आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अफगाणिस्तानला साम्राज्यांची दफनभूमी असे का म्हटले जाते हे आपल्याला गेल्या दीड महिन्यात लक्षात आलेच असेल. विसाव्या शतकात अफगाणिस्तान सतत यु*द्धाच्या छायेखाली कशाप्रकारे राहिले आहे याचे विवेचन आपण वाचलेच असेल. पण त्याआधीही अफगाणिस्तानमध्ये काही वेगळी परिस्थिती नव्हती. याचे उत्तम उदाहरण आपल्याला शिवकाळात सापडते.
शाहिस्ताखान पुण्यातील लाल महालात तळ ठोकून बसला होता. चाकणच्या भुईकोट किल्ल्याशिवाय त्याच्या हाती स्वराज्यातील एकही किल्ला लागला नाही. अस्वस्थ झालेल्या नामदारखान नावाच्या शाहिस्ताखानाच्या भाच्याने त्याला शिवरायांवर थेट चालून जाण्याची परवानगी मागितली. यावर शाहिस्ताखान जे म्हणतो ते अफगाणिस्तानची दुर्दशा दाखवून देते.
शाहिस्ता म्हणतो, “तू तुझ्या जवानीच्या जोषात हे सगळं बोलत आहेस, आणि जरी तू शिवाजी राजांवर विजय मिळवण्यात यशस्वी झालास तर आलमगीर औरंगजेबाला दक्षिणेत एकही बलाढ्य शत्रू शिल्लक राहणार नाही आणि तो आपल्याला काबुल-कंदाहारच्या मोहिमेवर पाठवेल!” हा प्रसंग इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर आपल्या एका भाषणात सांगतात.
शाहिस्ताखानचे नाव हे ‘मिर्झा अबू तालिब’ असे होते. ‘शाहिस्ता’ हा त्याला दिला गेलेला किताब असून त्याचा अर्थ म्हणजे ‘बादशहाची सल्तनत ज्याच्या दमावर आणि विश्वासावर उभी आहे असा’. पण या ‘शाहिस्ता’लाच काबुल-कंदहारला जाण्याची धडकी भरली होती, यावरून मोगल सैन्याचे मनोबल आपल्या लक्षात आलेच असेल. खुद्द औरंगजेबसुद्धा बादशहा बनण्याच्या आधी काही काळ काबुल-कंदहार मोहिमेवर होता. पुढे १७५८ साली राघोबादादांनी काबुल-कंदहारवर आक्रमण करण्याची तयारी दाखवली होती पण प्लासीच्या लढाईमुळे त्यांना ती संधी कधीच मिळाली नाही.
राघोबादादांनन्तर ब्रिटिशांनी १८३९ ते १८४२, १८७८ ते १८८० आणि १९१९ साली अफगाणिस्तानची सत्ता मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण त्यांचा हेतू अफगाणिस्तानमध्ये प्रभाव असलेल्या रशियन साम्राज्याला शह देणे हा होता. अत्यंत डोंगराळ, बराचसा दुष्काळग्रस्त भूभाग, अप्रत्याशित हवामान, खंडित टोळ्यांचे राजकारण, स्थानिक लोकसंख्येबरोबर सशस्त्र संबंध आणि सशस्त्र नागरिक यांमुळे ब्रिटिश सैन्याचे अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर पतन झाले. ब्रिटनच्या सैन्याचा इतिहासातील सर्वांत मोठा अपमान १८४२ साली अफगाणिस्तानात झाला.
१८४२ म्हणजे असा काळ होता ज्यावेळी भारतातील आणि आशियातील ब्रिटिश वसाहती तसेच ईस्ट इंडिया कंपनी पश्चिमेकडील रशियन साम्राज्याच्या विस्तारापासून अत्यंत सावध आणि घाबरलेले होते. अफगाणिस्तानवर होणारं रशियन आक्रमण हा एक अपरिहार्य भाग असल्याचे त्यावेळी मानले जात होते. अर्थातच असा हल्ला शतकाहून अधिक काळानंतर १९७९ ते १९८९ च्या सोव्हिएत-अफगाण यु*द्धादरम्यान झाला. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील राष्ट्रांचे हे यु*द्ध काबुल-कंदहार-सिंध-अरबी समुद्र-पंजाब-भारतीय उपखंड यांच्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी होतं.
