आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगभरातील लोक सध्या कोरोनाने घातलेल्या धुमाकूळामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे आजपासून शंभर वर्षांपूर्वी आलेल्या एका महामारीचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. तो असा काळ होता ज्यावेळी स्पॅनिश फ्लू नावाचा आजाराने थैमान घातलं होतं आणि एक इन्फ्लुएंजा नावाचा विषाणू त्यासाठी जबाबदार होता.
त्या महामारीत तब्बल २ कोटी लोकांचे प्राण गेल्याची नोंद इतिहासात आढळून येते. अनेक परिवार त्या महामारीत नष्ट झाल्याचे सांगितले जाते.
पण १९ व्या शतकात देखील एक असाच आजार होता ज्याचं नाव होतं प्लेग. त्याने देखील त्याकाळी आजच्या मुंबई-पुण्यात हजारो लोकांचे प्राण घेतले होते. त्या आजारामुळे मुंबईची लोकसंख्या झपाट्याने कमी झाली होती आणि असंख्य लोक मुंबई सोडून देशाच्या इतर भागात पळाले होते. त्यावेळी डॉक्टर आणि इतर आरोग्य सेवकांनी अक्षरशः आपलं आयुष्य धोक्यात घालून रुग्णांची सेवा केल्याचा नोंदी आहे.
अशाच डॉक्टर्सपैकी एक होते डॉ. एकाशियो गाब्रिएल व्हिलेगास, ज्यांनी या रोगाचा उलगडा करण्यासाठीच नाहीतर या रोगाने ग्रासलेल्या अनेकांचे आयुष्य वाचवण्यात मोठे मोलाचे योगदान दिले होते.
त्यांनी आपलं आयुष्य धोक्यात घालून १८,००० रुग्णांची सेवा केली होती.
१ एप्रिल १८५६ साली गोव्याच्या आरपोरा गावात डॉ. व्हिलेगास यांचा जन्म झाला होता. पुढे वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली. त्यांनी मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मांडवी येथे आपली प्रॅक्टिस सुरू केली.
१८८८ साली त्यांची मुंबई महानगरपालिकेत तब्बल ५ वेळा सलग निवड झाली होती. मुंबई पालिकेवर निवडले जाणारे ते पहिले गोवेकर होते.
सप्टेंबर १८९६ मध्ये त्यांनी प्लेगचा पहिल्यांदा उलगडा केला होता. मांडवीच्या पोर्ट ट्रस्टच्या गरीब वस्तीच्या भागात त्यांचं क्लिनिक होतं. पोर्ट ट्रस्टचा भागातील अस्वच्छतेची ते सदैव तक्रार महानगरपालिकेत करायचे. त्यांना नेहमी भीती असायची की त्यांच्या भागात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा खूप मोठा धोका आहे.
१८ सप्टेंबर १८९६ ला लुकमाबाई नावाच्या एका महिलेला एका विचित्र आजाराचे निदान झाले होते. त्या बाईचा पाय सुजून संत्र्याच्या आकाराचा झाला होता. तिचे डोळे सुजले होते. तिचे अंग तापाने फणफणले होते. तिला १०४ अंश ताप होता. तिच्या अंगाचा थरकाप होत होता आणि क्षणार्धात ती दगावलीसुद्धा, हा कुठलाही साधारण रोग नाही याची जाणीव डॉ. व्हिलेगास यांना झाली.
पण अचानकपणे अशाच लक्षणांचे ५०-६० रुग्ण त्यांच्या दवाखान्यात दाखल झाले. १८९६ च्या शेवटी दर आठवड्याला १९०० लोक या प्लेगने आजारी पडून मृत्युमुखी पडत होते. तब्बल १ लाखांनी मुंबईची लोकसंख्या घटली.
त्यावेळी प्रशासनाची अक्षरशः तारांबळ उडाली होती. एकावर उपचार करायचा तर दुसरा आजारी पडत होता, अत्यंत कडक कायदे लावून ह्या महामारीचा सामना केला जात होता. शर्थीचे प्रयत्न करून डॉ. व्हिलेगास यांनी प्लेगवर संशोधन केले आणि उंदीर या आजाराच्या प्रसाराला कारणीभूत असल्याचे लोकांसमोर आणले.
व्हिलेगास यांच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी एक्सपर्ट्सची चार जणांची टीम संशोधन करण्यासाठी नेमण्यात आली होती. त्या टीमने दावा केला की एका विभागातून दुसऱ्या विभागात जाणाऱ्या उंदरांमुळे प्लेग हा आजार पसरत असून तेच या उपद्रवाला जबाबदार आहेत.
आजार लक्षात आल्यावर मुंबईच्या गव्हर्नरने डॉ. हॉपकिन्स यांना बोलावणं धाडलं ज्यानी कॉलराची लस शोधून काढली होती. आता त्यांना प्लेगची लस विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले. तीन महिने सलग आपल्या प्रयोगशाळेत काम करून त्यांनी लसीचा शोध लावला आणि त्या लसीची चाचणी सर्वप्रथम स्वतः वर केली. मग पुढे जानेवारी १८९७ ला भायखळ्याच्या तुरुंगातील कैद्यांची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली. लगेचच त्या लसीचा वापर प्लेगच्या उपचारार्थ सुरू करण्यात आला.
या लसीमुळे आजाराचा धोका जरी ५० टक्क्यांनी कमी झाला होता तरी भायखळा जेलमध्ये ७ कैदी या चाचणीदरम्यान मृत्युमुखी पडले होते. पण लोकांचे उपचार करणे हे अत्यंत गरजेचे होते. व्हिलेगास यांनी स्वतः पुढाकार घेऊन तब्बल १८ हजार लोकांचे यशस्वी लसीकरण केले.
नुसते लसीकरण नाहीतर मुंबईमध्ये त्यांनी यशस्वी सफाई अभियान राबवून सगळ्या झोपडपट्टी भागाला स्वच्छ केले आणि ह्या रोगाच्या प्रसाराला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. पण तरीही प्लेग त्यांच्या हातून निसटला आणि भारताच्या इतर भागात पसरला. पुण्यात प्लेगने मोठे रणकंदन माजवले होते.
चाफेकर बंधूंनी केलेला रँडचा वध हा देखील या प्लेगचाच परिपाक होता.
व्हिलेगास यांनी मात्र मुंबई शहराला आपल्या प्रयत्नातून ह्या आजाराच्या तावडीतून वाचवण्यात मोठे यश संपादन केले होते. १९०६ साली ते मुंबईच्या महानगरपालिकेच्या प्रेसिडेंटपदी निवडून आले. त्यांनी आजन्म मुंबईला साथीच्या रोगांपासून वाचवण्यावर वेळ खर्ची घातला आणि शहर सुंदर व टापटीप केले. २१ फेब्रुवारी १९३३ ला डॉ. व्हिलेगास यांचा मृत्यू झाला.
व्हिलेगास यांनी प्लेगच्या साथीच्या काळात केलेल्या रुग्ण सेवेची आठवण म्हणून आज त्यांचा एक पुतळा मुंबईच्या जहांगीर हॉलमध्ये बसवण्यात आला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.