आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कोणत्याही काळातील कलावंताना आपली कला सादर करण्यासाठी एका उत्तम व्यासपीठाची गरज असतेच. ज्याद्वारे त्याला आपले विचार, मते आणि कला लोकांपर्यंत पोचवणे सहज साध्य होईल. आजच्या काळात सोशल मिडियाने अशा अनेक कलावंतांना एक हक्काचे व्यासपीठ दिले आहे. अनेक भाषेतील, प्रांतातील, देश-प्रदेशातील नवखे आणि उमदे कलाकार या माध्यमातून लोकांसमोर आपली कला मांडत आहेत.
अर्थात, सोशल मिडिया हे कलेचे अस्सल व्यासपीठ म्हणता येणार नाही हेही तितकेच खरे आहे. आजच्यासारखे पूर्वीच्या काळी एकाच वेळी हजारो लाखो लोकापर्यंत आपली कला पोचवणे हे तितकेसे सोपे काम नव्हते, तरीही त्या काळात काही मासिके, साप्ताहिके, नियतकालिके आणि वृत्तपत्रांनी कलाकारांसाठी हे काम सोपे केले. फक्त कलाकारच नाही तर राजकीय, सामाजिक भाष्यकार, तत्वचिंतक, विचारवंत, चित्रकार, कवी असा सर्वच बुद्धीजीवी लोकांसाठी अशी नियतकालिके म्हणजे पर्वणीच ठरली. ज्यांनी या कलावंतांना आणि त्यांच्या कलेला प्रसिद्धी आणि लोकाश्रय मिळवून दिला.
बेनेट, कोलमन आणि कं. (टाइम्स ग्रुप) यांनी १९४९ साली अशाच एका साप्ताहिकाची सुरुवात केली. कालांतराने हे साप्ताहिक भारतातील घराघरात पोहोचले. प्रत्येक भारतीयाला या साप्ताहिकाच्या येण्याची उत्सुकता लागलेली असायची. या साप्ताहिकाने १९६० च्या दशकात तर प्रचंड प्रसिद्धी मिळवली. या साप्ताहिकातून छापला गेलेला लेख असो, कथा असो, कविता, गीत, चित्रे, कार्टून, विनोद या सगळ्या साहित्याला एक वेगळा दर्जा असे. भारतीय वाचकांना खिळवून ठेवण्याचे आणि त्यांची बौद्धिक खुरपणी करण्याचे काम या साप्ताहिकाने पुढे कित्येक वर्षे अगदी इमाने इतबारे केले.
हे साप्ताहिक म्हणजे धर्मयुग!
प्रसिद्ध साहित्यिक आणि नाटककार डॉ. धरमवीर भारती यांची १९६० साली या साप्ताहिकाच्या मुख्य संपादकपदी वर्णी लागली. १९८७ पर्यंत ते या पदावर राहिले. यानंतर धर्मयुगचा काळ समाप्त झाला तो कायमचाच!
स्वातंत्र्योत्तर कालखंडात हिंदी पत्रकारितेला एक वेगळी उंची गाठून देण्यात डॉ. भारती यांनी मोठा हातभार लावला. राज्यसभा खासदार आणि जेडीयुचे सदस्य हरिवंश सिंग यांनी “प्रभात खबर”मधे लिहिलेल्या एका लेखात, डॉ. भारती यांच्या या योगदानाची दखल घेतली होती.
जगभरातील आणि भारतातीलही अत्यंत महत्वाचे मुद्दे, घटना, प्रश्न भारतातील घरोघरी पोहोचवण्याचे काम या साप्ताहिकाने केले. या साप्ताहिकाच्या माध्यमातून वाचकांना जगभरातील घटना, विचार, चळवळी यांच्याशी जोडून घेणे शक्य झाले. साप्ताहिक हिंदी भाषेतून प्रकाशित होत असले तरी, याला सर्व भाषिक वाचकांची तितकीच पसंती होती.
कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून ईशान्य भारतापर्यंत सर्वच राज्यात या साप्ताहिकाला भरभरून प्रतिसाद मिळत होता. ज्याकाळी हे साप्ताहिक फक्त पोस्टाने सर्वत्र पोहोचवले जायचे त्याकाळी याच्या वर्गणीदारांची संख्या ८ ते ९ लाखाच्या घरात होती. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी यात माहितीचा काहीना काही खजिना अवश्य असे. घराघरात या मासिकावर अक्षरश: लोक तुटून पडत असत. साप्ताहिक घरी आले की आधी कोण वाचणार यावरून घराघरात वाद-विवाद होत असत.