एकोणिसाव्या शतकातील या काळाला इतिहासकारांनी आणि तज्ज्ञांनी ‘द ग्रेट गेम’ म्हणून संबोधले आहे. हा राजकीय आणि मुत्सद्देगिरीचा खेळ रशियन साम्राज्याने सुरू केला. या वेळी रशियन साम्राज्य दक्षिणेकडे जाण्याच्या आणि ब्रिटिश साम्राज्यावर अतिक्रमण करून हिंद महासागरात उतरायच्या प्रयत्नात होती, जेणेकरून त्यांना भारतात आपला पाया मजबूत करता येईल.
जानेवारी १८४२ मध्ये, पहिल्या अँग्लो-अफगाण यु*द्धाच्या वेळी, भारतात परतताना सुमारे १६ हजार सैन्य आणि नागरिकांचे संपूर्ण ब्रिटिश सैन्य मारले गेले. या क्षणापर्यंत ब्रिटीश लष्कर आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या खाजगी सैन्याची अविश्वसनीय ताकद तसेच ब्रिटीश कार्यक्षमता आणि सुव्यवस्थेची जगभर प्रतिष्ठा होती. अफगाण यु*द्धाच्या वेळीही त्यांची हीच प्रतिष्ठा अबाधित राहील ही अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात वेगळेच घडले..
या क्षेत्रात रशियन साम्राज्याचा रस वाढण्याच्या भीतीने ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला आणि १८३९ सालच्या सुरुवातीला काबूलमध्ये अंदाजे १६ ते २० हजार ब्रिटिश आणि भारतीय सैनिकांनी एकत्रितपणे ‘इंडस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैन्यासह कूच केले. या लढाईत फक्त एकच ब्रिटिश जिवंत राहिला होता. अफगाणी सैन्याने ब्रिटिश सैन्याच्या केलेल्या नर*संहारातून तो वाचला होता आणि १८४२ मध्ये जलालाबाद याठिकाणी वास्तव्यास होता.
काबूलमधील ब्रिटिश सैन्याचा संघर्ष बऱ्याच प्रमाणात शांततेने सुरु झाला होता. ब्रिटीश मूळतः अफगाणिस्तानचा सार्वभौम शासक दोस्त मोहम्मदशी संबंधित होते. यानेच मागील दशकात खंडित अफगाण जमातींना एकत्र करण्यात यश मिळवले होते. तथापि, मोहम्मद रशियनांना मिळाला आहे अशी ब्रिटीशांना भीती वाटू लागली होती. म्हणूनच त्याला हद्दपार करण्यात आले आणि त्याच्या जागी ब्रिटिशांना उपयुक्त असलेला शहा शुजा याला शासक बनवण्यात आले.
पण दुर्दैवाने शहा शुजाचे शासनही इंग्रजांना पाहिजे तसे आणि सुरक्षित नव्हते. म्हणूनच त्यांनी सैन्याच्या दोन ब्रिगेड्स आणि त्यांच्याबरोबर दोन राजकीय सहाय्यक, सर विल्यम मॅकनाघटन आणि सर अलेक्झांडर बर्न्स यांना अफगाणिस्तानातच ठेवले. हे मात्र वाटते तितके सोपे नव्हते.
व्यापारी ब्रिटिश सैन्याच्या तणाव आणि रोषामुळे नोव्हेंबर १८४१ मध्ये स्थानिक लोकसंख्येने त्यांच्याविरुद्ध बंड केले. बर्न्स आणि मॅकनाघटन या दोघांची ह*त्या झाली. ब्रिटिश सैन्य काबूलमध्ये कोणत्याही तटबंदीशिवाय शहराबाहेर एका छावणीत राहत होतं. या सैन्याला अफगाणी लोकांनी वेढा दिला. डिसेंबरच्या अखेरीस परिस्थिती धोकादायक बनली होती. तथापि ब्रिटीश सैन्याने ब्रिटिश-नियंत्रित भारतात पलायन करण्यासाठी वाटाघाटी सुरु केल्या.
