आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तुम्ही इतिहासामध्ये अनेक साम्राज्यांचा उदय आणि अस्ताबद्दल वाचलं असेल. कुठली तरी एखादा महत्त्वाकांक्षी व्यक्ती साम्राज्याचा पाया रचतो. नंतर त्याचे वंशज त्या साम्राज्याचा विस्तार आणि विकास करतात. कालांतरानं या साम्राज्याचा ऱ्हास देखील होतो. हा कालचक्राचा नियमच असतो. पृथ्वीवर अस्तित्वात येणाऱ्या कुठल्याही गोष्टीला उदय, विकास आणि अस्त या तीन प्रक्रियांमधून जावंच लागतं.
सध्या भारतीय क्रिकेटमधील अतिशय मुरलेला खेळाडूदेखील कालचक्राच्या या फेऱ्यामध्ये अडकला आहे. कधीकाळी हुकमी एक्का असलेला हा खेळाडू सध्या आपल्या कारकीर्दीतील सर्वात वाईट फेजमध्ये आहे. इतकं की, त्याला टेस्ट टीममधूनदेखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सध्या एखाद्या ‘शापित राजकुमारा’सारखी या खेळाडूची अवस्था झाली आहे.
अजिंक्य रहाणे, असं या शापित राजकुमाराचं नाव आहे. अजिंक्य रहाणेसाठी समर्थन किंवा सहानुभूती शिल्लक असलेला भारतीय क्रिकेट चाहता शोधणं सध्या अत्यंत कठीण झालं आहे.
२०२१ मध्ये ब्रिस्बेनपासून सुरू झालेला आणि यावर्षी केपटाऊनमध्ये संपलेला क्रिकेट हंगाम टीम इंडियासाठी अविश्वसनीय आणि अजिंक्य रहाणेसाठी विनाशकारी ठरला. घरच्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही दौऱ्यांमध्ये वारंवार अपयशी ठरल्यानंतर अजिंक्य रहाणेला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वगळण्यात आलं. अजिंक्य रहाणेच्या या अधोगतीमागे फक्त एक क्रिकेट हंगाम कारणीभूत आहे का? असा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडणं साहजिक आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला रहाणेच्या क्रिकेट कारकीर्दीचा आढावा घ्यावा लागेल…
बदलत्या काळासोबत भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहरादेखील बदलला आहे. टॅटू केलेले हात, जेल लावलेले केस, पेरोक्साईड हायलाइट्स आणि अनेक आधुनिक गोष्टींनी भरलेली ड्रेसिंग रूम या सर्व बाबी भारतीय क्रिकेटमधील तेंडुलकरोत्तर युगाची व्याख्या करण्यास पुरेशा ठरतात. भारतीय क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममधील या सर्व गोष्टींपासून शांत आणि सुस्वभावी अजिंक्य रहाणे कितीतरी दूर होता. मुंबईतील डोंबिवली उपनगरात मध्यमवर्गीय पालकांच्या पोटी अजिंक्य रहाणेचा जन्म झाला.
आदर्श पालकांप्रमाणं त्याच्या आई-वडिलांनी रहाणेच्या क्रिकेट आवडीला पूर्ण पाठिंबा दिला. संसाधनांच्या कमतरतेमुळं रहाणेने डोंबिवलीतील मॅट विकेटवर क्रिकेटची दीक्षा घेतली. त्यानंतर वयाच्या १७व्या वर्षी प्रवीण अमरे यांच्याकडं त्यानं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. शांत पण स्वच्छंदी असलेल्या या मुलानं क्रिकेटला धर्मच समजलं आणि त्यातच तो पुढे गेला.
ज्युनियर क्रिकेट आणि रणजी ट्रॉफीमध्येही त्यानं उत्कृष्ट कामगिरी केली. रणजी कारकीर्दीतील दुसऱ्या सिझनमध्ये १ हजार ८९ धावा करून त्यानं निवड समितीचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली होती. मात्र, तरीदेखील ‘द ग्रेट इंडियन बॅटिंग लाईनअप’मध्ये त्याला जागा मिळाली नाही. त्यानं रणजी क्रिकेटमध्येच आपला खेळ सुरू ठेवला. सतत शतके झळकाऊन त्यानं अनेक जुने विक्रम मोडीत काढले.
रहाणेमध्ये आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा सामना करण्याची क्षमता होती. दुलीप करंडक स्पर्धेत लियाम प्लंकेट आणि ग्रॅहम ओनियन्ससारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सामना करून त्यानं ही क्षमता सिद्ध करून दाखवली. ऑस्ट्रेलियातील उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेत दोन शतकं ठोकताना रहाणेनं निर्विवाद पराक्रमाची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यानं प्रतिकूल परिस्थितीत आपली योग्यता सिद्ध केली.
