आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
डायनोसॉर म्हणजे अवाढव्य, अजस्त्र, महाकाय, अशी विशेषणेही कमी पडतील असा प्राणी! हा प्राणी कालौघात पृथ्वीतलावरून नामशेष झाला असला तरी, त्याच्याबद्दलचे कुतूहल मात्र आजही कायम आहे.
भारतात पुरातत्व खात्याने जे काही उत्खनन केले त्यावरून भारतीय उपखंडातही डायनोसॉरचे अवशेष मिळाले आहेत. खरे पाहता, एकेकाळी या संपूर्ण पृथ्वीवर फक्त डायनोसॉरचीच सत्ता होती. डायनोसॉरची घरटी, अंडी, सांगाडे, त्यांच्या पायांचे ठसे हे भारत आणि भारताबाहेरही बऱ्याच ठिकाणी आढळतात. त्यांचा हा मुक्त वावर पाहता हे विश्वची माझे घर ही पंक्ती त्यांना अगदी तंतोतंत लागू पडते.
अलीकडेच भारतात जी काही प्राणी आणि वनस्पतींचे जीवाश्म अवशेष मिळाले आहेत. त्यावरून मेसोझोइक युगातील म्हणजे डायनोसॉरच्या युगातील प्राणीजगताच्या प्रवासाचा उलगडा होतो.
राजकीय सीमारेषांमध्ये या जगाची विभागणी होण्यापूर्वी ही संपूर्ण पृथ्वी म्हणजे एकाच विशाल आणि विस्तृत राज्य होते. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात सापडलेल्या जीवाश्मांवरून हे स्पष्ट होते की, भारत हा डायनोसॉरसाठी एक आकर्षण बिंदू होता.
जगभरात डायनोसॉरच्या ३०० प्रजाती आढळून आल्या आहेत. काही डायनोसॉर शाकाहारी होते तर, काही मांसाहारी हे देखील संशोधनातून समोर आहे आहे.
आजपर्यंतच्या माहितीवरून भारतात डायनोसॉरच्या २५ ते ३० प्रजाती आढळून आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, भारतात डायनोसॉरचे जे अवशेष आढळून आले आहेत, ते अगदी चांगल्या अवस्थेत आहेत.
पहिला अवशेष १८२८ साली मिळाला होता. भारतातील डायनोसॉरचा इतिहास तपासत असताना ब्रिटीश अधिकारी स्लीमन यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. १८२८ साली विल्यम हेन्री स्लीमन हा इस्ट इंडिया कंपनीच्या प्रमुख पदावर होते.
त्यांना मध्यप्रदेशातील जबलपूर जवळ नर्मदा नदीच्या तीरावर बेसाल्टच्या खडकांची उंच रचना आढळून आली. या प्रदेशातच जीवाश्म अवशेषांचा पहिला शोध लागला असल्याचे हेन्रीनी आपल्या डायरीत लिहून ठेवले आहे.
हे जीवाश्म संशोधनासाठी लंडन तसेच कलकत्त्याच्या इंडियन म्युझियम मध्ये पाठवण्यात आले. या जीवाश्मावरून डायनोसॉरची टीटानोसॉरस या प्रजातीची ओळख पटली. अर्थात, भारतात डायनोसॉरच्या मोजक्याच जातींची माहिती मिळाली असली तरी, या अभ्यासामुळे डायनोसॉरच्या इतिहासात मोलाची भर घातली गेली आहे.
भारतातील प्रजातींचा अभ्यास:
मध्यप्रदेशात भारतात डायनोसॉरच्या पहिल्या जीवाश्मांचा शोध लागल्यानंतर जीवाश्मशास्त्र शास्त्रज्ञांना अधिकच उत्सुकता लागून राहिली. त्यांनी आणखी जोमाने हा अभ्यास सुरु ठेवला. ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ अशोक सहानी यांच्या मते भारतात गेली पावणे दोनशे वर्षे झाली डायनोसॉरच्या जीवाश्मांचा अभ्यास सुरु आहे. या संशोधनातही तीन महत्वाचे टप्पे आहेत. ट्रायसिक, ज्युरासिक आणि क्रेटायसिस.