एवढ्या मोठ्या बंडानंतरही ब्रिटीशांना खरं तर काबूलमधून पळून सुमारे ९० मैल दूर असलेल्या जलालाबादकडे जाण्याची परवानगी होती. कदाचित त्यांना निव्वळ शहराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. किती लोकांनी शहर सोडले याचा अचूक अंदाज उपलब्ध नाही, पण साधारणतः दोन ते पाच हजाराचे सैन्य, तसेच नागरिक, बायका, मुले आणि काही छावणीचे नोकर-चाकर यात होते.
६ जानेवारी १८४२ रोजी अखेरीस सुमारे सोळा हजार लोकांना काबूलमधून बाहेर काढण्यात आले. त्यांचे नेतृत्व सैन्याचे तत्कालीन सरसेनापती जनरल एल्फिन्स्टन करत होते. निःसंशयपणे त्यांच्या जीवासाठी पळ काढत असले तरी त्यांची माघार घेणे सोपे नव्हते. भयंकर हिवाळ्याच्या परिस्थितीत धोकादायक अफगाण पर्वतांमधून ९० मैलांच्या पदयात्रेमध्ये थंडी, उपासमार आणि थकवा यांमुळे बरेच लोक मरण पावले.
ब्रिटिश सैन्य माघार घेत असताना अफगाण सैन्याने देखील त्रास दिला, पायी चालणाऱ्या अनेकांवर त्यांनी गोळी*बार केला. यातले अनेक जण स्वतःच्या रक्षणासाठी असमर्थ होते. अजूनही सशस्त्र असलेल्या काही ब्रिटिश सैनिकांनी मागून पहारा देण्याचा आणि रक्षण करण्याचा असफल प्रयत्नही केला.
काबूलमधून घाईघाईने ‘माघार’ म्हणून जे सुरू झाले ते मागे हटण्याची औपचारिक अनुमती असूनही पळून जाणाऱ्यांसाठी अक्षरश: मृत्यूची यात्रा ठरली. माघार घेतलेल्या आणि खुर्द काबूलकडे आलेल्या सैनिकांवर अफगाण सैन्याने हल्ला वाढवल्याने शेवटी ही परिस्थिती एका हत्याकांडात बदलली.
खुर्द काबुल ही एक निमुळती ५ मैल लांब अरुंद खिंड आहे. सर्व बाजूंनी वेढले गेलेले आणि डोंगर-दऱ्यांमध्ये अडकलेल्या ब्रिटिश सैन्याचे तुकडे तुकडे झाले आणि फक्त काहीच दिवसात सोळा हजारहून अधिक लोकांचा जीव गेला. १३ जानेवारी पर्यंत प्रत्येकाला ठार मारण्यात आले होते.
या भयाण कत्तलीतून फक्त एकच माणूस वाचला होता असे लढाईच्या रक्तरंजित परिणामांमध्ये असे दिसून आले. त्याचे नाव सहाय्यक सर्जन विल्यम ब्रायडन होते आणि तो कसाबसा जलालाबादला येण्यासाठी एका जखमी घोड्यावर स्वार झाला होता. ब्रिटिश सैन्याने सैन्याच्या आगमनाची वाट बघितली होती. ‘लष्कराचे काय झाले??’, असे विचारले असता ब्रायडनने उत्तर दिले “मीच लष्कर आहे”.
गंडमॅक येथे काय घडले याची कथा सांगण्यासाठी आणि इतरांना अफगाणांना आव्हान देण्यापासून परावृत्त करण्यासाठी ब्रायडनला जगण्याची परवानगी देण्यात आली होती. तथापि, काही बंधक घेतले गेले आणि इतर पळून जाण्यात यशस्वी झाले..
ब्रिटिश सैनिक आणि नागरिकांना माघार घ्यायची तर भीषण रक्तपात हाच एक मार्ग होता, हे निर्विवाद सत्य आहे. अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेतलेल्या ब्रिटिश साम्राज्यासाठीही हा एक मोठा अपमान होता. ब्रिटिश साम्राज्याच्या शक्तिशाली प्रतिमेवर या लढाईमुळे कलंक लागला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.