आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या. त्यात त्यांचे आणि श्रीलंकेचे संबंध तर कायमच चर्चेत राहिले. त्यांची परराष्ट्रीय धोरणे श्रीलंकेतील तामिळ रहिवाशांच्या विरोधात असल्याने त्यांना तामिळ संघटनांकडून कायमच विरोध झाला होता.
अशात १ मे १९९१ रोजी तामिळनाडूमध्ये घडणवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात राजीव यांचा जागीच मृत्यू झाला. हे हत्याकांड जगभरात गाजलं. या हत्याकांडामागे ‘लिट्टे’ या तामिळ बंडखोर संघटनेचा हात होता. ही संघटना श्रीलंका सरकारच्या विरोधात आपल्या मागण्यांसाठी लढत होती आणि श्रीलंका सरकारच्या दृष्टीने हे लोक देशद्रोही होते.
‘लिट्टे’ला भारत सरकारकडून सक्षम पाठिंब्याची गरज होती पण तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी मात्र श्रीलंकन सरकारकडे मैत्रीचा हात पुढे केल्याने ‘लिट्टे’ने हे हत्याकांड घडवून आणलं. पण आश्चर्याची बाब अशी की, या हत्याकांडाच्या चारच वर्षांपूर्वी म्हणजेच १९८७मध्ये राजीव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि तोही श्रीलंकेतल्या एका देशभक्ताकडून!
३० जुलै १९८७ रोजी राजीव गांधींवर जीवघेणा हल्ला करणारा हा हल्लेखोर आज श्रीलंकेमध्ये सीडी आणि कॅसेट्सचा विक्रेता आहे. आजच्या घडीला कोलंबोमध्ये व्हिडीओ पार्लर चालवणारा विजीथ रोहाना विजेमुनी हा पूर्वी श्रीलंकेच्या सैन्यदलात होता. राजीव गांधींवर हल्ला केल्यानंतर त्याला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं. विजीथ हा मूळचा श्रीलंकेच्या दक्षिणेकडे असलेल्या गाले राज्याचा रहिवासी होता. आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने नौदलात भरती होण्याचं ठरवलं. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परीक्षांमधून तो उत्तीर्ण होऊन रेडीओमन या पदावर नियुक्त झाला. त्यानंतर त्याची बदली एलारा या युद्धनौकेवर करण्यात आली. ही युद्धनौका १९८७च्या जूनमध्ये उत्तर श्रीलंकेतील तामिळ बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी राबवलेल्या ‘वडंमरच्छी ऑपरेशन’साठी वापरण्यात आली होती.
मे आणि जून १९८७मध्ये श्रीलंकेच्या उत्तरेकडे असलेल्या जाफना द्वीपकल्पावर श्रीलंकन सैन्याकडून ‘वडंमरच्छी ऑपरेशन’ राबवण्यात आले आणि श्रीलंका विरुद्ध ‘लिट्टे’ युद्धाला तोंड फुटलं. श्रीलंकेतील हे त्याकाळचं सगळ्यात मोठं युद्ध मानलं जातं. श्रीलंकेकडून जवळपास ८०००हून अधिक सैनिकांची फौज या लढाईत उतरली होती तर ‘लिट्टे’कडे अवघ्या १२०० जणांचं सैन्य होतं. श्रीलंकेची तयारी आणि अमाप फौजफाटा पाहता ‘लिट्टे’चा पराभव हा ठरलेलाच होता. हे युद्ध आपल्या संघटनेसाठी शेवटचं युद्ध ठरणार याची भीती मनात जोम धरू लागल्यावर ‘लिट्टे’ने तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकरवी भारताच्या केंद्र सरकारकडे मदत मागितली.
वास्तविक भारत सरकारने नोव्हेंबर १९८६मध्येच आपल्या देशातील ‘लिट्टे’ ची कारस्थाने मोडून काढली होती आणि त्याचबरोबर श्रीलंकेलाही ‘लिट्टे’विरोधात कारवाया कमी करण्यासाठी सूचनाही दिल्या होत्या. यानंतर ‘लिट्टे’ला मदत करणे म्हणजे श्रीलंकेशी अकारण अघोषित युद्ध पुकारण्यासारखंच होतं आणि केंद्र सरकारचा याला नकार होता. पण तामिळनाडूतील सत्ताकारणाचा विचार करता सत्ताधारी पक्षासाठी हीच सुवर्णसंधी ठरत होती. अखेर ‘सत्तेसाठी सारं काही’ला अनुसरून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘लिट्टे’ला मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी त्यांनी नागरी सुरक्षेचं कारण देऊन श्रीलंकन सरकारला हे युद्ध थांबवायला सांगितलं.
