आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
वीर जवान अब्दुल हमीद यांचे नाव ऐकल्यावर प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनात एक आदराची भावना उत्पन्न होते. त्यांच्या साहस आणि शौर्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर तरळते.
वीर अब्दुल हमीद यांचा जन्म १९३३ साली गाझीपूरच्या एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील फारुख उस्मानी सैन्यदलात लान्सनायक पदावर कार्यरत होते. परिवाराच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या आईवर होती. हमीद यांचे शिक्षण बालपणी गावातील एका शाळेत झाले. हमीद फक्त चौथ्या इयत्तेपर्यंत शाळेत गेले. यानंतर त्यांचे शिक्षणात मन रमले नाही.
त्यांची आई, त्यांच्या भविष्यासाठी चिंतीत होती. त्यामुळेच त्यांच्या आईने शिवणकाम शिकण्यास हमीद यांना सांगितले. पण हमीद यांनी याला देखील नकार दिला. त्यांना फक्त कुस्तीची आवड होती, फक्त आवडच नाही तर त्यांच्यात कुस्ती खेळण्याचे कसबसुद्धा होते.
हमीद स्वभावाने फार विनम्र होते. ते नेहमी लोकांची मदत करायचे. एक दिवस ते गावातील एका चौकात बसले होते. एक २० वर्षांचा तरुण पळत पळत त्यांच्याजवळ आला. तो धापा टाकत हमीद यांना सांगू लागला की काही ५० गुंड त्यांच्या शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत. लोकांना अडचणीत बघून हमीद यांना त्रास होत असे. त्या तरुणाचे बोलणे ऐकताच त्यांनी कसलाही विचार न करता शेताच्या दिशेने धाव घेतली. तिथे पोहचताच त्यांनी त्या गुंडांना आव्हान दिले. पण गुंडांना वाटले की हा एकटा आपलं काय वाकडं करून घेईल. मग अब्दुल हमीद यांनी त्या गुंडांची जी हालत केली की ते पुन्हा तिथे आलेच नाहीत.
हमीद यांचे गाव मगई नदीकाठी आहे. त्या नदीला सतत पूर यायचा. एकदा असाच पूर आला. पाण्याचा वेग इतका होता की गावातील दोन महिला पाण्यात बुडू लागल्या. त्या महिला बचावासाठी आरोळ्या मारत होत्या. पण लोक पाण्याच्या भीतीने फक्त बघ्याची भूमिका घेऊन उभे होते.
हमीद तिथून जात असताना त्यांना नदीच्या काठावर गर्दी दिसली. ते जवळ गेले तेव्हा त्यांना त्या बुडणाऱ्या महिला दिसल्या. त्यांनी कसलाच विचार न करता पाण्यात उडी मारली. याठिकाणी त्यांनी प्राण पणाला लावून त्या बुडणाऱ्या महिलांचा जीव वाचवला. यामुळे हमीद सर्वांचाच लाडका बनला होता.
गावातून निघून १९५४ साली ते भारतीय सैन्य दलात सामील झाले. त्यांना कश्मीरमध्ये नियुक्त करण्यात आले होते. हा तो काळ होता जेव्हा पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत होती. १९४७ मध्ये भारताकडून करण्यात आलेला पराभव पाकिस्तानला पचनी पडत नव्हता. एक इनायत नावाचा दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करत होता. अब्दुल हमीद यांनी त्याला अडवले. दोघांनी एकमेकांवर फायरिंग करण्यास सुरुवात केली. अखेरीस आपल्या चतुराईच्या बळावर हमीद त्याला जिवंत पकडण्यात यशस्वी ठरले होते.
ते राष्ट्रासाठी आपले प्राण देखील देण्यास तयार होते. ते नेहमी म्हणायचे की पलटनमध्ये ज्या सैनिकांकडे पदक असते, त्यांच्याप्रती लोकांच्या मनात खूप आदराची भावना असते, १९६२ च्या युद्धातील वीर सैनिकांसाठी लोकांच्या मनात अशीच आदराची भावना होती. अब्दुल हमीद यांना देखील त्या सैनिकांप्रमाणे पदक मिळवायचे होते. त्यांना फक्त संधीची गरज होती आणि १९६५ च्या युद्धाच्या रूपात ही संधी त्यांना मिळाली.