जीवनसिंग ठाकूर यांचे शहरीकरणाचा भारतीय समाजजीवनावर आणि मानसिकतेवर काय परिणाम होतो? यावर केलेले सामाजिक भाष्य किंवा आर. मिथिलेश्वर यांच्या बदलत्या ग्रामीण जीवनाच्या गोष्टी अशा धर्मयुगच्या प्रत्येक स्तंभातून काहीतरी नवे, ज्ञानवर्धक साहित्य वाचायला मिळायचा.
प्रत्येक राज्यातील बातम्या, लेख, साहित्य या साप्ताहिकातून प्रसिद्ध होईल याची खबरदारी घेतली जात असे. त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्यातून या साप्ताहिकाला मोठा वाचक वर्ग लाभला. प्रत्येक राज्यातील घटना आणि घडामोडींचा परमार्श यातून घेतला जात असे.
नवोदित कलाकारांसाठी तर हे साप्ताहिक एक वरदानच ठरले. त्याकाळातील अनेक नवोदितांना या साप्ताहिकाच्या माध्यमातून एक सशक्त व्यासपीठ मिळाले. खरे तर आजच्यासारखा समाज माध्यमांच्या बजबजपुरीपासून तो काळ कितीतरी दूर होता. अशावेळी आपल्या कलेला अभिव्यक्तीचे एक मध्यम मिळते हीच गोष्ट कलाकारांसाठी कितीतरी मोठी होती
पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लेखिका शिवानी यांच्या कथा पहिल्यांदा याच साप्ताहिकाच्या माधमातून वाचकांपर्यंत पोहोचल्या. मोहन राकेश यांच्या “आधे अधुरे” या नाटकाची मालिका भारतीय नाट्यरसिकांपर्यंत पोहोचवण्यात याच साप्ताहिकाने महत्वाची भूमिका बजावली. मृणाल पांडे आणि राजेश जोशी यासारख्या लेखकांना याच साप्ताहिकाने पहिल्यांदा प्रसिद्ध केले.
अर्थात, या साप्ताहिकातून फक्त हिंदी लेखकांनाच स्थान दिले गेले असे अजिबात नव्हते. गुजराती, मराठी, बंगाली, तामिळ अशा सर्व भाषेतील उदयोन्मुख नवोदित लेखकांना धर्मयुगनेच पहिली संधी दिली. एवढे साहित्य प्रकाशित करण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागत. डॉ. भारती हे सर्व साहित्य प्रकाशनापूर्वी स्वतः बारकाईने वाचत असत. म्हणूनच अशा सर्व नवोदित लेखकांना न्याय देणे त्यांना शक्य झाले. डॉ. भारती सतत या साप्ताहिकाच्या कामात, लेखनात आणि संपादनातच व्यस्त असत. त्यांच्या या अथक परिश्रमामुळेच धर्मयुगने याकाळात सुर्वणयुगाचा अनुभव स्वतःही घेतला आणि वाचकांनाही दिला.
या साप्ताहिकाने चित्रकारांचेही स्वागत केले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रकार जे. पी. सिंघल यांची चित्रे याच मासिकातून पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. १९५४ मध्ये जेंव्हा जे. पी.चे पहिले चित्र प्रकाशित झाले तेंव्हा ते फक्त २० वर्षांचे होते.
जे. पी.नी पुढे भरपूर चित्रे काढली आणि भारतात एक कॅलेंडर आर्टिस्ट म्हणून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अनेकांनी त्यांच्या या चित्रांचा पुनर्वापर केला.
या साप्ताहिकातून प्रसिद्ध होणारी ‘डब्बूजी का कोना’ ही कॉमिक स्टोरी तर सर्वच वयोगटातील वाचकांसाठी हास्यरंजनाची दर्जेदार मेजवानीच! प्रसिद्ध कार्टूनिस्ट अबीद सुरती यांचे कार्टून्स या स्टोरीसाठी वापरलेले असत. प्राण यांच्या विनोदी कथा आणि हरीश चंद्र यांच्या कवितांना याच साप्ताहिकाने पहिल्यांदा स्थान दिले. A3-आकाराच्या या साप्ताहिकात प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी पूरक मेजवानी निश्चित असे म्हणूनचग घराघरातील प्रत्येक सदस्याला या साप्ताहिकाच्या पुढील अंकाची उत्सुकता असे.
बालकथा, चित्रे, कविता, विनोद, सर्व भाषीय साहित्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घटना आणि घडामोडींचे विश्लेषण देणारे हे साप्ताहिक म्हणजे दर्जेदार मेजवानीच!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.