आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
माणसाच्या भौतिक प्रगतीमुळे आज पृथ्वीवर प्रदूषण आणि हवामान बदल होत आहेत. पण काही प्रदूषण आणि हवामान बदल यांच्यासोबत अजून एक समस्या समोर आली आहे ती म्हणजे वाळवंटीकरणाची. सध्या मध्यपूर्वेतील दुबई हे शहर या वाळवंटीकरणामुळे हैराण झालं आहे. तर आता वाळवंटीकरण म्हणजे काय? ते कशामुळे होतं? त्यामुळे निसर्गावर आणि माणसावर काय परिणाम होतो? दुबईमध्ये होत असलेल्या वाळवंटीकरणामुळे तिथे काय परिणाम होत आहेत? हे आज जाणून घेऊया.
वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील अतिकोरडा आणि अतिशय कमी पर्जन्यमान असलेला प्रदेश. या प्रदेशात वनस्पती आणि प्राणिजीवन अत्यंत विरळ असते. सामान्यपणे शुष्क, ओसाड, वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले, तरी तांत्रिकदृष्ट्या वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो. उष्ण वाळवंटी प्रदेशांनी पृथ्वीच्या भूभागापैकी १८ टक्के तर थंड वाळवंटांनी १६ टक्के भाग व्यापला आहे.
अर्ध शुष्क हवामान असलेलं क्षेत्र जिथे हंगामी दुष्काळ आहे आणि जिथे सतत कमी पाऊस पडतो अशा ठिकाणी जमिनीची भरपूर धूप होते व यामुळे वाळवंटीकरण होते. जलसंपत्तीचे बेजबाबदारपणे शोषण केल्यामुळे ही जमिनीची पोत बिघडते व त्यामुळे वाळवंटीकरण होते.
या वाळवंटीकरणामुळे प्राणी, वनस्पती, सुपीक माती आणि भिन्न परिसंस्थांचे नुकसान होते. उत्पादक जमीन गमावल्यामुळे माणसाचे आणि जैवविविधतेचे देखील नुकसान होते. वाळवंटीकरणामुळे कृषी उत्पादनात घट होते, अन्न सुरक्षेची समस्या निर्माण होते व यामुळे दुष्काळी भागात लोकांची उपासमार होते.
दुबई हे शहर संयुक्त अरब अमीरातीमध्ये स्थित आहे. जर ५० वर्षांपूर्वी जर तुम्ही दुबई पाहिलं असतं तर तिथली परिस्थिती फार भीषण होती. जिथे दिसेल तिथे वाळवंट, तिथे ना पाणी होतं ना सुपीक जमीन. पण निसर्गाने संयुक्त अरब इमीरातीला तेलाच्या विहिरींचं वरदान दिलं आहे. जवळपास जगातील सर्व देशांत दुबईमध्ये उत्पादन केलेलं तेल निर्यात होतं. या तेलाच्या व्यापारावर आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे हे शहर जगातील श्रीमंत आणि प्रगत शहर म्हणून ओळखला जाते.
पण एवढी सगळी भौतिक प्रगती साध्य करून देखील या शहरावर वाळवंटीकरणाचे संकट कायम आहेच. वाळवंटीकरणामुळे दुबई आणि त्याच्या आसपास असलेली सुपीक जमीन आता धोक्यात येऊ लागली आहे. संयुक्त अरब इमीरातीचा आकार पोर्तुगाल देशाएवढा आहे आणि या देशात ८० टक्के जमीन ही वाळवंट आहे. झटपट होत असलेली प्रगती, त्यामुळे होणारी लोकसंख्या वाढ यामुळे दुबईच्या धान्यसाठ्यावर ताण येत आहे. त्यात दिवसेंदिवस होणाऱ्या वाळवंटीकरणामुळे आहे ती सुपीक जमिनीचं रूपांतर वाळवंटात होत आहे त्यामुळे दुबई समोर अन्न सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे.
