आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा साधेपणा आणि विद्वत्ता या दोन ते गोष्टींसाठी आजही ओळखले जातील. चंपारण सत्याग्रहावेळी भोजपुरी शेतकऱ्यांनी जामीनदारांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून त्यांच्या विरोधात आंदोलन पुकारले. या आंदोलनात काही शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
या आंदोलनाचे इंग्रजी शब्दांकन करून त्याविरोधात न्यायालयात अपील करण्याची जबाबदारी महात्मा गांधींनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यावर सोपवली होती. एक प्रतिष्ठित वकील असूनही त्यांनी असली कारकुनी कामे करण्यात कधीही कमीपणा मानला नाही.
या कारकुनीपासून ते देशाचे राष्ट्रपती होण्यापर्यंत कितीतरी मानसन्मानाचे प्रसंग त्यांच्या वाट्याला आले. परंतु या सर्वांत त्यांनी कधीही आपल्या “साधी राहणी उच्च विचार” या तत्त्वाचा त्याग केला नाही.
बिहारमध्ये एकही विद्यार्थी असा शोधून सापडणार नाही, ज्याला शिकायचे असेल तर राजेंद्रबाबूप्रमाणे शिक असा सल्ला मिळाला नसेल.
शालेय जीवनातही त्यांचे कर्तृत्त्व एवढे मोठे होते की, खुद्द त्यांचा पेपर तपासणाऱ्या परीक्षकांनी त्यांच्या पेपरवर शेरा लिहिला होता- “परीक्षार्थी परीक्षकापेक्षा चांगला आहे”.
शालेय जीवनात एक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती होती.
वकिली सुरु केल्यानंतरही त्यांच्या वाट्याला असेच अनुभव आले. कधीकधी त्यांच्या विरोधी पक्षाकडून लढणाऱ्या वकीलांना आपल्या पक्षकाराच्या वतीने बाजू मांडता येत नसेल तर, न्यायाधीश स्वतः डॉ. राजेंद्र प्रसाद यांना म्हणत, विरोधी पक्षाच्या वतीनेही तुम्हीच बाजू मांडा. त्यांच्या दृष्टिकोनातील तटस्थता अतुलनीय होती.
१९०८ साली त्यांनी बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सची स्थापना केली, लहान वयातही त्यांची राजकारणातील जाण किती प्रगल्भ होती, याची झलक यावरून दिसते. त्याकाळची ही एक प्रभावी संघटना होती. याच संघटनेने बिहारला एक मजबूत नेता दिला.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे जीवन साधेपणा आणि नि:स्वार्थ भावनेचा झरा होता. राजकीय जीवनातही त्यांनी हेच तत्त्व पाळले. त्यांच्या याच गुणामुळे ते कायम सामान्य माणसाशी जोडले गेले.
देशाचे संविधान लिहून पूर्ण झाले आणि सर्वांच्या अनुमतीसाठी त्यावर सह्या घेणे बाकी होते.
तेव्हा डॉ. राजेंद्र प्रसाद सर्वांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराबद्दल म्हणाले,
“काही लोकांना सार्वत्रिक मतदानाच्या अधिकाराबद्दल शंका आहे. परंतु याबाबतीत मी आशावादी आहे. मी देखील एक खेडूत आहे. कामानिमित्त शहरात राहत असलो तरी माझी नाळ माझ्या गावाशी जोडलेली आहे. मी गावातील लोकांना ओळखतो. मतदान प्रक्रियेत या लोकांचा वाटा मोठा असणार आहे.
आपल्या देशातील विशेषत: ग्रामीण भागातील जनता समजूतदार आणि विवेकी आहे. त्यांच्या विचार प्रक्रियेशी आजचे सुशिक्षित लोक जरी हटकून वागत असले तरी ती विचार पक्रिया परिणामकारक आहे. लिहिण्या-वाचण्याची यांत्रिक क्रिया त्यांना जमत नसली तरी, ते स्वहित आणि राष्ट्रहिताच्या बाजूने निर्णय घेण्यास सक्षम आहेत, यावर माझा विश्वास आहे. त्यांना प्रभावित करण्यासाठी अव्यावहारिक योजना आणि प्रगतीची आश्वासने देण्यात येतील परंतु हे लोक आपल्या विचार शक्तीने खऱ्या-खोट्यातील फरक नक्कीच ओळखू शकतात.”
