आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाल्यानंतर आजही कित्येक महिला ”चूल आणि मुल” या चाकोरीच्या बाहेर पडलेल्या नाहीत. त्यांना स्वतःच्या विशेषाधिकारांची आजही जाणीव नाही. स्त्री सबलीकरण वगैरे चळवळींच्या माध्यमातून आज स्त्रियांना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्या तरी, ग्रामीण भागातील स्त्रियांपर्यंत अजूनही विकासाची ही गंगोत्री म्हणावी त्याप्रमाणात पोहचलेली नाही.
पण, महिलांच्या उद्धारासाठी, त्यांना त्यांचे विशेषाधिकार मिळावेत म्हणून आणि एकूणच समाजातील स्त्रीविषयक समस्यांवर ह*ल्ला बोलणारे कित्येक समाजसुधारक आपल्या देशात होऊन गेलेत. ब्रिटिशांच्या विरोधातील स्वातंत्र्याची लढाई असो की स्त्रियांना अमानुष वागणूक देणाऱ्या रूढी-परंपरा यांच्या विरोधातील लढाई असो, कित्येक धुरंधर स्त्रियांनी या कामी आपले योगदान दिले आहे.
महात्मा फुले, राजाराममोहन राय, महर्षी कर्वे, इत्यादी समाजसुधारकांच्या कार्यामुळे स्त्रियांच्या सामाजिक जीवनात अमुलाग्र क्रांती घडून आली.
स्त्रीमुक्ती आणि स्वातंत्र्य या ध्येयाने प्रेरित झालेल्या एका पारसी कुटुंबाने मात्र स्त्री-मुक्तीच्या कार्याला स्वतःच्या घरातुनच सुरुवात केली. मुंबईत स्वतःची टेक्स्टाईल मिल चालवणारे अर्देशीर टाटा आणि महिला हक्कांसाठी कार्य करत असलेल्या हेराबाई टाटा यांच्या घरी १८९८ साली एका कन्यारत्नाचा जन्म झाला. तिचे नाव त्यांनी मिथन असे ठेवले. त्यांनी आपल्या या लेकीच्या शिक्षणाला भरपूर प्रोत्साहन दिले.
एलफिस्टन स्कूलसारख्या नामांकित आणि प्रतिष्ठित शाळेतून तिचे शिक्षण पूर्ण झाले. मिथन टाटाने एलफिस्टन कॉलेज मधून अर्थशास्त्र या विषयातील पदवी पूर्ण केली आणि सन्मानाचे समजले जाणारे कॉब्डन क्लब मेडल पटकावले. स्वतः हेराबाई महीलांना योग्य ते अधिकार मिळण्यासाठी कार्यरत असल्याने साहजिकच मिथनवर स्वतंत्र आणि आधुनिक विचारांचे संस्कार झाले होते.
त्यांचे वडील अर्देशीरदेखील उदारमतवादी विचारांचे होते. दोघींच्या वैचारिक कार्यात त्यांनी कधीच अडथळे आणले नाही. उलट त्यांनी मिथनला तिच्या कामासाठी आणि शिक्षणासाठीही सदोदित प्रोत्साहन दिले. भारतातील स्त्रियांची स्थिती सुधारावी म्हणून हेराबाई सातत्याने प्रयत्न करत होत्या.
१९१५ साली त्यांना भारतीय महिला संघटनेच्या सचिवपदी नेमण्यात आले होते.
१९१९ साली हेराबाई यांनी आपली कन्या मिथनसोबत ब्रिटनवारी केली. ब्रिटनमध्ये तेव्हा महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढा सुरु होता. भारतातील स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, इतर देशातील स्त्रियांच्या तुलनेत भारतीय स्त्रियांनी तसूभरही मागे रहाता कामा नये, या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी भारतातदेखील भारतीय स्त्रियांनासुद्धा मतदानाचा अधिकार मिळायला हवा यासाठी जोर धरला.
