आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारत ही एक समृद्ध आणि विकसनशील अर्थव्यवस्था आहे. मागच्या काही वर्षांपासून वाढलेल्या अर्थव्यवस्थेमुळे भारत ही एक ‘उगवती आर्थिक महासत्ता’ असल्याचं तथ्य कोणीही नाकारू शकत नाही. ‘सध्याचं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे’ हे वाक्य तर आपण अनेकदा वाचतो, ऐकतो आणि बोलतोही. पण याचा प्रत्यय आपल्याला निश्चितच एखादा देश महासत्ता असण्याचे निकष पहिले तर येऊ शकेल. सैन्य शक्ती, सैन्य आणि शास्त्रात्रांवरील खर्च, सकल देशांतर्गत उत्पादन (जी.डी.पी.), चलनाची क्रयशक्ती (पी.पी.पी. – पर्चेसिंग पॉवर पॅरिटी) आणि लोकसंख्या, याशिवाय ‘ब्रॉडबँड’सुद्धा आता महाशक्ती असण्याच्या निकषात आहे.
चीन सारख्या देशाने हार्डवेअर उत्पादनात बाजी मारली तरी भारताने सॉफ्टवेअर क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. पूर्वेची ‘सिलिकॉन व्हॅली’ अशी ओळख असलेले आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य शहर ‘बँगलोर’ देखील भारतात आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार, भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपीमध्ये) माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर उद्योगाचा वाटा ८% आहे.
भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर उद्योगातून निर्यात १.९% ने वाढून, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १५० अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. २०२०-२१ या आर्थिक वर्षात, वेगवान डिजिटलायझेशन आणि आयटी उद्योगाच्या दूरस्थ कामकाजाच्या वातावरणामध्ये तसेच वेळोवेळी कोविड-१९ संक्रमणामुळे, साथीच्या काळात उद्योगाची वाढ कायम ठेवण्यास मदत केली.
भारताच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ अशीच निरंतर राहून २२ सप्टेंबर रोजी या क्षेत्रामध्ये एक नवा विक्रम रचला गेला आहे असे म्हटले तर ही अतिशयोक्ती वाटायला नको. टी.सी.एस., इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा अशा कंपन्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला आहे, पण भारतातील स्थानिक किंवा मध्यम प्रमाणातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यासुद्धा किती महत्वाच्या आहेत हे दिसून येते.
‘फ्रेशवर्क्स’ ही यूएस स्टॉक एक्सचेंज ‘नॅसडॅक’मध्ये सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय माहिती तंत्रज्ञानातील (एसएएएस – सॉफ्टवेअर-ॲज-अ-सर्व्हिस) कंपनी आहे. या कंपनीमध्ये काम करणारे दहा टक्क्यांहून अधिक कर्मचारी कंपनी नॅसडॅकवर सूचिबद्ध होताच ‘करोडपती’ झाले आहेत.
कंपनी नॅसडॅकवर सूचिबद्ध होताच कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशनने (बाजार भांडवल) १३ अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला आणि भारतात काम करणाऱ्या कंपनीचे सुमारे ५०० कर्मचारी करोडपती झाले. या कर्मचाऱ्यांपैकी, अंदाजे ७० कर्मचारी हे ३० वय-वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरींगनंतर (आयपीओ) एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅनमुळे कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली.
२२ सप्टेंबरचे नॅसडॅक मार्केट बंद झाल्यानंतर कंपनीचा स्टॉक त्याच्या मूळ विक्री किमतीच्या (इश्यू प्राइझ) तुलनेत सुमारे ३२ टक्क्यांनी वाढून ४७.५५ डॉलर्सवर व्यवहार (ट्रेड) करीत होता. तर इनिशियल पब्लिक ऑफरींगची (आयपीओ) किंमत ३६ डॉलर्स प्रति शेअर्स इतकी होती.
फ्रेशवर्क्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीष मातृबुतम यांच्या मते, भारताने खरोखरच हे करण्याची गरज आहे जेणेकरून याचा अनेक कर्मचाऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. या कंपनीमध्ये सन २०१५ साली केवळ ५०० कर्मचारी कार्यरत होते, त्यानुसार कंपनीच्या वर्तमान पातळीवर पोहोचण्यापूर्वी हा एक आश्चर्यकारक आर्थिक पराक्रमच आहे.
गिरीष मातृबुतम यांना कंपनीने केलेल्या या कामाचा सार्थ अभिमान वाटतो आणि फ्रेशवर्क्स नॅसडॅकवर सूचिबद्ध झाल्याने भारतातील इतर माहिती तंत्रज्ञान आणि एसएएएस कंपन्यानासुद्धा ‘पब्लिक’ होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि तशी त्यांना प्रेरणाही मिळेल असा विश्वास मातृबुतम यांना वाटतो. त्यांच्या मते एसएएएस क्षेत्रातही माहिती तंत्रज्ञान उद्योगाप्रमाणेच संपत्ती आणि रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे.
