आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
काळी जादू किंवा भुताटकीच्या गोष्टी भाकडकथा किंवा चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच ऐकायला भेटतात. भानगढसारखी काही ठिकाणे या घटनांसाठी प्रसिद्धही आहेत. सगळे गावच एका रात्रीत गुडूप झाल्याची घटना भानगढला घडल्याचे सांगतात. असेच एक गाव आसाम राज्यात आहे जिथल्या जंगलात तब्बल १ लाख मुघल सैन्य गुडूप झाले होते. विश्वास नाही बसत ना.? पण या घटनेचा उल्लेख अगदी आलमगिरनामा या जीवनचरित्रपर पुस्तकात आढळतो.
या अजब गावाचे नाव आहे – मायोंग.
आसाम राज्यातील मोरीगाव जिल्ह्यात वसलेले हे गाव भारतातील भुताटकीच्या राजधानीचे शहर म्हणून आजही ओळखले जाते.
लोकांचे अचानक गायब होणे, माणसांचे राक्षसांत रुपांतर होणे, बाहुल्या आणि सापळ्यातुन रक्त निघणे अशा कोणत्याही तथ्यात न बसणाऱ्या घटना इथे घडतात. याचा अगदी ठोस पुरावा नसला तरीही मायोंगच्या रहिवाशांनी इथे काही विचित्र घटना घडताना बघितल्या आहेत.
१३३७ साली जेव्हा १ लाख घोडेस्वार घेऊन मोहम्मद शाह अहोम राज्य बळकावण्यास आला होता तेव्हा हे सर्व घोडेस्वार मायोंगच्या जंगलात गुडूप झाले होते.
यानंतर त्यांचा कसलाही मागमुस लागलेला नाही असे येथील रहिवाशी सांगतात. ही गोष्ट औरंगजेबाच्या पहिल्या १० वर्षाच्या राज्यकर्ता म्हणुन कारकीर्दीची नोंद असलेल्या आलमगीर नामा या पुस्तकातही आहे. तेथील शत्रुपेक्षा भुताटकीची जास्त भिती मुघलांना होती असे म्हटले जाते.
या गावाचे नाव अगदी महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्येही आढळते ही बाबसुद्धा या गावाच्या विचित्र इतिहासाबद्दल अजुन कुतुहल निर्माण करते. आता या गावात अगदी मोजके भुताटकी करणारे मांत्रिक उरले असून आजही काळी जादू इथे अस्तित्वात आहे असे मानले जाते.
मायोंग गावाचे नेमके स्थान आहे आसामची राजधानी गुवाहाटीपासुन ४० किमी अंतरावर. या गावाच्या नावाची उत्पत्ती अनेक वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते. त्यातील एक म्हणजे मायोंग नाव येते ते ‘मा-अंगा’ जिथे ‘मा-आई’तर ‘अंगा-शरीराचा भाग’. हा शरीराचा भाग म्हणजेच योनी असे म्हटले जाते. कामाख्या देवीची कुस म्हणून या गावाचे नाव पडल्याचे म्हटले जाते. गर्भधारणा करु शकणारी एकमेव हिंदू देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामाख्या देवीचे मंदीरही इथे आहे.
काहींच्या मते हे नाव ‘माया’ या संस्कृत शब्दापासून आले आहे. ज्याचा अर्थ होतो ‘आभास’. बाकीच्यांच्या मते हे नाव ‘मियोंग’ म्हणजेच ‘दिमासा’ भाषेत हत्ती या शब्दापासून आले आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या बघायला जावे तर मायोंग ही मायोंग घराण्याची राजधानी होती. मायोंगवरुन आलेल्या कचारी राजाने या राज्याची स्थापना केली. १६२४ साली राजधानीची स्थापना करण्यात आली. सुन्यत सिंघ हा मायोंगचा पहिला राजा म्हणुन ओळखला जातो.
मायोंगचा उल्लेख महाभारतातही आढळतो.
