आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
ही संघर्षगाथा त्या मजुराच्या मुलीची आहे, जी पेशाने धावपटू आहे. पण फारच गरीब कुटुंबातील असल्यामुळे तिला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून देखील २०१७च्या लंडन वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमधून तिची हकालपट्टी करण्यात आली होती. असे असूनही तिने हार मानली नाही. आपल्या देशासाठी ती खेळत राहिली.
२३ वर्षाच्या या खेळाडूचे नाव चित्रा उन्नीकृष्णन असे असून अनंत अडचणींचा सामना करून २०१८ च्या एशियन गेम्स स्पर्धेत १५०० मीटर स्पर्धेत पदक जिंकले आहे.
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील मुंडूर या गावी, ९ जून १९९५ रोजी, एका अत्यंत गरीब कुटुंबात चित्राचा जन्म झाला. तिचे पूर्ण नाव पलिक्कीझील उन्नीकृष्णन असे आहे. चार भावंडांमध्ये टी तिसऱ्या नंबरची. शेतात मजुरी केल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा घरखर्च चालतो. तिच्या वडिलांचे नाव उन्नीकृष्णन असून आईचे नाव वासंती कुमारी असे आहे. दोघेही शेतमजुरी करतात.
घरची परिस्थिती बेताची असली तरी घरच्यांनी कधीच मुलीला शिक्षण घेण्यापासून रोखले नाही. तिला खेळण्यापासून देखील रोखले नाही. लहानपणापासून सडपातळ असलेली चित्रा उत्तम धावपटू होती.
तिने तिच्या सिनियर मुलींसोबत अनवाणी पायानेच धावण्याची प्रॅक्टिस सुरु केली. ती फार चपळ होत्या. तिच्या कोचने मार्गदर्शन करून तिला एक उत्तम धावपटू होण्यास मदत केली.
तिने केरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या केरळ स्टेट एथलेटिक्स मीटमधे ३००० मीटरच्या शर्यतीत गोल्ड आणि १५०० मीटरच्या शर्यतीत सिल्व्हर मेडल मिळवले आणि २००९ साली १४ वर्षाची चित्रा चर्चेत आली. यानंतर चित्राची पाऊलं सुसाट वेगाने धावायला लागली. एकापाठोपाठ एक रेकॉर्ड मोडत तिने अनेक पदक आपल्या नावे केले.
पुण्यात २०११ साली ५६व्या इंटरनॅशनल स्कुल गेम्सचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. ही स्पर्धा चित्राच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट ठरला. यात चित्राने ५०००, ३००० आणि १५०० मीटरच्या तिन्ही स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवले. इतकेच नाही तर, तिने ३००० मीटरच्या क्रॉसकंट्री रेसमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले आहे. २०१३ साली उत्तर प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल स्कुल गेम्समध्ये देखील चित्राने चार गोल्ड मेडल जिंकले.
एशियन स्कुल एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने ३००० मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल जिंकले. रांची येथे झालेल्या इंडियन नॅशनल गेम्समध्ये तिने ४ गोल्ड जिंकून रेकॉर्ड केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळवण्यासाठी तिने भुवनेश्वर येथे होणाऱ्या आशियाई एथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभाग नोंदवला.
७ जुलै २०१७ ला भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियमवर २२ व्या आशियाई एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या १५०० मीटर स्पर्धेची अंतिम फेरी होती. १२०० मीटरची शर्यत पूर्ण झाली होती. सर्वांना वाटत होते की चीन नाहीतर जपानची मुलगी पदक पटकावणार, पण तिला माहिती नव्हतं की चित्रा देखील त्या शर्यतीत आहे. तिच्यासोबत मोनिका चौधरी ही दुसरी भारतीय धावपटू देखील होती.
शर्यत सुरु झाली आणि काही क्षणात सर्व चिनी जपानी धावपटूंना मागे टाकत चित्राने ४ मिनिटे १७.३२ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि गोल्ड मेडल जिंकले. तिच्या कामगिरीने खुश होऊन चित्राला ‘क्वीन ऑफ एशियन गेम्स’ हा किताब बहाल करण्यात आला.
तिला ओडिशा सरकारने १० लाख रुपयांचे पारितोषिक देखील प्रदान केले. चित्राकडे आता मोठ्या संख्येने पदक आले होते आणि त्यांच्याबरोबवर धनराशी देखील आली होती. यामुळे त्यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती देखील सुधारली.
चित्राच्या यशाने सर्वत्र कौतुक होत असताना २०१७ साली होणाऱ्या वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २०१६ च्या साऊथ एशियन गेम्स आणि २०१७ च्या २२ व्या एशियन एथलेटिक्स चॅम्पियनशिपमधे सुवर्ण पदक जिंकून देखील तिला बाहेर काढल्यामुळे चित्रा दुखावली गेली. तिने फेडरेशनच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले. कोर्टाने निष्पक्षपणे निकाल देत फेडरेशनला चित्राची लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिपसाठी रवानगी करावी, असे आदेश दिले. असे असून देखील तिला पाठवण्यात आले नाही. फेडरेशनने काहीतरी कारण देऊन तिला जाण्यापासून रोखले. फेडरेशनच्या या कृतीच्या निषेधार्थ चित्राच्या साथीदारांनी देखील जाणार नाही म्हणून जाहीर केलं. फेडरेशनच्या विरोधातील लढाईत चित्राला मोठे जनसमर्थन लाभले होते.
फेडरेशनमुळे वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सहभागी न होता आल्याने चित्रा नाराज होती पण तिने आपली तयारी सुरू ठेवली. २०१८ सालच्या १८व्या एशियन गेम्स स्पर्धेत तिला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली. यावेळी मात्र फेडरेशन तिला अडवू शकलं नाही.
इंडोनेशियाच्या जकार्ता येथे ही स्पर्धा होती. चित्रा या स्पर्धेसाठी रवाना झाली. चित्राने या स्पर्धेत कमालच केली. १५०० मीटरच्या स्पर्धेत ४ मिनिटे १२ सेकंदात शर्यत पूर्ण करत कांस्यपदकावर आपली मोहर उमटवली. तिच्या विजयामुळे देशभरात एकच जल्लोष साजरा झाला. आणि अर्थातच फेडरेशन शरमेने पाणी पाणी झालं
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.