तेलाचा व्यापार करून आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अल्पावधीतच दुबई हे जगातील श्रीमंत व प्रगत शहर बनलं. पण दुबईतील सरकारला हे चांगलच ठाऊक आहे की त्यांची ही प्रगती फक्त तेल उत्पादनावर अवलंबून आहे व ती जास्त काळ टिकणारी नाही.
संयुक्त अरब अमिरातीचा ८० टक्के भाग हा वाळवंट असल्याने त्यांना अन्न धान्य आयात करावं लागतं पण जस जशी दुबईची लोकसंख्या वाढत जाईल हे अन्न धान्य आयात करण्याचे सरकारचे धोरण त्यांचा काही कामी येणार नाही. हे वास्तव ओळखून दुबई सरकारने अन्न धान्य निर्मिती करण्याबाबत आत्मनिर्भर व्हायचं असं ठरवलं आहे. यासाठी ते प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त अन्न धान्य निर्माण कसं करता येईल यावर ते काम करणार आहेत.
आता दुबईमधील वाळवंटीकरण थांबवायचं म्हणजे वाळवंट काबीज न करता, वाळवंटीकरणामुळे नापीक झालेली जमीन परत सुपीक कशी होईल या करता प्रयत्न तिथलं सरकार करत आहे.
वाळवंटीकरण थांबवणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आणि जेव्हा ते दुबईसारखं वाळवंटी ठिकाण असेल तर आजिबात सोपं नाही. आता तुम्ही म्हणाल की वाळवंटीकरण थांबवणं भरपूर सोपं आहे झाडे लावा आणि ती जगवा त्यामुळे वाळवंटीकरण होणार नाही. पण तुम्ही हा विचार केला का की दुबई हा वाळवंटी प्रदेश आहे तिथलं तापमान हे नेहमी ४०℃ पेक्षा जास्त असतं त्यात कुठेही जमीन नाही सगळीकडे नुसती वाळू अशा वातावरणात तुम्ही काय झाडं लावणार आणि ती जगवणार?
या समस्येवर ही तिथल्या सरकारने उपाय शोधून काढला आहे, ते तिथे अशा झाडांची लागवड करत आहेत ज्या तिथल्या वातावरणात आणि जमिनीत तग धरतील. वाळवंटीकरणाचा विस्तार होऊ नये व जमीन सुपीक रहावी या करता तिथल्या सरकारने “Liquid Natural Clay Nanoparticles” नावाचं तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं आहे.
या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नापीक जमीन सुपीक होण्यास मदत होते. या तंत्रज्ञानामुळे जमीन नुसती सुपीक न होता त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही प्रचंड वाढते. दुबई म्हणजे एकीकडे वाळवंट तर दुसरीकडे समुद्र. त्यामुळे तिथे पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोतांचा अभाव आहे. दुबईमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी जल शुद्धीकरण प्रकल्प वापरले जातात. पण समुद्राचं पाणी तुम्ही कितीही शुद्ध केलं तरीही त्यात काही प्रमाणात क्षार राहणारच. हे क्षारयुक्त पाणी तुम्ही शेती किंवा वृक्ष लागवडीसाठी वापरू शकत नाही पण Liquid Natural Clay Nanoparticles हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे हे क्षार युक्त पाणी शेती साठी वापरलं जाऊ शकतं व त्यामुळे जमीनीचं नुकसानही होत नाही.
आज जीवन आणि रोजगार यांचा मूलभूत आधार म्हणजे जमीन. वाळवंटीकरणाची समस्या समोर असताना वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी जमिनीची उत्पादकता वाढवणे, मानवाच्या जीवनशैलीत बदल करणे, नैसर्गिक साधन संपत्तीचा गरजेपुरता वापर करणे ही काळाची गरज आहे. आज भौतिक प्रगती व पर्यावरणाचा समतोल राखणे ही सर्व मानव जातीची एकत्रित जबाबदारी आहे. ही आपली सुंदर सृष्टी पुढील पिढ्यांच्या हाती तशीच सुंदररित्या सोपवणे हे आपले कर्तव्य आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.