आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपल्या भारताला स्वातंत्र्यसंग्रामाचा मोठा इतिहास आहे. सुमारे एक शतक आपण परकीय सत्तेच्या वर्चस्वाखाली दबून होतो. त्यातून मुक्त होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी देशाला आपलं अमूल्य योगदान दिलं आहे. यात प्रामुख्याने जी नावं घेतली जातात, त्यापैकीच एक म्हणजे मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच आपले महात्मा गांधीजी. नेहमीच अहिंसेच्या मार्गाने चालण्याचा संदेश त्यांनी आपल्या सर्वांना दिला. सविनय कायदेभंग, चले जाव आंदोलन, दांडी यात्रा इ. चळवळी त्यांनी यशस्वीपणे घडवल्या. अहिंसक मार्गाने त्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणूनच आपण त्यांना आदराने ‘राष्ट्रपिता’ म्हणतो.
याच्या अगदी विरुद्ध म्हणजे ॲडॉल्फ हिटलर. ॲडॉल्फ हिटलर हे नाव माहीत नाही, असा माणूस शोधून सापडायचा नाही. जगाच्या इतिहासात ‘क्रूरकर्मा’ म्हणून तो ओळखला जातो. त्याची हुकूमशाही, त्याने घडवलेली ज्यू लोकांची कत्तल जगाच्या इतिहासात दुःखद म्हणून कोरली गेली आहे. आपल्याकडील प्राचीन कथांमध्ये पाहिलेल्या दैत्यदानवांचं अलीकडच्या काळातलं रुप म्हणजे हिटलर असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. त्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ! त्यावर कोणी ब्रही काढलेलासुद्धा त्याला मुळीच खपत नसे.
अशा या हुकूमशहा हिटलरला गांधीजींनी पत्र लिहीलं होतं हे कदाचित तुम्हांला माहीत नसेल. हिटलरला गांधीजींनी दोनदा पत्रं लिहिली होती. दुसरं महायुद्ध होऊ नये म्हणून गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ही पत्रं होती. यापैकी एक पत्र उपलब्ध असून ते २३ जुलै १९३९ रोजी लिहिलं होतं. यात गांधीजींनी हिटलरचा उल्लेख मित्र असा केला आहे. या पत्रात गांधीजींनी लिहिलं होतं –
“प्रिय मित्र,
माझे मित्र मला नेहमी विनंती करतात की, मी माणुसकीच्या धर्माने आपल्याला पत्र लिहावं. पण मी ते टाळतो कारण, मला असं वाटतं की, माझ्याकडून स्वतःहून पत्र पाठवणं हे कदाचित चुकीचं ठरेल. पण अशी काही कारणं आहेत, ज्यामुळे मला वाटतं की मी हा असा हिशेब न करता, भले ती गोष्ट कितीही महत्वाची असली तरी थेट तुम्हांला विनंती करु नये. हे अगदी स्पष्ट आहे की, आताच्या प्रसंगी या जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात जी माणुसकीची नासधूस करणारं हे युद्ध थांबवू शकते. तुमच्याकरिता हे लक्ष्य जरी महत्वाचं असलं, तरी त्याची किंमत मोजायला तुम्ही तयार आहात?
तुम्ही एका अशा व्यक्तीच्या विनंतीला मान देऊ इच्छिता का, ज्याने एखाद्या उल्लेखनीय यशानंतरही जगजाहीररित्या युद्धाचा विरोध केला आहे? तथापि, जर मी तुम्हांला हे पत्र लिहून चूक केली असेल, तर मी त्यासाठी क्षमा मागतो.
