणि इंग्रज यांच्यात मोठे तीव्र युद्ध झाले. परंतु इंग्रज आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बळावर नानासाहेबांच्या विरोधात यशस्वी सिद्ध होत होते.
याकाळात गंगू मेहतर यांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने इंग्रज सैन्याला कंठस्नान घातले. त्यांच्या पराक्रमाचा चांगलाच धसका इंग्रजांनी घेतला आणि त्यांनी गंगू विरोधात एक योजना आखायला सुरुवात केली.
इंग्रजांनी कुठल्याही परिस्थितीत गंगू मेहतरला जिवंत पकडण्याचे आदेश दिले. हे आदेश यासाठी देण्यात आले होते की गंगूला जनतेसमोर फाशी चढवून इंग्रजांना त्यांच्या क्रूरतेचे प्रदर्शन इतर भारतीय नागरिकांच्यासमोर भरवायचे होते. काही काळातच १८५७ चा उठाव इंग्रजांनी चिरडून टाकला आणि गंगू मेहतर इंग्रजांच्या हाती लागले.
इंग्रजांनी गंगूना घोड्याला बांधून शहरभर त्यांची धिंड काढली. असंख्य जुलूम केले पण गंगू यांनी कशालाच दाद दिली नाही. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला.
त्यांना काळ्या कोठडीत बंद करण्यात आले. इंग्रजांनी त्यांच्यावर स्त्री व बालहत्येचा गंभीर गुन्हा दाखल केला. त्यांच्या विरोधात खटला चालवला गेला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
८ सप्टेंबर १८५९ ला त्यांना कानपूरच्या चौकात फासावर लटकवण्यात आले. त्यांना विरगती प्राप्ती झाली. ते शहीद झाले. गंगू मेहतर यांनी आपल्या मातीच्या मुक्तीसाठी प्राण त्यागले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.