आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारत देशात क्रिकेट हा जरी लोकप्रिय खेळ असला तरी भारताच्या काही भागात फुटबॉलची लोकप्रियता देखील मोठी आहे. भारतीय फुटबॉलमधे बायचुंग भुतिया या खेळाडूनंतर ज्या खेळाडूचे नाव घेण्यात येते, तो खेळाडू म्हणजे भारताचा लाडका फुटबॉलपटू ‘सुनील छेत्री’. काही काळापूर्वी क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांना त्याने केलेल्या फुटबॉल पाहण्याच्या भावनिक आवाहनानंतर सुनील छेत्री चर्चेत आला होता. त्याचा या आवाहनाला मोठ्या संख्येने भारतीय लोकांनी समर्थन दिले होते.
भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन असलेल्या सुनील छेत्रीचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ साली नेपाळच्या सिकंदराबाद येथे झाला होता. त्याची आई आणि बहीण देखील फुटबॉलपटू असून त्यांनी नेपाळच्या संघाकडून फुटबॉल खेळला आहे. यामुळेच सुनील फुटबॉलकडे आकर्षित झाला, असे मानण्यास हरकत नाही. सुनील छेत्री जरी आज भारताचा सर्वात महागडा फुटबॉलपटू असला तरी एकेकाळी तो काही पैसे मिळवण्यासाठी चोरी करायचा. याची कबुली त्यानेच एका कार्यक्रमात दिली होती.
तो म्हणाला होता की, बालपणी त्याने घरात चोरी केली होती कारण त्याला पैशाची गरज होती. त्याने आधी त्याच्या आईकडे ५० रुपयांची मागणी केली होती. आईने नकार दिल्यामुळे त्याने चोरीचा मार्ग निवडला.
ज्यावेळी त्याच्या आईला या चोरीची माहिती मिळाली त्यावेळी तिने छोट्या सुनीलला खुर्चीला बांधून बदडून काढले होते. अर्थात मुलाला चोरी करावी लागली याचा त्याच्या आईला दुःख होतं. त्या सुनीलला म्हणाल्या की त्या मुलाचा गरजा पूर्ण करण्यास असमर्थ असल्याने त्याच्या मुलाला चोरी करावी लागते आहे. आईचे ते वाक्य ऐकून छेत्रीला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. यानंतर त्याने यापुढे कधीच आईला त्रास होईल अशी चुकीची गोष्ट न करण्याचा निर्णय घेतला.
सुनीलचे वडील सैन्यदलात होते, यामुळे त्यांची सतत बदली व्हायची. यामुळे सुनीलला अनेक शहरात वास्तव्य करण्याची संधी मिळाली होती. सुनीलने आपला बहुतांश काळ हा दिल्लीत घालवला होता. शिक्षणासाठी सुनीलने गंगटोक, दार्जिलिंग, कोलकाता आणि नवी दिल्ली शहरात वास्तव्य केले होते. या संपूर्ण काळात सुनीलला वडिलांची मोलाची साथ लाभली. त्यांनी नेहमी सुनीलला समर्थन दिले. ते सुनीलला शाळेसाठी रोज सायकलवर बस स्टॉपपर्यंत सोडायला यायचे आणि त्याच्या हातात बसच्या खर्चाचे पैसे ठेवायचे. पण सुनील त्या पैशाचे तिकीट न घेता विनातिकीट प्रवास करायचा आणि त्याची बचत करायचा.
२००१ साली झालेल्या आशियाई स्कुल चॅम्पियनशिपमधे त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. इथूनच त्यांचे फुटबॉलशी असलेले संबंध दृढ होत गेले आणि पुस्तकांशी असलेले नाते संपुष्टात आले. यातूनच पुढे त्यांनी संतोष ट्रॉफीमधे दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. २००२ साली त्यांना मोहन बगाना या फुटबॉल क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. इथेच त्याची प्रतिभा बहरत गेली.
२००५ साली त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण तो आला. त्याला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली.
यानंतर त्याने कधीच मागे वळून पहिले नाही. २००६-०७ साली राष्ट्रीय फुटबॉल लीगमधे त्याने अफाट कामगिरी करत १२ गोल केले होते. यानंतर त्याला ‘एनएफएल प्लेयर ऑफ द इयर’ म्हणून निवडण्यात आले होते.
हा प्रवास येथेच संपला नाही, २००८ साली झालेल्या एएफसी चॅलेंजमधे ताजिकिस्तानच्या विरोधात तीन गोल करून २७ वर्षांनी एशिया कप जिंकला होता. सुनीलने आपल्या प्रतिभेच्या बळावर चाहत्यांची मने जिंकली होती. पण २००९ साली अचानक एक काळ असा आला ज्यावेळी सुनीलचा परफॉर्मन्स अचानक डाऊन झाला. त्याला फिफा रँकिंगमधून बाहेर काढण्यात आले, पण सुनीलने परत आपले स्थान पुन्हा प्राप्त केलेच. नेहरू कपमधेही सुनीलने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
२०१० मधे विदेशी फुटबॉल क्लब कॅन्सास सिटी विझार्डकडून खेळण्याची संधी सुनीलला मिळाली, ही संधी प्राप्त करणारा मोहम्मद सालेम आणि बायचुंग भुतिया यांच्यानंतर सुनील छेत्री हा तिसरा भारतीय फुटबॉलपटू होता.
२००७, २०११, २०१२ आणि २०१४ साली त्यांना एआयआरएफ प्लेयर ऑफ द इयर निवडण्यात आले. चार वेळा हा सन्मान मिळवणारा तो एकमेव भारतीय फुटबॉलपटू होता. इतकेच नाही भारताच्या वतीने सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून देखील सुनील छेत्री प्रसिद्ध आहे. जगभरात भारताचे नाव फुटबॉलमधे जरी घेतले जात नसले तरी सुनीलने आपल्या प्रतिभेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलप्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.
२०११ सालच्या चॅम्पियनशिप ट्रॉफीमधे विजय मिळवून देण्यात सुनीलने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. २०१२ साली सुनीलला एएफसी कप चॅलेंजसाठी भारतीय संघाचा कप्तान म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
नुकताच त्याने १०२ मॅचेसमधे ६४ गोल करण्याचा विक्रम करून आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लिओनल मेस्सीची बरोबरी केली होती. सुनील छेत्रीला त्याच्या फुटबॉलमधील योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.
४ डिसेंबर २०१७ साली सुनीलने प्रेमिका सोनम भट्टाचार्यशी विवाह केला होता. सोनम भारतीय फुटबॉलपटू सुब्रत भट्टाचार्य यांची मुलगी आहे. मोहन बगाना संघाचे प्रशिक्षक म्हणून सुब्रत कार्यरत असताना, सुनील देखील त्या संघाकडून खेळत होता, या काळातच त्याची सोनमशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आपल्या या प्रेमसंबंधांना त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकवले. छेत्री बायचुंग भुतिया आणि ब्राझिलियन फुटबॉलपटू रोनाल्डिनोला आपला आदर्श मानतो. महेंद्रसिंह धोनी आणि अभिनेत्री कोंकणा सेनचा सुनील छेत्री चाहता आहे.
सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलच्या विश्वातील एक तेजस्वी तारा असून फुटबॉलला भारतात लोकप्रिय करण्यात त्याने महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.