आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लॉकडाऊनमध्ये घरी बसुन कंटाळा येत असेल. या वेळेत काय करावं याचा शोध घेऊनही कंटाळा आला असेल. आपण लॉकडाऊननंतरच्या काळाबद्दल विचार करूया.
एवढा काळ घरात बसल्यानंतर कुठंतरी पुण्याजवळ एक दिवसाच्या सुट्टीवर जावं असाही तुम्ही विचार कराल. पण गर्दी टाळून निखळ निसर्ग अनुभवायला एखाद्या शांत जागेचा शोध घेत असाल तर ही यादी तुमच्यासाठी आहे.
ताम्हिणी घाट
लॉकडाऊन संपेल तोपर्यंत पावसाची चाहूल लागलेली असेल. प्रवासाला बाहेर पडाल तोपर्यंत वातावरणात गारवा आला असेल, निसर्ग हिरवा शालू पांघरून बसला असेल. अशात सगळेच ज्याला पुण्यातलं काश्मीर म्हणता येईल इतकं भन्नाट निसर्ग सौंदर्य असलेला भाग म्हणजे “ताम्हिणी घाट”.
पुण्यापासून 50-55 km गेलात की डोंगरांच्या आड वाहणारे ओढे, मोठं मोठे धबधबे आणि त्याच्या सोबतीला शेजारी असणारे छोटे छोटे कांदा भजी-चहाचे गाडे. हे सगळं टाळून निवांत एखाद्या टेकाडावर जाऊन शांतताही अनुभवता येईल.
कोरीगड
“लोणावळा” म्हटलं की आता गर्दी आठवते. पण लोणावळा सोडून तुम्ही अँबेव्हॅलीच्या रस्त्याला लागलात तर ही गर्दी संपत जाते आणि तिथून पुढे लागतो “कोरीगड”.
गड आहे म्हणून घाबरून जायचं कारण नाही, कारण या किल्ल्याला व्यवस्थित पायऱ्या आहे. लहान मुलंसुद्धा अगदी अर्ध्या तासात किल्ल्यावर व्यवस्थित जाऊ शकतील. किल्ल्यावरून आसपासच्या परिसराचा मस्त नजारा बघायला मिळतो. पर्यटनाच्या निमित्ताने किल्ल्यावरचे अवशेष बघून इतिहासाची काही पानंही अनुभवता येतील.
भाजे लेण्या
कमी गर्दीच्या पर्यटनासाठी लोणावळाही लांब वाटत असेल तर त्याआधीच मळवली नावाचं गाव आहे, जिथं भाजे लेण्या आहेत. इथं तुम्ही लोकलनेही जाऊ शकता. या सातवाहनकालीन म्हणजे 2000 वर्षांपूर्वीच्या लेण्यांमध्ये स्तूप आणि इतर अवशेष तुम्हाला नक्कीच चकित करतील.
इथून लोहगड आणि विसापूर किल्लेही बघायला मिळतील. हा भागसुद्धा नैसर्गिक सौंदर्याने भरलेला आहे. लेण्यांच्या बाजूलाच एक मोठा धबधबाही आहे. वेळ असेल तर हायवेच्या विरुद्ध बाजूला कार्ले लेण्या आणि रेणुका मातेचं मंदिरही तिथून जवळच आहे.
मेणवली
स्वदेस किंवा गंगाजल चित्रपटात तुम्ही ते सुंदर घाट आणि त्याबाजूला असणारे मंदिरं बघितली असतीलच. ही जागासुद्धा पुण्यापासून खूप जवळ आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर या गर्दीच्या ठिकाणाआधीच या रस्त्यावर मेणवली या गावात हा घाट आणि मंदीर आहे.
इथंच एक पेशवेकालीन नाना फडणवीसांचा वाडा बघणं ही उत्तम पर्याय आहे. इथून पुढे गेलात की धोमला नृसिंहाचं अत्यंत वेगळं असं मंदिर आहे. मंदिरासमोर असणाऱ्या कावसाच्या आकाराच्या दगडी नक्षीला बघायला तेवढं अंतर जाणं अगदीच Worth it आहे.
भिलार
जर फार काही बघत फिरण्यात रस नसेल, फक्त एखाद्या निसर्गरम्य जागी जाऊन पुस्तक वाचत आणि चहा/कॉफी घेत बसण्यात रस असणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही जागा उत्तम आहे. पाचगणीजवळ “भिलार” – महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तकांचं गाव आहे, तिथं जाऊन तुम्ही वाटेल ती पुस्तकं तुमच्या आवडीनुसार वाचू शकता. महाबळेश्वर जवळचा थंड वारा घेत दिवस घालवून पाचगणी फिरून परत पुणे गाठू शकता.
भोर
फक्त फिरण्यासाठी गडबड करून पूर्ण दिवस नसेल घालवायचा आणि फक्त एका निवांत रोड ट्रिपला जायचं असेल तर भोरला नक्की जा. भोरला जाताना “कट्यार काळजात घुसली” चित्रपटात दाखवलेला तो नदीचा नेकलेस पॉईंट बघता येईल.
धरण, नद्या, ओढे यांनी भरलेला हा भाग आहे. भोरला पंतसचिवांचा वाडा आहे. सगळ्या ऐतिहासिक चित्रपटांचं शूटिंग इथेच होतं. तो वाडा बघून अर्ध्या दिवसाची ही रोड ट्रिप तुम्ही खेड शिवापुरच्या प्रसिद्ध हॉटल्सवर ताव मारून संपवू शकता.
तुम्हाला या यादीत अजून काही भर घालायची असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, तुम्हाला कुठे जायला आवडेल ते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.