आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
असंख्य पेताडपिऊ रोज पिऊन बायकोला ताण देतात अशांची बायका-पोरं तो माणूस मारायला टेकला तरी बघत नाहीत. कित्येक थकलेले म्हातारे त्रास आणि हतबलता सहन होत नाही म्हणून मरणाची वाट बघतायत. पण या सगळ्यांना सोडून यमदेव चांगल्या लोकांना नेतोय. कोरोनाच्या काळात अशा कित्येक “gone soon”च्या पोस्ट आपण बघितल्या. निरोगी शरीर, स्वच्छ चारित्र्य उत्तम कर्म असणारे कित्येक लोक आपण गमावले. या अशा अनिश्चित आयुष्याकडून आपण का होप्स ठेवाव्यात? जर सभ्यपणाला किंमत नाही तर का सभ्य असावं? एवढा व्यायाम, निर्व्यसनी असणारे मेले तर आपण का व्यसन करू नये? एकंदर “why to be sane”? पण तरी आपण आशावादी असतो. एकमेकांना मदत करतो. माणुसकी जिवंत आहे.
अजूनही संध्याकाळी गावात हरिपाठ होतो. अजून कोणी विठ्ठलाला परकं केलं नाहीये. अजूनही आपल्याला अराजकता नकोय. असा कुठला आदर्श आहे जो अखंड मानवजातीला धर्माच्या (योग्य वागण्याच्या) बाजूने धरून ठेवतोय?
हे असे भयंकर आणि सहाजिक प्रश्न पडलेल्या लोकांनी उत्तर शोधण्याची, त्यांना तशी दृष्टी येण्याची कथा म्हणजे – “दिठी”. आपल्या मराठी मातीत खूप रुळलेली पण जगाच्या कोपऱ्यात कोणालाही रिलेट होऊ शकेल अशा दि. बा. मोकाशी यांच्या या “आमोद सुनासि आले” कथेवर आधारित हा चित्रपट.
घीसाड्याच्या रामजी बाबांनी 30 वर्ष न चुकता वारी केली, भेटणाऱ्या प्रत्येकाच्या दुःखावर समजुतीची फुंकर घातली. कित्येक पारायणं केली आणि म्हातारपणी त्याचा गुणी कर्ता मुलगा नदीत वाहून गेला. मागे सोडलं होतं नुकत्याच जन्मलेल्या मुलीला, बायकोला आणि रामजी बाबांनी आयुष्यभर कमावलेल्या पुण्याला. अंत्यसंस्कार करायला शरीरही सापडू नये असा मृत्यू मिळायला त्याने आयुष्यात काहीच पाप केलं नव्हतं. मग तरीही ईश्वराने त्याला का बोलावणं धाडलं?
तो गेल्यापासून लागलेलं पावसाचं आणि दुःखाचं झडगं चार दिवस झाले तरी उतरत नव्हतं. पोथीचा दिवस होता. यायला आलेल्या गायीचं अडकलेलं पिल्लू रामजी बाबाच्या स्पर्शाची वाट बघत होतं, उरलेली पोथी त्याला बोलवत होती, दुर्दैवी-विलक्षणी म्हणून हिणवली गेलेली 4 दिवसाची नात आज्याच्या प्रेमाला आसुसली होती. या सगळ्यात निपचित आभाळाकडे बघत बसलेले रामजी बाबा विठ्ठलाकडे तक्रार नव्हते करत, ते फक्त आपल्या 30 वर्ष केलेल्या वारीचं ओझं त्याच्या डोक्यावर देत होते.
जगण्याचं कारण, ध्येय, पद्धत सगळंच अंधारात पडलं असताना यातून निघण्याची दृष्टी- दिठ्ठी तो शोधत असतो. या शोधाची ही गोष्ट.
इथं फक्त दुःख नव्हतं तर आयुष्यभर ज्या विचारांना आदर्श मानलं ते कोसळल्याने आलेली हतबलता आणि गोंधळही होते. हे सगळं डोळ्यातून दाखवत किशोर कदम यांनी रामजी बाबांना साकारलं. दुःखाचा अहंकार न दिसता श्रद्धेतून वाट शोधणारा वारकरी दिसावा इतका बारीक विचार त्यांच्या अभिनयात आला आहे. गायीचं पिल्लू बाहेर काढतानाच्या सीनमधे त्यांच्या डोळ्यात आलेले ते भाव हा मी आधुनिक मराठी अभिनयातील उच्चांक मानतो.
नटसम्राटमधला वाचिक अभिनय सिनेमा या माध्यमात विजोड वाटतो, पण खऱ्या अर्थाने कॅमेरासाठी केलेला अभिनय म्हणून किशोर कदम यांच्याकडे आता आदर्श म्हणून बघितलं जावं.