भारतासारख्या देशाला एका विशाल लोकशाही देशात परिवर्तीत करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. या संविधान निर्माणकर्त्यांसमोर असे एकही उदाहरण नव्हते जिथे भाषा-संस्कृती-धर्म-खानपान-पेहराव-रीतीरिवाज अशा अनेक गोष्टींमध्ये विभिन्नता असूनही तिथे लोकशाही व्यवस्था यशस्वी झाली आहे.
तरीही आपल्या संविधान निर्माणकर्त्यांनी भारतात लोकशाही यशस्वी होईल अशी अशा ठेवून देशाला लोकशाही गणराज्य घोषित केले. अशा कठीण काळातही संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांना देशातील सामान्य व्यक्तीच्या विवेकबुद्धीवर विश्वास होता.
राष्ट्रपतीसारख्या देशाच्या सर्वोच्च पदावरही त्यांनी आपल्या राहणीमानातील साधेपणा सोडला नाही. हा साधेपणा हीच त्यांच्या जीवनाची खरी ताकद होती. राष्ट्रपती भवनात राहूनही त्याच्या या सात्त्विक वृत्तीला कधी डाग लागला नाही.
त्यांना त्याकाळी दरमहा दहा हजार रुपयांचे वेतन मिळत होते, परंतु निम्मा पैसा ते सरकारी खात्यात जमा करत. हा पैसा देशाच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यांचे कुटुंबीय सांगतात राष्ट्रपती पदावर असताना ते आपल्या पगारातील फक्त पाव भाग रक्कमच (२५००/- रुपये) स्वीकारत असत.
राष्ट्रपती पदावर असताना राजेंद्र बाबूंनी एक कार विकत घेतली. कुणीतरी त्यांना प्रश्न केला, “इतका कमी पगार असूनही तुम्हाला कार घेणे कसे काय परवडले?” त्यांनी लागलीच ती कार परत करून टाकली.
राष्ट्रपती पदावर असताना त्यांना एक अनोखा छंद होता. कोणी विदेशी पाहुणे देशाच्या दौऱ्यावर येत तेंव्हा ते त्यांची सही घेऊन ठेवत. अशा सह्यांचा त्यांच्याकडे संग्रह होता. पदावर असताना त्यांना ज्या काही भेटवस्तू मिळाल्या त्या सर्व वस्तू त्यांनी सरकारी खजिन्यात देऊन टाकल्या.
कुटुंबातील सदस्यांशीही त्यांचे वर्तन असेच होते. त्यांच्या कुटुंबात पहिल्यांदा सासरी जाणाऱ्या मुलीला नवी साडी देण्याची प्रथा होती. ही साडीही विकत घेऊन भेट देणे त्यांना पटत नव्हते. ते स्वतः हाताने खादीची साडी बनवत आणि तीच साधी खादीची साडी भेट देत. त्यांच्या मुलीही या खादीच्या साड्या घेऊनच सासरी जात.
इतक्या मोठ्या पदावर राहूनही त्यांनी कधीही गर्व बाळगला नाही. १२ वर्षे राष्ट्रपती पदावर राहिल्यानंतर जेव्हा हे पद सोडण्याची वेळ आली, तेव्हा त्यांची तब्येत प्रचंड खालावली होती. अशावेळी दिल्लीत राहून सरकारी खर्चाने चांगले उपचार करवून घेण्याऐवजी ते पाटण्यातील सदाकत आश्रमात राहायला गेले.
त्यांनी स्वतःसाठी घर-बंगला देखील विकत घेतला नाही. जिथून आलो तिथेच परत जाणार असे म्हणत गंगेच्या किनाऱ्यावर वसलेल्या त्या आश्रमातच ते राहायला गेले.
एस. राधाकृष्णन यांनी जेव्हा त्यांच्या पदाची सूत्रे सांभाळली तेव्हा आपल्या भाषणात ते म्हणाले होते, “डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणजे साधेपणाची मूर्ती. जगाला भारताची हीच शिकवण राहील.” यावेळी त्यांनी महाभारतातील एका श्लोकाचाही उल्लेख केला. ज्याचा अर्थ होतो, साधेपणाने कठीणात कठीण परिस्थितीवरही विजय मिळवला जाऊ शकतो आणि त्याच साधेपणाने कोमलतेवरही विजय प्राप्त करता येतो!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.