आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
काला कैसा नाम है रे तेरा..??? असे म्हणत स्वत:ला राम म्हणवणारा, पांढऱ्याशुभ्र कपड्यातील, हरिदादा जेव्हा कालाला हिणवतो, तेव्हा काला म्हणजे दास्यत्व, हिनता, गरीबी हेच त्याला नमूद करायचं असतं. परंतू यावेळी पडद्यावरचा काला हरिदादाला सांगायला विसरत नाही, की काला हा मेहनतीचा आणि स्वाभिमानाचा रंग आहे रे भावा. ग्रो अप. समजून घे. काला का सच्चा मिनिंग.
त्यानंतर चित्रपटाच्या शेवटच्या भागात हरिदादा स्वतःला राम म्हणवून सिम्बॉलिक करू पाहतो आणि कालाला रावण म्हणत हिणवतो. त्याचवेळी हरिदादाच्या घरात सुरु झालेली रामकथा, हरिदादाचे नगर, दंडकारण्य नगर.
हरिदादाच्या घरी असणारे परशुरामाचे पेंटींग. कालाचे घर पेटवल्यावर, रावणाची लंका पेटवली अशा अर्थाने असलेलं हरिदादाचं बोलणं आणि एकूणच सगळा चित्रपट. त्यातला ‘काला’ आयमिन ‘अपुनका फेवरेट रजनीभाय’ भाव खाउन जातो. आणि मग रावण असा असेल तर?
यादरम्यान शरद तांदळे लिखित ‘रावण : राजा राक्षसांचा’ हाती येतं.
४३२ पानांचं हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवाव, एवढं खिळून ठेवतं. लेखकाची लिखाणाची हातोटी, प्रसंगनिर्मिती रेखाटण्याचं कौशल्य, मध्येमध्ये वापरलेले व्यक्तिचरित्रात्मक स्केच, सगळं आकलनासाठी बेस्ट..!
आपला जन्मच बलात्कारातून झालाय, विवाहाशिवाय आपली आई आणि दोन मावश्या बाप म्हणून आजपर्यत मिरवलेल्या नराधमाकडून इच्छा नसताना गरोदर राहिल्या. पुढे मात्रुत्वाच्या संवेदनांत बलात्काराच्या वेदना त्या विसरल्या.
हे जेव्हा त्या नुकत्याच कुमारवयात प्रवेश करणाऱ्या मुलाला कळालं, तेव्हा हादरलेल्या त्या तरूणाची झालेली अवस्था भयानक होती.
आत्महत्येच्या प्रयत्नापर्यंतचा त्याचा प्रवास आणि नंतरचंं परिवर्तन सगळच जबराटपणे मांडण्यात लेखकाला यश आलंय.
त्यानंतर आईच्या आप्ताबरोबर जगण्यासाठीचा दररोज करावा लागणारा संघर्ष. स्वत:ला सिद्ध करताना होणारी दमछाक, त्याची प्रखर बुद्धीमत्ता, आसमंत भेदणारी महत्वकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, द्रुढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय, नितिमत्ता आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित बरोबर घेवून स्वअस्तित्व सिद्ध करून बुद्धीच्या जोरावर एल्गार करत स्वत:चं साम्राज्य उभं करणारा हा बंडखोर राजा. वर्ग, वंश, लिंग, वर्ण याविरोधात बंड करतो.
हजारो वर्षापासून हा समाज त्याला समजून न घेता जाळत आला तरी तो संपला नाही. दरवर्षी नव्याने त्याला जाळाव लागतं, तरी तो मिटत नाही. असा महानायक आणि त्याच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू लेखकाने उलगडले आहेत.
दर्शन, व्यापार, राज्यशास्र, आयुर्वेद, इ. अनेक विषयांत पांडित्य मिळवूनही, त्याला खलनायक ठरवून, त्याची कायमच उपेक्षा केली गेली.
अवहेलनांच्या फेऱ्यांत गुरफटलेल्या त्याच्या आयुष्याला वाईट विशेषणांची बरसात करत मांडलं गेलं. हजारो वर्षापासून त्याच्या दहनाचा सोहळा आनंदाने मांडला गेला, तरीही तो अजूनही टिकून आहे. भक्कमपणे..!
बुद्धीबळ, विणा, रावणसंहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्तोत्र यांच्या रचनेतून नव्या माहितीच्या कक्षा इतरांसाठी रुंदावल्या. दैत्य, दानव असूर, नाग आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून राक्षस संस्कृतीचा पाया त्याने रचला.
आजच्या अठरापगड जातींना अनेक समाजसुधारकांच्या पिढ्या खपल्या तरी आपण एतत्रित बघू शकलो नाही. ते एकतेचं चित्र लेखकाने अतिव सुंदरपणे कादंबरीत शब्दांकित केलंय, रावणानं ते अस्तित्वात आणलं, हे वाचताना कौतुकास्पद वाटतं.
त्याच्या आयुष्यात घडलेल्या अघटीत घटना, आलेली अनपेक्षित वादळं. त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वत:च्या हिंमतीवर मिळवलेलं लंकाधिपतीचं पद.