याचवेळी अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू यांसारख्या स्त्रियासुद्धा स्वातंत्र्य चळवळीसोबतच स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देत होत्या. विशेषतः स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे, याबद्दल मिथन खूपच सतर्क आणि आग्रही होत्या. याचवेळी त्यांची ओळख राजकुमारी सोफिया अलेक्झांड्रा ड्युलीप सिंग यांच्याशी झाली. त्या महिलांच्या सामाजिक आणि राजकीय संघटनेचे कार्य करत होत्या.
दोघींनी मिळून ब्रिटीश कौन्सिलमध्ये भारतीय महिलांच्या दयनीय अवस्थेबद्दल आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून एक निवेदन दाखल केले. इतकेच नाही तर, त्यांनी यासाठी साउथ ब्युरो कमिटीसमोर साक्षही दिली.
१९२१ साली मद्रास प्रांतात स्त्रियांना मतदानाचे अधिकार देण्यात आले. त्यांच्या लढ्यातील हे पहिले यश होते.
भारतीय इतिहासात अशा अनेक महिला शासक होऊन गेल्या ज्यांनी उत्कृष्ट राज्यकारभार तर केलाच पण, राज्याच्या सीमा विस्तारासाठी प्रसंगी यु*द्धातही सहभाग घेतला. भारतीय महिलांचा हा पराक्रमी इतिहास लक्षात घेता निश्चितच त्यांना मतदानाचा विशेषाधिकार मिळायला हवेत, अशी आग्रही मांडणी त्या आपल्या लेखणीतून करत होत्या.
पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिथन बॅरीस्टरचे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथेच राहिल्या. लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी बार साठी तयारी सुरु केली. बॉम्बे वूमन्स कमिटी ऑफ सोशिअल वर्कर्स, यांच्या वतीने मिथन यांची इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या अभ्यास दौऱ्यावर निवड झाली. तिथे त्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळणे का आणि कसे आवश्यक आहे याबाबत आपले विचार व्यक्त केले.
बॅरीस्टरची पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
जानेवारी १९२३ मध्ये मिथन टाटा या पहिल्या भारतीय महिला होत्या ज्या बारवर कार्यरत होत्या आणि पहिल्या महिला बॅरीस्टरदेखील.
१९२४ साली भारतात परत आल्यावर, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरु केली. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज ऑफ इंडियामध्ये त्यांनी काही काळ प्रोफेसर म्हणूनही काम केले.
तीन वर्षानंतर त्यांना १८६५ साली स्थापन करण्यात आलेल्या पारसी मॅरेज अँड डिव्होर्स अॅक्ट समितीवर नेमण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयातील त्या पहिल्या महिला शेरीफ होत्या.
१९४७ साली पाकिस्तानातून मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या निर्वासितांसाठी नेमलेल्या समितीचे प्रमुखपद त्यांना देण्यात आले. १९६१-६२ या दरम्यान त्यांची ऑल इंडिया वूमन कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. स्त्रियांच्या परिस्थितीविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी आणि त्यांच्या शिक्षणाचे महत्व लोकांना पटावे या उद्देशाने त्यांनी काही काळ मासिकातून लेखन देखील केले.
१९३३ साली त्यांचा विवाह जमशेद सोराब लाम यांच्याशी झाला. ते पेशाने वकील आणि नोटरी होते. मिथन टाटा लग्नानंतरही महिला संघटनाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिल्या. मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प सारख्या झोपडपट्टीतही त्यांनी महिलांच्या समस्येवर काम केले.
त्यांची राष्ट्रनिष्ठा आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान याची दाखल घेऊन भारत सरकारने त्यांना १९६२ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. मुंबई उच्च न्यायालयात काम करत असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.
त्या लिहितात, “मी म्हणजे एखादा प्राणीसंग्रहालयातील प्राणी आहे आणि पर्यटक माझ्याकडे दुरूनच पाहतात, अर्थात याआधी कुणा महिलेने वकील म्हणून काम केलेले नाही अशी काम करणारी मी पहिलीच स्त्री असल्याने हे अडाणी लोक अगदी डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत राहतात.”
वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. के. आर. कर्मा ओरिएन्टल इन्स्टिट्यूटने ऑटम लीव्हज नावाने त्यांची आत्मकथा प्रकाशित केली आहे, ज्यात त्यांचे संपूर्ण चरित्र वाचायला मिळेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.