भीमाचा मुलगा घटोत्कच याने मायोंगमधून विविध दैवी शक्ती प्राप्त करुनच महाभारताच्या यु*द्धात सहभाग घेतला होता.
पीसी सरकार हे प्रसिध्द जादूगारसुध्दा मायोंगमधे काही जादू सापडतेय का हे शोधण्यासाठी आले होते.
मुघलांना या गावच्या भुताटकीची वाटणारी भिती इतिहासकार ‘मिर्झा महम्मद काजीम’ याने ‘आलमगिरनामा’मध्ये स्पष्टपणे मांडली आहे. औरंगजेबाने जेव्हा मुघल सरदार ‘राजा राम सिंघ’ याला ‘अहोम’राज्यावर चालून जाण्यास सांगितले तेव्हा तो इथल्या भुताटकीच्या गोष्टी ऐकुन घाबरल्याचा उल्लेख आलमगिरनामामध्ये आढळतो. चालून आल्यावरही राजा राम सिंघचा अगदी दारुण पराभव झाला होता असे या पुस्तकात लिहिले आहे. ‘सराईघाटचे यु*द्ध’ म्हणुन ओळखले गेलेली ही लढाई अगदी एकतर्फी होती असा उल्लेख काजीमने या पुस्तकात केला आहे.
एक रंजक बाब म्हणजे गावच्या या विचित्र भुताटकीच्या घटनांचा नेमका स्त्रोत कोणालाही माहीत नाही. पण तरीही काळी जादू आणि भुताटकीची ही कला पिढ्यानपिढ्या पुढे सुपूर्द करण्यात आली आहे. या कलेची उपासना करणारया व्यक्तींना “बेज” किंवा “ओजा” असे म्हटले जाते. भुतांना आवाहन करण्यासाठी, तसेच लोकांना त्यांच्या आजारातून मुक्त करण्यासाठी हे लोक आपल्या कलेचा वापर करतात. बाहुल्यांच्या मदतीने एखाद्याचा खू*नही करता येतो असा या लोकांचा विश्वास आहे.
तसेच नुकत्याच केलेल्या उत्खननानुसार ‘नर*बळी’सुद्धा दिले जात होते असे आढळून आले आहे. विविध काळ्या शक्ती मिळवण्यासाठी माणसांचा बळी दिला जात असे ही बाब उघडकीस आली आहे.
उत्खनन करताना सापडलेल्या विविध तलवारी, चाकू या साधनांवरून इथे नरबळीची प्रथा पार पाडली जात होती ही बाब स्पष्ट होते असे तज्ज्ञ सांगतात.
भितीदायक असले तरीही मायोंग आता प्रसिद्ध होत चालले आहे. भिती आणि साहस यांची आवड असलेले पर्यटक आता मायोंगला भेट देतात. राज्याने पर्यटन स्थळ म्हणून मायोंगची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी सुरु केली आहे. तसेच मायोंगमध्ये एक संग्रहालयही आहे. या संग्रहालयात जुन्या जादूई गोष्टी, शस्त्रे, जुनी नाणी, जुने लेख, हाडे आणि कवटीपासून बनवलेले वेगवेगळे दागिने, नरबळीच्या प्रक्रियेसाठी वापरली जात असलेली हत्यारे प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत. गावात जाऊन तिथल्या रहिवाशांशी मारलेल्या गप्पा आपल्याला बऱ्याच अनोख्या आणि गजब कहाण्या सांगतात.
भारतात असे अनेक ठिकाणे आहेत जिथला इतिहास हा रंजक आणि भितीदायक आहे. मायोंग त्यातलंच एक ठिकाण. ठोस पुरावे नसले तरीही भुताटकी आणि जादू टोण्याचे अस्तित्व पुर्णपणे नाकारता येणे शक्य नाही. तुम्हालाही जर अशा विचित्र आणि तथ्यापलीकडच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर मायोंग तुमच्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. बाकीच्यांना या विचित्र ठिकाणच्या विचित्र बाबी ऐकून भिती वाटली नसेल तर नवलच!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.