आपला मित्र,
एम. के. गांधी”
या पत्राचं पुढे काय झालं, ते नेमकेपणाने कोणाला माहीत नाही. कारण या पत्रानंतर दोन घटना घडल्या. हिटलरने सोव्हिएत रशियासोबत नॉन ऍग्रेशन पॅक्ट साईन केला.आणि त्याचवेळी जर्मनी व पोलंड यांच्यात युद्धाची ठिणगी पडली. हिटलरकडून या पत्राला कोणत्याही प्रकारचं उत्तर आलंच नाही. कदाचित हे पत्र त्याच्यापर्यंत पोहोचलंच नसेल. ही शक्यता असू शकते. कारण त्या काळादरम्यान भारतातील पत्रव्यवहारावर इंग्रजांचा वचक होता, किंवा हिटलरच्या स्टाफनी हे पत्र त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नसेल. असंदेखील असू शकतं की, या पत्रात हिटलरला त्याच्या दृष्टीने महत्वाचं असं काही वाटलं नाही. त्यामुळे गांधीजींचा हा प्रयत्न तसा अयशस्वी ठरला.
यानंतर पुन्हा एकदा गांधीजींनी वर्धा येथे असताना आणखी एक पत्र हिटलरला लिहिलं. २४ डिसेंबर १९४० रोजी हे पत्र लिहिण्यात आलं होतं. मागच्या पत्रापेक्षा हे पत्र बरंच मोठं होतं. या पत्रातही गांधीजींनी शांततेचं आवाहन केलं होतं. पण दुर्दैवाने हे पत्रही हिटलरपर्यंत पोहोचलं नसण्याचीच जास्त शक्यता आहे. गांधीजींचा हा प्रयत्नसुद्धा असफलच झाला.
या घटनेवर आधारित एक चित्रपटही २०११ या साली आला होता. भारताबाहेर “डियर फ्रेंड हिटलर” असं त्याचं नाव होतं, तर भारतामध्ये “गांधी टू हिटलर” नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट येईपर्यंत हिटलर आणि गांधीजी यांच्यात काही संबंध होता, हेही कुणाला माहिती नव्हतं. तोवर नेताजी सुभाषचंद्र बोस व हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा हिटलरसोबत आलेला संबंधच सर्वांना माहीत होता.
चित्रपटात रघुवीर यादव यांनी हिटलरची भूमिका साकारली होती. त्याची प्रेयसी इवा ब्राऊनच्या भूमिकेत नेहा धुपिया होती. तर गांधीजींच्या भूमिकेत अविजित दत्त होते. अमन वर्माने बलबीर सिंग ही भूमिका साकारली होती. राकेश रंजन कुमार यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट फार काही कमाई करू शकला नाही. गांधीजींची पत्रं एकतर्फी होती, शिवाय हिटलरकडून त्या दोन्ही पत्रांना कसलाच प्रतिसाद न आल्याने प्रेक्षकांना हा चित्रपट काही खास वाटला नाही.
खरंतर महात्मा गांधीजी हे एक असं व्यक्तिमत्त्व होतं की, पूर्ण जगातून प्रसिद्ध व्यक्ती त्यांना भेटायला येत असत. ते बेनिटो मुसोलिनीला भेटायला त्याच्या महालात गेले होते. चार्ली चॅप्लिन त्यांना भेटायला आला होता. ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांनी त्यांना भेटायला काही कारणामुळे नकार दिला असला, तरी ब्रिटिश राजाने आपल्याकडे बिना ड्रेसकोडच्या आलेल्या या पाहुण्याला सर्वाधिक महत्व दिलं. ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी गांधीजींना भेटायला नकार दिला होता. आता हे सगळे गांधीजींना भेटलेले असोत वा नसोत, पण तरीही महात्मा गांधीजींना दुर्लक्षित करणं हे त्याकाळी सहजपणे शक्य नव्हतंच.
गांधीजींनी दोन्ही पत्रांची सुरुवात व शेवट आपल्या भारतीय शिष्टाचारानुसारच केला होता. दोन्ही पत्रांमध्ये त्यांनी अगदी नम्र, सौजन्यपूर्ण भाषाच वापरली होती. पण तरीही ती पत्रं हिटलरपर्यंत पोहोचू न शकल्याने अयशस्वी ठरली. किंवा हिटलरचं एकंदर व्यक्तिमत्त्व पाहता कदाचित त्याने या पत्रांना महत्व दिलेलं नसण्याचीही शक्यता असू शकते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.