भारतीय डायनोसॉरच्या प्रजाती:
भारतात डायनोसॉरच्या २५ ते ३० जाती होत्या असा अंदाज आहे. अगदी सुरुवातीच्या ट्रायसिक कालखंडातील चपळ डायनोसॉर (जो २५१.९ दशलक्ष ते २०१.३ दशलक्ष वर्षापूर्वी ) ज्युरासिक युगातील महाकाय डायनोसॉर (२०१ दशलक्ष ते १४५ दशलक्ष वर्षांपूर्वी) क्रेटासियस युगातील डायनोसॉर (१४५ दशलक्ष ते ६५ दशलक्ष वर्षापूर्वी पर्यंत) अशा तीन टप्प्यातील अवशेष भारतात सापडतात.
भारतात अढळलेल्या डायनोसॉरच्या काही प्रजाती:
भारतात ज्या डायनोसॉरचे जीवाश्म आढळले त्यांची नावे खूपच गमतीशीर आहेत. बृहतकायोसॉरस, दंडकायोसॉरस, जीनोसॉरस, कोटासॉरस, प्रधानिया, जकलापल्लीसॉरस आणि राजासॉरस असे अनेक प्रकारचे डायनोसॉर या उपखंडाच्या जंगलातून फिरत होते. त्यांची नावे अशी चमत्कारिक वाटत असली तरी, त्यामागे काही विशिष्ट कारणे आहेत.
बृहतकायोसॉरस म्हणजे विशाल देहयष्टीची पाल असा याचा अर्थ होतो. डायनोसॉरच्या प्रजातीतील हा सर्वात मोठा डायनोसॉर असावा अशा संशोधकांचा अंदाज आहे. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथे या महाकाय डायनोसॉरचे अवशेष आढळून आले.
जुब्बुलपुरिया नावाचा हा डायनोसॉर शाकाहारी होता. आकाराने आणि वजनाने देखील तो हलका होता. त्याची उंची २ फुट तर लांबी ३ फुट ११ इंच होती.
भारत आणि मादागास्कर प्रदेशात डायनोसॉरचे जे अवशेष आढळून आले त्यांमध्ये प्रचंड साम्य आहे. अगदी त्याकाळी भारत आणि मादागास्कर हा एकच सलग भूप्रदेश होता की काय असे म्हणावे इतपत साम्य या अवशेषांमध्ये आढळून आले आहे.
काही दशलक्ष वर्षांपूर्वी अगदी पाणी, जमीन आणि आकाशातही डायनोसॉरचा वावर होता हे सिद्ध झाले असले तरी, डायनोसॉर सारखी मोठी प्रजाती नेमकी कशामुळे नामशेष झाली याची ठोस करणे आजही शोधता आलेली नाहीत.
पृथ्वीच्या हवामानात झालेल्या मोठमोठ्या बदलांपुढे हे महाकाय प्राणी टिकाव धरू शकले नाहीत ही गोष्ट खरी आहे. सध्या तरी उल्कापात आणि अस्मानी संकटांमुळेच हे महाकाय प्राणी ज्यांनी कधी काळी जगावर आपले अधिराज्य गाजवले ते नामशेष झाल्याचे मानले जाते.
सतत होणारे ज्वालामुखीचे स्फोट, उद्रेक आणि उल्कापात अशा अस्मानी संकटांनी या प्रजातींना गिळंकृत केले असावे असा अंदाज आहे. तर काही शास्त्रज्ञांच्या मते सस्तन प्राण्यांच्या तुलनेत डायनोसॉरचा नष्ट होण्याचा वेग प्रचंड होता, त्यामुळे कालौघात हे प्राणी कधीतरी पृथ्वीवरून नामशेष झालेच असते.
पण, तरीही अशी अस्मानी संकटे पृथ्वीवर कोसळली नसती, तर डायनोसॉर आजही जिवंत असू शकले असते का? असते तर माणसांशी त्यांचा व्यवहार कसा असला असता? आजच्या काळातही हे डायनोसॉर आकाराने तितकेच मोठे असले असते का? आजच्या जगात त्यांचा वावर कसा असला असता? असे अनेक कुतूहल निर्माण करणारे प्रश्न पडतात, हे मात्र नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.