श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ज्युनियस जयवर्धने यांना भारताचा हा हस्तक्षेप न पटल्याने त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी श्रीलंकेत याविरोधात जोरदार निदर्शने केली. पण भारताने या निदर्शनांकडे लक्ष न देता सरळ युद्धाची धमकी दिली. भारताच्या या आक्रमक धोरणामुळे श्रीलंकेला नमतं घ्यावं लागलं आणि ही लढाई थांबवण्याचे आदेश देण्यात आले.
प्रचंड नाखुशीने श्रीलंकन सेना या मोहिमेवरून परतली. २९ जुलै १९८७ रोजी श्रीलंकेमध्ये जयवर्धने आणि राजीव यांच्या उपस्थितीत ‘भारत-श्रीलंका करारनामा’ मांडण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजनैतिक शिष्टाचारांचा भाग म्हणून राजीव यांना ‘गार्ड ऑफ हॉनर’ देण्याचा समारंभ आयोजित केला गेला. या समारंभाची जबाबदारी लेफ्टनंट मेंडीस यांच्यावर सोपवण्यात आली.
पंतप्रधानांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यासाठी नियुक्त केल्या गेलेल्या रायफलधारी सैनिकांमध्ये विजीथ रोहानाचाही समावेश होता. आपले सर्व देशबांधव आणि सैनिकांसारखाच विजीथच्या मनामध्येही भारत सरकारच्या हस्तक्षेपाबद्द्ल प्रचंड राग साचला होता आणि हा राग बाहेर काढण्यासाठी विजीथ या समारंभाची वाट पाहत होता. आपण जे करायला जात आहोत, त्याचे परिणाम भयंकर असल्याचं त्याला पुरतं ठाऊक होतं पण त्याच्या देशभक्तीपुढे इतर सर्वच शिक्षा त्याच्यासाठी गौण ठरत होत्या.
आपल्या मनाशी ठाम निश्चय करूनच तो या समारंभात सहभागी झाला. यावेळी राजीव यांच्यासोबत श्रीलंकेचे अर्थमंत्री रॉनी डी मेल, लेफ्टनंट मेंडीस आणि काही श्रीलंकन सुरक्षारक्षक होते.
समारंभ सुरु झाल्यावर जेव्हा राजीव विजीथसमोरून जाऊ लागले, तेव्हा त्याने हातातल्या रायफलने त्यांच्या मानेवर प्रहार करायचा प्रयत्न केला. राजीव यांनी चपळाईने तो वार चुकवला आणि रायफलचा जोरदार फटका बसण्यापासून ते थोडक्यात वाचले. मेंडीस आणि इतर सैनिकांनी प्रसंगावधान दाखवत विजीथवर नियंत्रण मिळवले आणि त्याची रवानगी सीआयडीच्या कस्टडीत केली गेली. त्यानंतर त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पण अडीच वर्षांतच त्याची ही शिक्षा माफ करण्यात आली.
तुरुंगातून सुटल्यावर विजीथने उदरनिर्वाहासाठी कोलंबो येथे एक व्हीडीओ पार्लर सुरु केलं. त्याचबरोबर तो ज्योतिषशास्त्रातही पारंगत असल्याने त्याने जोडधंदा म्हणून ज्योतिषी सुरु केली. त्याच्या वादग्रस्त भाकीतांमुळे तो कायमच चर्चेत राहिला. मध्यंतरी, त्याने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल श्रीसेना यांच्या हत्याकांडाबाबत वर्तवलेल्या भाकीतामुळे त्याला पुन्हा एकदा जेलची हवा खावी लागली होती. इतकंच नव्हे तर २००० साली त्याने एक निवडणूकही लढवली होती.
राजीव गांधींवर केलेल्या हल्ल्याबद्दल विचारणा केल्यावर तो आजही आपल्या कृतीचं समर्थन करताना दिसतो. आजही कुणी श्रीलंकेच्या अंतर्गत मामल्यांमध्ये हस्तक्षेप केलाच तर माझ्याशी गाठ आहे, असं तो निक्षून सांगतो. त्या हल्ल्याबाबत आणि त्यानंतर झालेल्या शिक्षेबाबत सांगताना त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही दिसत नाही. दिसते ती फक्त आणि फक्त प्रखर देशभक्ती!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.