आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशापुढील सर्वात मोठे आव्हान होते, देशातील संस्थानिकांचे विलनीकरण करून घेणे. भारत सरकारने ही जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर सोपवण्यात आली होती. सरदारांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली आणि ती यशस्वी करून दाखवली.
आजच्या भारताचे शिल्पकार म्हणून प्रत्येक भारतीय आणि भारतातील प्रत्येक येणारी पिढी सरदारांप्रती कृतज्ञ असेल. या सगळ्या संस्थानात हैद्राबादचे निजाम आणि जुनागढचे नवाब हे दोन मोठे संस्थानिक होते.
या दोन्ही संस्थानात हिंदू नागरिकांची संख्या मोठी होती. या हिंदुंना भारतासोबत राहायचे होते. तर नवाबाला पाकिस्तानात जायचे होते.
जिन्नांशी करार करून हा नवाब पाकिस्तानात गेला खरा पण, पाकिस्तानकडून त्याला ज्या अपेक्षा होत्या त्या कधीच पूर्ण झाल्या नाहीत. जुनागढच्या या नवाबाचे नाव होते, नवाब मुहम्मद महाबत खानजी उर्फ तिसरे रसूल खानजी.
या नवाबाची अवस्था आज पाकिस्तानमध्ये एखाद्या शिपायापेक्षा चांगली नाही.
नवाबाला जिन्नांनी जी काही स्वप्ने दाखवली होती त्यांचा जिन्नांना, अर्थातच, विसर पडला. जिन्नांनीच नवाबाची दखल घेतली नाही त्यामुळे जिन्नांनंतर नवाबाचे काय हाल झाले असतील याची कल्पनाच केलेली बरी.
जिन्नांनी दाखवलेल्या स्वप्नांच्या भरवशावर या नवाबाने भारताचा त्याग केला. पण, या नवाबाच्या वारसदारांना आज त्याचा खूपच पश्चाताप होतो आहे.
नवाब महाबत खान यांची तिसरी पिढी पाकिस्तानच्या कराची शहरात राहत आहे. त्या नावाबाचे नाव आहे, नवाब मुहम्मद जहांगीर खान. पाकिस्तानच्या एका प्रसार माध्यमाला मुलाखत देताना तो असे म्हणाला की,
“इथे येऊन आमचे असे हाल होणार आहेत, हे आधीच माहिती असते, तर आम्ही भारत सोडून इथे कधीच आलो नसतो.”
सातत्याने आपली अवस्था सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु असते. पण, पाकिस्तानात त्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही.
पाकिस्तानात गेल्यापासून त्यांचा मानसन्मान, प्रतिष्ठा सगळ्याचाच कचरा झाला आहे. पाकिस्तानातील एका प्रसिद्ध वृत्तपत्रात त्याची ही मुलाखत छापून आली होती. फाळणीच्या वेळी मोहम्मद आली जिन्ना यांच्याशी केलेल्या कराराचा भाग म्हणून ते पाकिस्तानमध्ये आले. परंतु जिन्ना हा करार सोयीस्करपणे विसरले.
हैद्राबादनंतर जुनागढ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत राज्य होते. परंतु, पाकिस्तानला जाताना नवाबाने आपली संपत्ती भारतातच सोडली. शिवाय त्यांनी जुनागढमधील संपत्तीच्या बदल्यात पाकिस्तानात संपत्तीही मागितली नाही.
तरीही आज पाकिस्तानने त्यांना पूर्णतः बेदखल केले आहे.
पाकिस्तानमधील इतर शाही परिवारांना जो मानसन्मान दिला जातो, तो या नवाबाच्या परिवाराला मात्र मिळत नाही. पाकिस्तान या नवाबाच्या घराण्याला खिजगणतीतही पकडत नाही.
शिवाय, या नवाबाचे भारतातील दिवाण ज्यांच्या सांगण्यावरूनच हे नवाब पाकिस्तानला गेले, ते भुट्टो कुटुंब मात्र पाकिस्तानच्या राजकारणातील महत्त्वाचा भाग बनले आहे.
जुनागढचे नवाब मुहम्मद महाबत खान आणि दिवाण शाहनवाज भुट्टो या दोघांनाही पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची जबरदस्त खुमखुमी होती. मोहम्मद अली जिन्नांनी त्यांना खूप मोठी स्वप्ने दाखवली होती.
