आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९ वे शतक हे भारतातील समाजसुधारणेचा आणि प्रबोधनाचा काळ होता. अनेक बुरसटलेल्या आणि घातक रूढी बदलण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक समाजसुधारक या काळात होऊन गेले. अशा जाचक रुढींमध्ये गणली जाणारी पहिली बाब म्हणजे स्त्री-शिक्षण. आपल्या देशात स्त्रीशिक्षण हे एक पातकच समजले जाई.
आज स्त्रिया शिकताहेत, अनेक क्षेत्रात दैदिप्यमान यश कमवत आहेत. पण याची सुरुवात किती कठीण होती याची फक्त कल्पनाच केलेली बरी. रुढींचा जबरदस्त पगडा असणाऱ्या त्या काळात काही हिंमतवान स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी आपल्या स्व-विकास आणि सामाजिक उन्नतीपुढे या रूढींना अजिबात भिक घातली नाही. सामाजिक लक्ष्मणरेखा पार करून स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचणाऱ्यांमध्ये कादंबिनी गांगुली हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
महिलांच्या शिक्षणासाठी सामाजिक वातावरण अत्यंत प्रतिकूल असतानाही कादंबिनी गांगुलीने देशातील पहिली स्त्री पदवीधर होण्याचा मान पटकावला. इतकेच नाही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी संपादन करून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणारी ती पहिली महिला ठरली.
१८८६ साली कादंबिनी यांनी डॉक्टरची डिग्री मिळवली होती. अर्थात, याच वर्षी आनंदी गोपाल जोशी यांनी देखील अमेरिकेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना प्रॅक्टीस करणे जमले नव्हते. मात्र, कादंबिनी गांगुली यांनी पदवी घेतल्यानंतर भारतात येऊन तब्बल ३७ वर्षे प्रॅक्टीस केली. म्हणूनच, प्रॅक्टीस करणाऱ्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या.
कादंबिनी गांगुली यांचा जन्म १८६१ साली बिहार मध्ये झाला. त्यांचे वडील ब्रिजकिशोर बसू हे मुळचे बंगाली होते. मात्र ते बिहार मधील भागलपूर गावात हेडमास्तर होते. शिवाय ते राजाराममोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाचे सदस्य देखील होते. राजाराम मोहन रॉय यांनी स्त्री-शिक्षण आणि स्त्रियांवर रूढी-परंपरांच्या नावाखाली होणारे अत्याचार यांना या संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडली. ब्रिजकिशोर बसू यांच्यावर राजाराम मोहन रॉय यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्यांनी सुरुवातीपासूनच कादंबिनीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.
त्याकाळी मुलीच्या शिक्षणाचा अग्रक्रमाने विचार करणे देखील एक सामाजिक क्रांतीच होती.
कादंबिनीचे प्राथमिक शिक्षण ढाका (आत्ताचा बांगलादेश) आणि कलकत्ता येथून पूर्ण झाले. पण, महिलांना कॉलेजमध्ये शिक्षण घेता येत नाही, या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. कलकत्ता विद्यापीठाने त्यांची प्रवेश देण्याची विनंती मान्य केली आणि १८७८ मध्ये त्या कॉलेजची प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाल्या. पदवी पूर्ण झाल्यानंतर कादंबिनी यांनी मेडिकल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यांचे पती द्वारकानाथ गांगुली यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. कादंबिनीच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले म्हणूनच कादंबिनी यांना समाजाच्या रोषाला तोंड देणे सुसह्य झाले.
त्याकाळी कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये महिलांना प्रवेश देण्याचा नियम नव्हता. पण कादंबिनी आणि द्वारकानाथ यांनी या नियामाविरोधात जाऊन प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. शेवटी १८८४ मध्ये त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि सीएमसी मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. सरकारकडून त्यांना दरमहा वीस रुपयांची स्कॉलरशिप मिळत होती.
१९८६ मध्ये त्यांना मेडिकल कॉलेज ऑफ बेंगालची पदवी मिळाली. पदवीनंतर लगेचच त्यांनी लेडी डफरीन वुमेन्स हॉस्पिटल, कलकत्ता येथे प्रॅक्टिस सुरु केली. पण पुढील शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला आपल्या सहकाऱ्यांकडून सन्मान मिळणार नाही हे लक्षात आल्यावर १८९३ साली पुढील शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेताला. तिथे त्यांनी एडीनबर्ग कॉलेजमधून, लिसेंटीएटमधील तीन पदव्या घेतल्या. तिथून परत आल्यावर त्यांना वरिष्ठ डॉक्टरचे पद देण्यात आले शिवाय खाजगी प्रॅक्टिस करण्याचाही परवाना मिळाला.
यशस्वी डॉक्टर असण्यासोबतच कादंबिनी एक सुगृहिणी आणि उत्तम आई देखील होत्या. त्यांचे पती द्वारकानाथ गांगुली विधुर होते. त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना पाच अपत्ये होती. कादंबिनी यांना तीन अपत्ये होती. पण त्या आपल्याला आठ अपत्ये असल्याचे सांगत. आठही मुलांची काळजी घेण्यात त्या जराही कमी पडत नव्हत्या. विणकाम आणि लेस बनवण्याची कलाही त्यांच्या अंगी होती.
त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तितक्याच तडफेने काम केले. पती द्वारकानाथ यांच्यासोबत मिळून त्यांनी महिलांसाठी काम करणे सुरु केले. बिहार मध्ये कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या महिला आणि आसामच्या चहा मळ्यात काम करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी त्यांनी आवाज उठवला.
मुंबईमध्ये मध्ये १८८९ साली भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनालाही त्या उपस्थित होत्या. या अधिवेशानासाठी उपस्थित राहणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
१९०६ मध्ये इंग्रज सरकारने बंगालची फाळणी केली. सरकारच्या निर्णया विरोधात त्याकाळी अनेक ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. त्यांनी या ठिकठिकाणच्या बैठकांनाही हजेरी लावली. गांधीजींच्या आफ्रिकेतील सत्याग्रहाला देखील त्यांनी पाठींबा दर्शवला.
त्याकाळात महिलांपुढे एक आदर्श बनून त्यांनी महिलांना पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले. रूढीवादी मानसिकता मोडून काढण्यातही त्या यशस्वी ठरल्या. या सगळ्या प्रवासात त्यांच्यावर बऱ्याचदा चिखलफेकही झाली. बंगाल मधील एका मासिकाच्या संपादकांनी कादंबिनी यांच्या कामावर आक्षेप घेत त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. पण कादंबिनी मवाळ स्वरूपाच्या सुधारक नव्हत्या. त्या जिद्दी आणि बाणेदार होत्या. त्यांनी या संपादकांविरोधात कोर्टात खटला भरला. या खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूनेच लागला. त्या मासिकाच्या संपादकांना सहा महिन्याची शिक्षा आणि १०० रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
काँग्रेसच्या सहा महिला सदस्यांपैकी त्या एक होत्या. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्र असो की कौटुंबिक जबाबदाऱ्या हरेक ठिकाणी त्यांनी स्वतःला सिद्ध केले.
त्यांच्या या जिगरबाज जीवनप्रवासात तितक्याच अडचणी देखील आल्या पण कादंबिनी मागे हटल्या नाहीत. हरेक अडचणींचा त्यांनी सामना केला. ३ ऑक्टोबर १९२३ रोजी त्यांचे देहावसान झाले. या सशक्त आणि शूर महिलेची इतिहासात नक्कीच दाखल घेतली गेली पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांसाठीही त्यांचे काम प्रेरणादायी ठरेल असेच आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.