त्यांना तितकीच मजबूत साथ मिळाली ती इतर कसलेल्या कलाकारांची. मोहन आगाशेंच्या तर मानसिक आरोग्य सोपं करून सांगणाऱ्या डायलॉग्सचं मॅशअपच केलं पाहिजे. दिलीप प्रभावळकर आणि गिरीश कुलकर्णी तर आहेतच ग्रेट. पण या मोठ्या नावात विसरू नये असं एक नाव म्हणजे अंजली पाटील. मुळातच सिनेमाला व्हिज्युअल्सची अशी एक समृद्ध भाषा दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर यांनी दिली आहे, म्हणून डायलॉग कमी आहेत. पण अंजलीच्या पात्राला तर एकही डायलॉग नाहीये. तरी फक्त हावभावातून आणि अश्रूंतून सगळं साकारलंय. झुकलेली नजर आणि न ढळणारा घट्ट पदर, यात तिने हे पात्र खूप संवेदनशीलपणे बांधलय.
कथेचं, पुस्तकाचं, नाटकाचं रूपांतर सिनेमात करताना त्यातले वाक्य तसेच्या तसे डायलॉग म्हणून वापरणे आपल्याकडे सामान्य आहे. यात सिनेमाची व्हिज्युअल्सची भाषा ब्लेंड न केल्याने चांगल्या कथेत असणारा तो प्रभाव सिनेमात उतरत नाही. याआधीच्या सुमित्रा भावेंच्या सिनेमातही, डायलॉग्स तुलनेने अधिक होते. मात्र इथे सुमित्रा भावेंनी दुःखाचं मळभ, आणि मिळालेली दृष्टी, असं अगदी सगळं सिनेमॅटोग्राफर, एडिटर आणि साऊंड डिझायनर यांच्या कलेतून साकारण्याचा खूप स्मार्ट निर्णय घेतलेला दिसतो. कारण दुःख बहुतांश वेळा मेलोड्रॅमॅटीक नसून प्रभावाला इंटेन्स पण दिसायला सटल असतं. उलट त्यावर रडणं हा दुःखाचा अंत असतो.
याआधी इतका इंटेन्स पण तितकाच दिसायला सटल असणारा अनुभव नागराज मंजुळेच्या “पावसाचा निबंध” या शॉर्ट फिल्ममधे आला होता. त्यात पाऊस हेच एक पात्र होतं आणि साचलेल्या वेदना स्क्रीनवर साकारायचं साधनसुद्धा. दिठीमधे पाऊस वेदनेचं कारण आणि ते साकारायचं साधनबनलाय. सुमित्रा भावेंनी गावातले आपआपसातले नाते, त्यांच्यातल्या मर्यादा, त्यांची वेशभूषा, भाषा अत्यंत बारकाव्यांसह हेरले आहेत.
चैतन्यने डीसायपल सिनेमातून शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रावर एक प्रगल्भ टीका केली होती. नागराजने पावसाच्या निबंधातून पाऊस आणि त्याभोवतालच्या प्रस्थापित सौंदर्यशास्त्रालाच छेद दिला होता.
दिठीमधे वारकरी संप्रदाय, कीर्तन हे केंद्रस्थानी नसून गोष्ट रंगवायला वापरलेलं एक नेपथ्य आहे. पण तरीही त्या नेपथ्याच्या एवढ्या सखोल छटा यात दिसतात ज्यामुळे हा सिनेमा वारकरी संप्रदायाची एक गंभीर समीक्षा (विस्तृत स्तुती या अर्थाने) वाटू लागतो.
लहान मुलांच्या लैंगिक शोषणापासून ते तरुणाचं डिप्रेशन आणि म्हाताऱ्यांचं अल्झायमर; सुमित्रा भावेंनी जणू मानसिक आरोग्यावर दर्जेदार आणि संवेदनशील सिनेमे बनविण्याचा ध्यासच घेतला होता. राजकीय जाणिवांची ओळख, आयुष्याचा अर्थ शोधणारे पात्र, महिलांच्या समस्या आणि कोविडची ट्रीटमेंट कशी घ्यावी इथपर्यंतच्या समस्या मांडताना त्यांनी कधीच चित्रपट निर्मितीमुळे मिळणाऱ्या आर्थिक फायद्यासाठी आपला सिनेमा उगाच रंगवला नाही ना पुरस्कार मिळावेत म्हणून उगाच काहीतरी आर्टिस्टिक असं दाखवलं नाही. सिनेमाला वैयक्तिक संवेदना व्यक्त करण्याचं माध्यम समजणाऱ्या जगात त्या सिनेमाला सामाजिक प्रबोधनाचं साधन मानून तरुणांना लाज वाटेल या गतीने काम करत होत्या.
सुनील सुकथनकर आणि डॉक्टर आगाशे यांच्या मदतीने त्यांनी हा दृकश्राव्य वारसा मराठी माणसाला दिला. दिठी त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. जणू त्या त्यांच्या अमूर्त अस्तित्वातून आपल्याला जगाकडे बघायची एक समृद्ध दृष्टीच देऊन गेल्या – दिठी (seeing) !
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.