१९४७ मधल्या पराभवाने पाकिस्तानचे मन भरले नव्हते. १९६५ मध्ये पाकिस्तानने पुन्हा कश्मीरवर हल्ला करण्यास सुरुवात केली, यावेळी मात्र भारताने पश्चिम आघाडीवरून वेगळी फ्रंट उघडली आणि पंजाबमधून युद्धास प्रारंभ झाला. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हमीद यांची सुट्टी रद्द करण्यात आली होती. हमीद यांना तात्काळ परतण्यास सांगितले. ते आपला सामान बांधत असताना दोरी तुटली. त्यांच्या पत्नी रसूलन यांच्यासाठी हा एक अशुभ संकेत होता. त्यांनी हमीद यांना जाऊन नका, म्हणून विनवण्या करण्यास सुरुवात केली. त्यावेळी हमीद यांनी त्यांना राष्ट्र प्रथम आहे बाकी सर्व नंतर असं हसत हसत सांगितले.
हमीद आपले घर सोडून निघाले. रस्त्यात त्यांच्या सायकलची चैन तुटली, हा देखील एक अशुभ संकेत होता. पण याकडे दुर्लक्ष करत ते पायीच स्टेशनला पोहचले. पण तिथे त्यांची ट्रेन ते पोहचण्याच्या आधीच निघून गेली होती.
सकाळपासून त्यांच्यासोबत घडणारे अपशकुन बघून त्यांचे मित्र त्यांना जाऊ नकोस असा सल्ला देत होते. पण हमीद यांनी कोणाचेचे ऐकले नाही. ते म्हणाले मला माझ्या जीवापेक्षा मला माझा देश आणि कर्तव्य प्रिय आहे. त्यांनी सर्वांची गळाभेट घेत हसतमुखाने सर्वांचा निरोप घेतला.
एकीकडे हमीद ज्या पोस्टवर तैनात होते, तिथे परिस्थिती चिंताजनक होती. १९४७ नंतर पाकिस्तानने पुन्हा देशाच्या विरोधात शस्त्र उपसले होते. ते अमृतसरच्या दिशेने वेगाने येत होते. अमृतसर आणि शत्रूच्या रस्त्यात हमीद तैनात होते. हमीद यांच्याकडे शौर्य दाखवून पदक मिळवण्याची इच्छा पूर्ण करण्याची एक चांगली संधी यानिमित्त चालून आली.
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या पोस्टवर पेटन टँक्स वापरून गोळे डागण्यास सुरुवात केली. हमीद यांना शत्रूच्या ताकदीचा अंदाज आला होता. जर टँक्सला अडवण्यात आले नाही तर युद्धात शत्रूला अडवणे कठीण होईल, असे हमीद यांच्या लक्षात आले. हमीद जमलं तर मोर्चा सोडून स्वतःचा जीव वाचवू शकत होते पण त्यांचे इरादे इंचभर देखील बदलले नाहीत. त्यांनी आपल्या पराक्रमाने शत्रूला नेस्तनाबूत केले.
हमीद यांनी शत्रूच्या चार टँक्सवर निशाणा साधला. जर प्राण दिले तर परमवीर चक्र मिळते हे हमीद यांनी ऐकले होते. ते पदक मिळवण्यासाठी हमीद यांनी शत्रूच्या अजून तीन टँक्सला नष्ट केले. त्यांनी शत्रूला ना पुढे जाऊ दिले ना मागे हटू दिले. त्यांनी आपल्या पराक्रमाने शत्रूच्या सात टँक्सला बरबाद केले होते.
हमीद इतकं नुकसान करतोय बघून शत्रूने त्यांना टार्गेट केलं आणि त्यांच्यावर गोळीबार केला. वीर अब्दुल हमीद यांनी राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण केले. एखादं शौर्यपदक मिळवण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले पण त्यासाठी त्यांना स्वतःचे प्राण अर्पण करावे लागले.
त्यांना मृत्यूनंतर सेनेच्या युद्धजन्य परिस्थितीतील सर्वोच्च सन्मान, परमवीर चक्र या पदकाने सन्मानित करण्यात आले. कसूर येथे सेनेने त्यांची समाधी निर्माण केली आहे.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या अब्दुल हमीद यांनी राष्ट्रासाठी एक सर्वोच्च बलिदान दिले होते, त्यांचे हे बलिदान कायम सर्व राष्ट्रभक्तांच्या स्मरणात राहील हे निश्चित!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.