इतर राजासारखं फक्त स्वत:चं सुख उपभोगलं नाही. त्याची जनताही सोन्याच्या घरात राहत होती. हे वाचलं की कादंबरी लिहितांना लेखकाने केलेले प्रचंड संशोधन आणि अभ्यास हे आपल्याला वाचतांना लक्षात येते.
लेखकाचे शब्दांवर असलेले प्रभुत्व पदोपदी जाणवत राहते. हजारो वर्षांपासून अनुत्तरीत असलेल्या त्याच्या वैयक्तीक आयुष्याचा, त्याच्या अंगभूत व्यक्तित्वाचा धांडोळा यापुर्वी कोणी कधी घेतलेला पहायला मिळत नाही.
त्याचं रोमहर्षक आयुष्य, त्यातील चित्तथराक प्रसंग, स्वसामर्थ्यावर झालेला महानायक रावण आणि त्याच्या आयुष्याची लेखकाने केलेली विवेकी मांडणी!
कादंबरीचे स्वरूप वर्णनात्मक आणि माहितीप्रद जास्त आहे, भावनात्मक कमी आहे. म्हणजे अशा अशा पद्धतीने असे असे घडत गेले हे फक्त आपल्यासमोर उलगडत जाते.
या काळातील प्रसंग, व्यक्ती, वस्तू, खाण्याचे पदार्थ यांचे जसेच्या तसे आणि हुबेहूब वर्णन चपखल विशेषणं लावून करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे.
सुमाली, सुकेश, माली, माल्यवान, कैकसी, महापार्श्व, कुंभ, निकुंभ, शुक्राचार्य, बिभिषण महोदर, कुंभकर्ण, प्रहस्त, पौलस्त्य, ब्रम्ह, मंदोदरी, शुर्पा, मेघनाद… सगळ्या पात्रांना वाचताना लेखकानं आपल्या हातोटीनं न्याय दिलाय, हेही जाणवतं.
स्वातंत्र्य, समानता, सुरक्षितता या तीन तत्वावर निर्मिलेला राक्षसी सम्राज्याचा पाया. कुणावरही अन्याय होणार नाही, याची प्रजेला रावणाने दिलेली ग्वाही, राजा म्हणून जगताना प्रजेच्या संरक्षणाबाबत त्याचे विचार आणि कर्तुत्व सगळं छान मांडलय.
त्यात विशेष म्हणजे, रावणाने स्री-सैन्यदलाची आपल्या राज्यात केलेली निर्मिती. लंकीनीला राजधानीच्या संरक्षणाची दिलेली महत्वपुर्ण जबाबदारी, अनेक महत्वाच्या पदांवर स्रियांची केलेली नेमणूक.
कुंभस्सिनी नावाच्या बहिणीला स्वपसंदीने लग्न केल्यावर दंड न देता, तिचं मन समजून घेणारा कोमल मनाचा भाऊ. शुर्पाची नाक आणि कान छाटल्यावर रागाने प्रतिशोध घ्यायला गेलेला बंधू, राजाला रडता येत नाही म्हणत आयुष्यभर अनेक वादळ पेलताना धीरगंभीरपणे अश्रू रोखणारा माणूस.
प्रत्येक विषयांवर बायकोबरोबर केलेलं विचारमंथन, मंदोदरीवरचं प्रेम, सितेला अशोकवनात पाठवून दाखवलेला संयम आणि बाकी सगळ्या गोष्टी प्रशंसनीय आहेत. त्याचे हे सगळे पैलू उत्तमपणे मांडले गेलेत.
त्या व्यक्तिरेखेशी संबधित अनेक समज-गैरसमज, मरूची नावाचं मायावी हरीण वगैरे किंवा इतर मायावी गोष्टी विवेकी वाचकांना पटतील अशा रितीने कादंबरीत मांडल्यात.
बाकी स्पेशल हेलिकाँप्टर वगैरे वाचून जरा खटकतं राहतं, पण संशोधन साहित्यात त्याचा उल्लेख आहे, म्हणून त्याबाबतीत लेखकाला बोलता येणार नाही.
शेवटी मृत्युच्या प्रसंगी गुरूउपदेश ऐकायला आलेल्या लक्ष्मणाला जेव्हा तो म्हणतो,
‛लक्ष्मणा, तुझ्या भावाला सांग, दोन बुद्धीमान पुरुषांनी संवाद न करता लढलं तर त्यात धूर्त आणि लबाड लोकांचा फायदा होत असतो. जसा सुग्रीव आणि बिभीषणाचा होणार आहे. कपटी लोकांचा आधार घेऊन मिळालेला विजय निराशेच्या गर्तेत नेत असतो.’
हे सगळं वाचकाला स्पर्शून जातं. केवळ परिस्थितीवश खलनायक ठरवलेल्या या महानायकाची ही कहाणी.
‘राक्षसांचा राजा :रावणा’च्या जीवनातील संपूर्ण घटनाक्रम आणि व्यक्ती, नाते, गोतावळा, स्थळे, त्याचा संघर्ष आणि राज्य यांची इत्यंभूत माहिती मिळवायची असेल तर ‘रावण:राजा राक्षसांचा’ कादंबरीला पर्याय नाहीच!!
===
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.