ऑस्ट्रेलियातील त्याच्या अतुलनीय कामगिरीनंतर, खऱ्या अर्थानं सिलेक्टर्सच्या रडारवर आला. ऑगस्ट २०११ मध्ये, इंग्लंडमधील कसोटी मालिकेत ०-४ ने पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ निराशेच्या गर्तेत सापडला होता. अनेक प्रमुख खेळाडू फॉर्ममध्ये नव्हते. त्यात दुखापतींचीही भर होतीच. अशा परिस्थितीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेला पाठवण्यात आलं. त्यानं देखील स्टँड-इन ओपनर म्हणून लगेच प्रतिसाद दिला आणि टी ट्वेंटी पदार्पणात ६१ आणि वनडे पदार्पणात ४० धावा केल्या.
त्यानंतर मात्र त्याला पुन्हा काही दिवस बेंचवर बसावं लागलं. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गजांच्या निवृत्तीनंतर, भारतीय निवडकर्त्यांनी तरुणांना संधी देण्यास सुरुवात केली. शिखर धवनच्या दुखापतीमुळं अखेर रहाणेला भारतीय कसोटी क्रिकेटमधील २७८ क्रमांकाची कॅप मिळाली.
मार्च २०१३ मध्ये भारतानं ऑस्ट्रेलियन संघांसाठी यजमानपद भूषवलं होतं. दिल्लीतील चौथ्या कसोटी सामन्यात मुंबईकर अजिंक्यचं पदार्पण झालं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नावावर असलेला अजिंक्य पदार्पणाच्या कसोटीतील दोन्ही डावात भयंकर अपयशी ठरला होता. त्यानंतरच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कर्णधार एमएस धोनीनं सहा फलंदाजांसह जाण्याचा निर्णय घेतला आणि अजिंक्य रहाणेला सहाव्या क्रमांकासाठी प्रवेश मिळाला.
या मालिकेतील ४७, ५१ आणि नाबाद ९६ या खेळींमुळं २०१४ च्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यासाठी रहाणेचं स्थान निश्चित झालं. तिथे त्यानं वेलिंग्टनमध्ये पहिलं कसोटी शतक झळकावलं. त्यानंतर टीम इंडियासाठी इंग्लंड हे पुढचं डेस्टिनेशन होतं. तिथे लॉर्ड्सच्या हिरव्यागार कुरणात त्यानं १०३ धावांच्या दमदार खेळीनं पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली.
२०१४च्या शेवटी भारतीय संघ प्रदीर्घ दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला. रहाणेच्या दृष्टिकोनातून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा होता. कारण, सर्व फॉरमॅटमध्ये संघात कायमस्वरूपी स्थान मिळवण्याची ही त्याची शेवटची संधी होती. त्यानं ॲडिलेडमध्ये ६२, ब्रिस्बेनमध्ये ८१ आणि एमसीजी येथे १७१ चेंडूत १४७ धावांची खेळी करत ५७च्या शानदार सरासरीनं एकूण ३९९ धावा केल्या.
२०१४-१५मधील भारताचे दौरे संपल्यानंतर, विराट कोहली, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे हे त्रिकूट कठीण परिस्थितीत कामगिरी करणारे सर्वोत्तम खेळाडू म्हणून उदयास आले. त्यानंतर अजिंक्य रहाणेचं भारतीय कसोटी संघातील स्थान एकदम पक्कं झालं.
मध्यंतरीची काही वर्षे रहाणेसाठी सर्वकाही एकदम सुरुळीत सुरू होतं. मात्र, २०१७ च्या शेवटी गोष्टी बिघडण्यास सुरुवात झाली. २०१७ च्या शेवटी, श्रीलंकेने तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचा दौरा केला. तो रहाणेच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वांत वाईट टप्पा होता. तीन सामन्यांमध्ये त्याचे स्कोअर ४, ०, २, १ आणि १० असे होते. याचा परिणाम म्हणून नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांतून त्याला वगळण्यात आलं. उर्वरित २०१८ देखील त्याच्यासाठी संमिश्र राहिलं.
दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या फॉर्मची पर्वा न करता त्याच्या हाती कसोटी उपकर्णधारपद सोपवण्यात आलं. विराट कोहलीच्या गैरहजेरीत त्याला जी काही संधी मिळाली त्यात त्याने चांगलीच प्रतिष्ठा मिळवली. मात्र, एक बॅटर म्हणून त्याच्या खेळामध्ये सतत काहीतरी कमीपणा जाणवत होता.
२०१९ मध्ये, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू झाल्यानंतर रहाणेनं आपला फॉर्म पुन्हा मिळवला. रहाणेनं पहिल्या डब्ल्यूटीसी सायकलमध्ये विंडीज आणि प्रोटीयाजविरुद्ध काही शतकी खेळी केल्यानंतर बॅटिंग चार्टमध्ये अव्वल स्थानावर गेला.
२०२१ पुन्हा रहाणे आऊट ऑफ फॉर्म गेला. साउथॅम्प्टनमधील डब्ल्यूटीसी फायनल हे त्याच्या ‘डाऊनफॉल’चं उत्कृष्ट उदाहरण होतं. त्यानंतर झालेल्या इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्येदेखील त्याला सूर गवसला नाही. श्रीलंकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतून देखील त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.