पण फ्रेशवर्क्सने या यशाच्या शिखरावर पोहोचायला भरपूर मेहनतही केली असेल, पण मेहनती शिवाय त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने कंपनी मोठी केली. त्यांच्या स्थापनेपासूनचा आजवरचा प्रवास थोडक्यात समजावून घेऊ. आधीही सांगितल्याप्रमाणे फ्रेशवर्क्स ही एक सॉफ्टवेअर-ॲज-अ-सर्व्हिस (एसएएएस) कंपनी असून याची सुरुवात दशकभरापूर्वी, २०१० साली झाली.
सुरुवातीला या कंपनीने फक्त ‘हेल्प डेस्क’ म्हणून काम केले. नंतर इतर अनेक प्रकारच्या सेवाही दिल्या. सध्या, फ्रेशवर्क्स इतर कंपन्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ग्राहक सेवा, विक्री, मार्केटिंग ऑटोमेशन, माहिती तंत्रज्ञानावर आधारित (आय.टी. सेवा) आणि मानवी संसाधन (एच.आर.) व्यवस्थापन सेवा प्रदान करते. गिरीष मातृबुथम आणि शान कृष्णसामी हे कंपनीचे संस्थापक आहेत. या दोघांनीही यापूर्वी झोहो कॉर्पोरेशनमध्ये काम केले आहे.
२००९ साली गिरीष अमेरिकेतील टेक्सास येथे काम करत असत. पण काही कारणाने गिरीषने भारतात चेन्नईमध्ये स्थलांतरित व्हायचे ठरवले आणि सर्व सामानासह त्याने टेक्सासहून आपला मुक्काम हलवला. गिरीष चेन्नईला पोहचला, पण त्याचे सामान पोहचायला तब्बल अडीच महिने लागले. त्याच्या सामानात ४० इंचाचा एक एलसीडी टीव्हीही होता. पण प्रवासात तो एलसीडी टीव्ही तुटला.
त्याच्याकडे टीव्हीचा विमा होता, त्यामुळे त्याने कंपनीला फोन करून विम्याचे पैसे घेऊ असा विचार केला. फोन तर सोडाच पण ईमेलला सुद्धा विमा कंपनीने उत्तर दिले नाही. कंपनीशी सम्पर्क साधण्याच्या प्रयत्नांत ५ महिने उलटले पण नुकसान भरपाई मिळाली नाही. गिरीषला याच समस्येवरून काही कल्पना सुचली आणि त्याने शान कृष्णसामी बरोबर फ्रेशवर्क्स कंपनी सुरु केली. .
इतर कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी वेबसाईट, संपर्क क्रमांकांसारखे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार करतात. याठिकाणी ग्राहक आपल्या तक्रारी नोंदवतात परंतु अनेक वेळा असे घडते की ग्राहकाला समस्येचे निराकरण करण्यासाठी वारंवार ई-मेल, कॉल किंवा मेसेज करावा लागतो. प्रत्येक वेळी नवीन ग्राहक सेवा अधिकारी येतो आणि ग्राहकाला त्याची समस्या पुन्हा त्याला सांगावी लागते.
या कंपनीने ग्राहक तक्रार निवारणीच्या कामावर लक्ष केंद्रित केले. कालांतराने, तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर फ्रेशवर्क्सने कंपनीशी ग्राहक-तक्रारींशी संबंधित सर्व प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी आणले. ई-मेलद्वारे, संदेशाद्वारे, फोनद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे आलेल्या ग्राहकांच्या सर्व तक्रारी एकाच ठिकाणी उपलब्ध होतील अशी व्यवस्था त्यांनी केली. त्या तक्रारींवर ग्राहक सेवा अधिकाऱ्याने काय कारवाई केली आहे, त्याचा तपशीलही उपलब्ध होऊ लागला.
याचे अनेक फायदे आहेत. कोणताही तक्रारदार या प्रक्रियेतून सुटत नाही, प्रत्येकाच्या समस्या कंपनीपर्यंत पोहोचतात आणि सर्व तक्रारी वेळेत सोडवल्या जातात. तक्रारींच्या बाबतीत तरी ग्राहकांची इतकीच अपेक्षा असते. फ्रेशवर्क्सने तक्रारनिवारणीची एक कंटाळवाणी प्रक्रिया बदलून या प्रक्रियेला नवीन आणि सुलभ स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
तुम्हाला येणाऱ्या समस्यांवर राग किंवा दुःख व्यक्त करत राहण्यापेक्षा तीच समस्या तुम्हाला भविष्यात मोठा फायदाही करून देऊ शकते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.