जुनागढचे प्रधान आणि जुल्फिकार अली भुट्टोचे वडील शाह नवाजने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना जुनागढ संस्थान पाकिस्तानात विलीन होण्यास तयार असल्याचे १९ ऑगस्ट १९४७ रोजी पत्राद्वारे कळवले होते. परंतु त्यांच्या या पत्राला पाकिस्तानकडून त्वरित प्रतिसाद मिळाला नाही.
जुनागढ औपचारिकपणे पाकिस्तानात विलीन होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असून तुम्ही याबाबत लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा अशा आशयाचे पत्र भुट्टो यांनी लियाकत अली खान यांना पाठवले होते.
या पत्राला उत्तर आले नाही म्हणून त्यांनी पुन्हा चार सप्टेंबर रोजी जिन्नांना त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून देणारे पत्र पाठवले.
यावर जिन्नांनी उत्तर दिले, कॅबिनेट बैठकीत यावर विचार विमर्श करू. याबाबत एक धोरण ठरवण्यात येईल. त्यानुसार ८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने जुनागढ पाकिस्तानात विलीन झाल्याची घोषणा केली. जुनागढचे संस्थानिक पाकिस्तानात विलीन होण्यास तयार असल्याचेही यावेळी घोषित करण्यात आले.
नेहरुंनी मात्र याला विरोध केला. त्यांनी १२ सप्टेंबर रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांना पत्र लिहून कळवले की, जुनागढ संस्थानात हिंदूंची संख्या जास्त आहे. या संस्थानात ८०% लोकसंख्या हिंदू होती.
जनतेचे मत जाणून घेतल्याशिवाय भारत या विलीनिकरणास परवानगी देऊ शकत नाही. तसेही पाकिस्तानला जुनागढ विलीन करून घेण्याचा काहीच अधिकार नाही, असेही नेहरुंनी सुनावले.
तरी देखील १५ सप्टेंबर १९४७ रोजी जुनागढ पाकिस्तानात विलीन करण्याचे औपचारिक सोपस्कार पार पाडण्यात आले. आता मात्र भारताने जुनागढमध्ये आपले सैन्य पाठवले.
भुट्टोने धोका ओळखला होता. त्यांनी लियाकत अली खान यांना पुन्हा पत्र लिहिले. त्यांनी अली खान यांना भारतीय सैनिक जुनागढमध्ये हजर झालेले असताना पाकिस्तान याबाबत काही करणार आहे की, असे विचारणा करणारे पत्र लिहिले.
जिन्नांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. पण, लॉर्ड माउंटबॅटन यांनी देखील त्यांना हेच सांगितले की, जुनागढ पाकिस्तानात विलीन करणे म्हणजे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या कराराचे उल्लंघन आहे. त्यांनी भारताच्या सैन्य कारवाईचे समर्थन केले.
एच. व्ही. हडसन यांच्या ‘द ग्रेट डिव्हाईड’या पुस्तकात याचा उल्लेख केलेला आढळतो. लॉर्ड माउंटबॅटन यांनी जुनागढ संस्थानाबाबत राजाकडे आपला अहवाल सादर केल्याचेही या पुस्तकात लिहिले आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी जुनागढच्या जनतेची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली. जुनागढ मधील ८०% जनता भारताच्या बाजूने होती. जनतेचा हा कौल पाहून जिन्ना निरुत्तर झाले. २५ डिसेंबर रोजी जुनागढ संस्थान स्वतंत्र करण्यात आले.
तिथे तात्पुरत्या कालावधीसाठी स्वतंत्र सरकार नेमले गेले. परिस्थितीच्या रेट्यापुढे भुट्टो स्वतःला पराभूत समजत होते. व्ही. पी. मेनन यांनी ‘इंटिग्रेशन ऑफ इंडिया इन्स्टिड’ या पुस्तकात भुट्टोच्या असह्यतेचे वर्णन केले आहे. पाकिस्तानकडून याबबत कोणताही दबाव नव्हता.
२० फेब्रुवारी १९४८ रोजी भारत सरकारने जुनागढमधील जनतेचे मत जाणून घेण्यासाठी मतदान घेतले. २,०१,४५७ मतदारांपैकी १,९०,८७० मतदारांनी मतदान केले. यात पाकिस्तानच्या बाजूने फक्त ९१ मते मिळाली होती.
शेवटी जुनागढचा नवाब सगळी संपत्ती भारतातच सोडून पाकिस्तानला निघून गेला. पण, तिथे गेल्यावर तर त्याची अवस्था अधिकच बिकट झाली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.